देशाच्या आर्थिक राजधानीबरोबर देशातील सर्वात मोठी आणि एखाद्या छोट्या राज्याएवढा अर्थसंकल्प असलेली महानगरपालिका म्हणूनही मुंबई शहराच्या महापालिकेची एक वेगळी ओळख आहे. यामुळेच या शहराच्या महापौर पदाचा मान काही वेगळाच आहे. जसं मुंबई शहर हे नेहमीच चर्चेत असते तसं राजकीय व्यवस्थेचा भाग असल्याने महापौर पद नेहमीच चर्चेचा विषय राहत आले आहे. विशेषतः गेल्या काही वर्षात महापौर पदावरील व्यक्तिंनी हे पद जास्त चर्चेत ठेवले आहे. मुंबई पालिकेचा या वेळचा कार्यकाल संपेपर्यंत महापौर पदावर शिवसेनेच्या फायर ब्रँड नगरसेविका किशोरी पेडणेकर होत्या. शहरातील कुठलीही प्रमुख घटना असू दे, समस्या असू दे त्या प्रत्यक्ष भेट देण्यापासून प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांवर खणखणीत भाषेत टीकेमुळे- वक्तव्यांमुळे त्या चांगल्याच चर्चेत राहिल्या होत्या.   

आदित्य ठाकरे आमदार असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक १९९ मधून किशोर पेडणेकरांचा २०१७ ला निवडुन आल्या होत्या. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत त्यांना ११२२९ मते मिळाली होती. याआधी तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडुन आलेल्या किशोरी पेडणेकर यंदा निवडणूक लढवणार नसून त्या निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा आहे, अर्थात या वृत्ताला कोणीही दुजोरा दिलेला नाही. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे बहुतेक सर्व वॉर्डमध्ये चित्र बदललेलं आहे. त्यात वरळीमध्ये गटातटाचे राजकारण मोठे असून तिथे प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपाची ताकदही लक्षणीय आहे.  त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिलेल्या किशोरी पेडणेकर यांच्यापुढे यंदा निवडणुक जिंकण्याचे एक मोठे आव्हान असणार आहे.