विक्रांत भोसले

मागील लेखात आपण वृत्ती आणि वर्तन यांच्यातील संबंध काही प्रमाणात अभ्यासला. वर्तनात केलेल्या बदलामध्ये वृत्ती बदलण्याचे मोठे सामर्थ्य असते, असे आता संशोधकांच्या लक्षात आले आहे. आजच्या लेखात आपण वृत्तीशी (Attitude) संबंधित या बाजूवर आणखी विचार करणार आहोत. वर्तन बदलल्यामुळे वृत्ती कशी बदलू शकते याची अनेक उदाहरणे देता येऊ शकतात. तसेच वर्तन बदलण्याच्या काही प्रवाही पद्धतींबद्दलही रंजक चर्चा उपलब्ध आहे.

homosexual Women
समलिंगी स्त्रियांना असतो अकाली मृत्यूचा धोका, पण नेमकं कारण काय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड!
lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
nestle controversy
Nestle Controversy : नेस्लेच्या बेबी फूडमध्ये साखरेचे प्रमाण जास्त; साखर आरोग्यासाठी घातक का?
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…

(१) पुनरुच्चाराचे सामध्र्य (Saying Becomes Believing)

 एखाद्या गोष्टीचा वारंवार उच्चार करणे, तसेच असा पुनरुच्चार अनेकांनी एकावेळेस करणे या सर्व घटनांमधून उच्चारल्या जाणाऱ्या मजकुरावरचा विश्वास अधिकाधिक दृढ होत जातो. आपण जे म्हणतो आहोत, तेच सत्य आहे, असे वाटायला लागते. प्रार्थना म्हणणे हे भारतीय संस्कृतीचे लक्षण आहे, असे आपल्या सर्वानाच वाटते. याचे एक प्रमुख कारण म्हणजे, आपल्या शाळांमधून वर्षांनुवर्षे वदवून घेतल्या जाणाऱ्या प्रार्थना होय. ज्या प्रकारच्या प्रार्थना शाळांमधून म्हटल्या जातात, त्या खरे तर केवळ हिंदूू संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या असतात. (इतर धर्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रार्थना क्वचितच शाळांमधून म्हणल्या जातात.) या बाबतीत संपूर्ण देशभर थोडय़ाफार फरकाने एकच चित्र दिसते. याचा परिणाम म्हणजे, प्रार्थना म्हणणे हे ‘भारतीय’ संस्कृतीचे लक्षण मानले जाते. या सर्वाच्या मुळाशी, प्रार्थनेचा अनेकदा केलेला पुनरुच्चार कारणीभूत आहे, याची दखल घेतली पाहिजे.

(२) छोटय़ा कृतींचे मोठे परिणाम (Foot- in- the- door Phenomenon) :

अशा प्रकारची परिस्थिती अनेक वेगवेगळय़ा ठिकाणी बघायला मिळते. जसे की, एखाद्या प्रकल्पासाठी किंवा संस्थेसाठी आपण थोडय़ा वेळाकरता मदत करण्याचे आश्वासन देतो. मात्र प्रत्यक्ष काम करायला लागल्यानंतर आपली गुंतवणूक आश्वासनापेक्षा खूपच जास्त असते. भरपूर श्रमाच्या अशा गुंतवणुकीनंतर आपल्याला असे लक्षात येते की, या कामामध्ये आपण ठरल्यापेक्षा खूपच जास्त गुंतलो आणि अशा वेळेस आपण ठरवतो की, असे पुन्हा होऊ द्यायचे नाही. मात्र पुन्हा पुन्हा अशा घटना घडतातच, असे का होते? वृत्ती आणि वर्तन यांच्यातील पूरकतेच्या अभ्यासावरून असे लक्षात आले आहे की, एखाद्या व्यक्तीकडून मोठी (महत्त्वाची) मदत मिळवायची असल्यास, एक प्रमुख मार्ग म्हणजे, त्या व्यक्तीला तुलनेने छोटी मदत करण्यास भाग पाडणे. यामध्ये अनेक छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा समावेश होतो. जसे की – एखाद्या संघटनेचा बिल्ला लावणे, सह्यांच्या मोहिमेत सहभागी होणे, माहिती पुस्तिका किंवा प्रचारपत्रक स्वीकारणे. अनेकदा छोटय़ा सार्वजनिक कृतींचे परिणाम मोठे असतात. या सगळय़ाला Foot-in-the-door Phenomenon असे म्हणतात.

(३)  सामाजिक चळवळी (Social Movements) :

सामाजिक चळवळी या शब्दसमूहाचा अर्थ बहुतेक वेळा सकारात्मक मानला जातो. मात्र सामाजिक चळवळ, मोर्चे बांधणी या सर्व गोष्टी तीव्र नकारात्मक परिणामही घडवून आणू शकतात. मुळातच जे वर्तन समाजबाह्य, नीतिबाह्य मानले जाते त्याविरुद्ध वर्तन करून, मोठय़ा समाजघटकाचे वृत्तीतील परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता अशा चळवळींमध्ये असते. भारतीय संदर्भात सामाजिक चळवळींमुळे झालेल्या वृत्तीतील बदलाची अनेक उदाहरणे पाहता येतात. जसे की – सतीबंदी, विधवा पुनर्विवाह इ. अर्थातच सामाजिक चळवळीतून भयंकर नकारात्मक गोष्टीदेखील घडल्याची उदाहरणे इतिहासात पाहायला मिळतात. हिटलरच्या समर्थनार्थ त्याकाळी जर्मनीत पसरलेली सामाजिक बदलाची लाट, हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. थोडय़ा काळामध्येही बदललेले वर्तन हे वृत्ती बदलण्यास कारण ठरू शकते. अशाच अनेक खऱ्या आयुष्यातील घटना व प्रसंगांमध्येही हेच निरीक्षण नोंदवता येऊ शकते.

अधिकारी म्हणून विविध क्षेत्रात कार्यरत असताना, तुम्हाला वृत्ती व वर्तन यांच्यातील गुंतागुंतीची ओळख असणे अपेक्षित आहे. जेव्हा स्वत:च्या किंवा इतरांच्या वर्तनातील बदल आवश्यक असतो तेव्हा मानसिकता बदलण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. परंतु केवळ मानसिकता बदलणे पुरेसे ठरेलच असे नाही. कित्येकदा आवश्यक कायदे, नियमावल्या यांच्या माध्यमातून कृती बदलल्या जाऊ शकतात. अशा प्रकारे कृतीतील बदल हा एक कृती करण्याच्या पद्धतीतील बदलाचे साधन ठरू शकतो. तसेच हा बदल कालांतराने व्यक्तींकडून आत्मसात केला जातो. याचाच परिणाम म्हणून व्यक्तींच्या वृत्तीतही लक्षणीय बदल घडून येतो. उदा. १९५४ मध्ये अमेरिकेत कृष्णवर्णीयांसाठी आणि श्वेतवर्णीयांसाठी वेगवेगळय़ा शाळा असणे हे संविधानाच्या दृष्टिकोनातून अवैध समजण्यात आले, त्यानुसार कायदे बदलण्यात आले. जरी सुरुवातीला श्वेतवर्णीयांकडून याला विरोध झाला तरी कालांतराने अशा प्रकारच्या शाळा असणे बहुतेक लोकांनी मान्य केले आणि यातून एकात्मीकरणाला सुरुवात झाली. अशीच अनेक उदाहरणे भारतीय संदर्भातही पाहिली जाऊ शकतात. अशा प्रकारे, सामाजिक मानसशास्त्र अनेक ‘जागृती मोहिमां’मागील स्पष्टीकरण समजून घेण्यास मदत करते. सरकार चालवीत असलेल्या लसीकरण, सुरक्षित रस्ता, सप्ताह, सौजन्य सप्ताह या योजनांमागील भूमिका (वृत्तीचा वर्तनावर आणि वर्तनाचा वृत्तीवर होणारा परिणाम) सहज लक्षात येतो.