राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८४ वा वाढदिवस आहे. आपल्या राजकीय कारकीर्दीत शरद पवारांनी अनेक चढ-उतार पाहिले. अलीकडेच त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार आपल्या बाजूने वळवून शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे ८३ वर्षीय शरद पवार यांची पुढील वाटचाल कशी असेल? ते काय भूमिका घेतील? महाराष्ट्रासह देशातील राजकारणात त्यांचं स्थान काय असेल? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाले.

पण पक्षफुटीनंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेतून शरद पवारांनी या सर्व प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण वाटतो? असा प्रश्न विचारला असता शरद पवारांनी स्वत:चा हात वर केला आणि चेहऱ्यावर हास्य आणत म्हणाले, “स्वत: शरद पवार”. त्यांच्या या उत्तराने संपूर्ण पत्रकार परिषद स्तब्ध झाली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास अनेक गोष्टी शिकवणारा होता. पक्ष फुटणं हे माझ्यासाठी नवीन नाही. आता पुन्हा नव्याने जनतेत उतरावं लागेल, या वक्तव्यातून त्यांची लढाऊवृत्तीही दिसून आली.

Ambedkarist activists active in support of Mavia Discuss the danger of changing the constitution
‘मविआ’च्या समर्थनार्थ आंबेडकरवादी कार्यकर्ते सक्रिय; राज्यघटना बदलली जाण्याच्या धोक्याची चर्चा
Amol Kolhe, mic, Bhosari Constituency,
Video : …अन अमोल कोल्हे यांनी ‘त्या’ व्यक्तीच्या हातातून माईक का खेचला? राजकीय सभ्यतेचे दिले उदाहरण
Sharad Pawar
कच्चथिवू बेटावरून शरद पवारांचा मोदींवर पलटवार, म्हणाले, “हयात नसलेल्या इंदिरा गांधींवर…”
Chandrasekhar Bawankule
“बच्चू कडूंचा भाजपशी थेट संबंध नाही, त्यांच्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील”, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

देशाच्या राजकारणात शरद पवारांचा चेहरा आश्वासक वाटत असला तरी त्यांच्या नावाभोवती एक वेगळं वलय आहे. शरद पवारांनी एखादं विधान केलं तर त्याचा नेहमी उलटा अर्थ घ्यायचा. शरद पवार सांगतात एक आणि करतात दुसरं, अशी टीका विरोधकांडून केली जाते. कारण त्यांचे राजकीय डावपेच सर्वांना सर्वश्रुत आहेत. त्यांना राजकारणातला चाणक्य म्हटलं जातं. शरद पवारांचं नाव अनेकदा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशीही जोडलं जातं. याबाबत अनेक आरोप, तर्क आणि अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जातात. पण या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे का? शरद पवारांचं दाऊद इब्राहिमशी नाव कसं जोडलं गेलं? नेमके आरोप काय आहेत? अशा प्रश्नांचा आढावा आपण या लेखातून घेणार आहोत.

१९८९ ते १९९६ हा काळ शरद पवारांच्या राजकीय जीवनातील चढ-उताराचा आणि कठोर परीक्षा घेणारा काळ होता. या काळात शरद पवारांवर विविध प्रकारचे आरोप झाले. प्रसारमाध्यमांमध्येही शरद पवारच चर्चेच्या केंद्रस्थानी असायचे. याच काळात शरद पवारांचं नाव कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी जोडलं गेलं. या आरोपांवर शरद पवार यांनी स्वत: ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.

शरद पवार आणि दाऊद यांच्यात संबंध असल्याच्या आरोपांचा उगम

‘लोक माझे सांगाती’ पुस्तकातील मजकूरानुसार, शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांच्यात संबंध असल्याचा आरोपांचा उगम पाकिस्तानच्या दूतावासातून झाला. १९९३ साली जेव्हा मुंबई साखळी बॉम्बस्फोट घडले, त्यावेळी शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी अवघ्या ४८ तासांत मुंबईतील सर्व परिस्थिती पूर्वपदावर आणली होती. त्यामुळे बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचणाऱ्यांच्या मनात शरद पवारांबद्दल रोष होता. पाकिस्तानच्या दूतावासातील एका अधिकाऱ्याने मुंबईतील एका व्यक्तीला फोन करून शरद पवारांची हत्या करा, असा आदेशही दिला होता. याबाबतचं कॉल रेकॉर्डिंग भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या हाती लागलं होतं. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव यांनी शरद पवारांना स्वत:ची काळजी घेण्याचा सल्लाही दिला होता.

याकूब मेमनचं कनेक्शन कसं उघड झालं?

मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर राज्यातील तपास यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. दरम्यान, तपास यंत्रणांनी वरळीतील पासपोर्ट कार्यालयाजवळून एक मारुती व्हॅन हस्तगत केली होती. या कारमध्ये काही संवेदनशील सामान आणि डायरी आढळली होती. यातूनच याकूब मेमनचं कनेक्शनही बाहेर आलं होतं. यानंतर केलल्या छापेमारीत एका फ्लॅटमधून आरडीएक्सचा साठा आणि काही पासपोर्ट सापडले होते. या पासपोर्टमधील नोदींचा तपास केला असता संबंधित लोकांचं पाकिस्तान कनेक्शन असल्याची खळबळजनक माहिती समोर आली. या संपूर्ण प्रकरणाची माहिती गोळा केल्यानंतर शरद पवारांनी सूरजकुंड येथील काँग्रेसच्या अधिवेशनात पाकिस्तानच्या कटाचा भंडाफोड केला.

पाकिस्तानी उच्चायुक्तांचे शरद पवारांवरील आरोप

यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी पत्रकार परिषद घेत शरद पवारांचे सर्व दावे फेटाळून लावले. एवढंच नव्हे तर शरद पवार यांचेच अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, त्यांनीच मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट घडवून आणला, असा आरोप त्यांनी केला. याच घटनेनंतर खऱ्या अर्थाने शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांच्यात संबंध असल्याचे आरोप केले जाऊ लागले.

दाऊद इब्राहिमच्या भावाची मुलाखत

याच काळात ‘जनसत्ता’च्या एका पत्रकाराने दाऊदचा भाऊ नुराची मुलाखत घेतली होती. पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी केलेल्या आरोपांचा संदर्भ देत, “तुम्ही शरद पवारांना ओळखता का?” असा प्रश्न संबंधित पत्रकाराने विचारला. त्यावर दाऊदच्या भावाने उत्तर दिलं, “आमचा जन्म मुंबईत झाला. शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांना कोण नाही ओळखत?” दाऊदच्या भावाने केलेल्या वक्तव्यानंतर शरद पवार आणि दाऊद यांच्यात संबंध असल्याचा संशय आणखी गडद झाला. “दाऊदचा भाऊही म्हणतो, शरद पवारांना कोण नाही ओळखत?” असे आरोप विरोधक करू लागले. अशाप्रकारे शरद पवारांचं नाव कुख्यात डॉन दाऊदशी जोडलं गेलं, याबाबतचा दावा शरद पवार यांनी आपल्या राजकीय आत्मकथेत केला आहे.