सागर भस्मे

मागील लेखातून आपण भारतातील दळणवळणाविषयीची माहिती घेतली. या लेखातून आपण भारतातील झोपडपट्ट्या, त्यांची वैशिष्ट्ये व स्वरूप, त्या निर्माण होण्याची कारणे आणि त्यांच्याशी निगडित विविध समस्यांविषयी जाणून घेऊ. शहरी भागांच्या अनियंत्रित, अनियोजित व अव्यवस्थित वाढीचा नैसर्गिक परिणाम म्हणजे झोपडपट्ट्या आणि विखुरलेल्या वसाहतींची वाढ आणि प्रसार होय. झोपडपट्ट्या या भारतीय शहरांच्या पर्यावरणीय संरचनेत, विशेषत: महानगर केंद्रांचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे.

beed lok sabha marathi news, beed lok sabha election 2024
बीडमध्ये सामान्यांच्या प्रश्नांपेक्षा आरक्षणाचाच मुद्दा प्रचारात प्रभावी
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था मूलभूत संकल्पना, परिशिष्टे आणि सरनामा

भारतात औद्योगिकीकरणाच्या जोडीने झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे झोपडपट्ट्यांमध्ये वाढ झाली आहे. झोपडपट्ट्यांचा प्रसार अनेक कारणांमुळे होतो, जसे की, घरांसाठी विकसित जमिनीचा तुटवडा, शहरी गरिबांच्या आवाक्याबाहेर असलेल्या जमिनीच्या उच्च किमती, नोकऱ्यांच्या शोधात ग्रामीण भागातील स्थलांतरीतांचा शहरांकडे असलेला मोठा ओघ इत्यादी. झोपडपट्टीत राहणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सध्याच्या नागरी सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येत आहे.

भारतात झोपडपट्ट्यांची व्याख्या झोपडपट्टी क्षेत्रे (सुधारणा आणि मंजुरी) अधिनियम १९५६ च्या कलम ३ अंतर्गत केली गेली आहे. समाविष्ट घटक लक्षात घेऊन झोपडपट्टीची व्याख्या करायची झाल्यास ‘झोपडपट्टी म्हणजे ज्या भागातील इमारती निकृष्ट दर्जाच्या आहेत. असे क्षेत्र जे कोणत्याही बाबतीत मानवी वस्तीसाठी अयोग्य असून, या ठिकाणी गर्दी, सदोष व्यवस्था आणि कमकुवत इमारतींची रचना, रस्त्यांची अरुंदता, वायुविजन, प्रकाश, स्वच्छता, सुविधांची कमतरता, मानवी सुरक्षितता, आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या गोष्टी, पायाभूत सुविधा नसणे म्हणजे झोपडपट्टी होय.’

हेही वाचा – UPSC-MPSC : भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील मुख्य बंदरे आणि त्याची वैशिष्ट्ये भाग-२

झोपडपट्टी म्हणून एखाद्या क्षेत्राला लागू होणारे निकष खालीलप्रमाणे :

राज्य सरकारद्वारे कोणत्याही कायद्यांतर्गत ‘झोपडपट्टी’ अधिसूचित असलेल्या सर्व क्षेत्रांना झोपडपट्टी म्हणून संबोधले जाते. तसेच राज्य सरकारने झोपडपट्टी म्हणून मान्यता दिलेली सर्व क्षेत्रे; ज्यांना कोणत्याही कायद्यांतर्गत झोपडपट्टी म्हणून अधिकृतपणे अधिसूचित करण्यात आलेले नाही. कमीत कमी ३०० लोकसंख्येचे कॉम्पॅक्ट क्षेत्र किंवा सुमारे ६०-७० घरे, अस्वच्छतेने बांधलेल्या गर्दीच्या सदनिका. सामान्यत: अपुर्‍या पायाभूत सुविधा असलेले वातावरण आणि स्वच्छता व पिण्याच्या पाण्याच्या सुविधांचा अभाव असलेली क्षेत्रे झोपडपट्टी म्हणून ओळखली जातात.

भारताच्या जनगणनेनुसार झोपडपट्ट्यांची व्याख्या, ‘निवासी क्षेत्रे; जी मानवी वस्तीसाठी अयोग्य आहेत,’ अशी केली गेली आहे. सामाजिकदृष्ट्या झोपडपट्ट्या उर्वरित शहरी समाजापासून वेगळ्या असतात आणि पॅथॉलॉजिकल सामाजिक लक्षणे (ड्रगचा गैरवापर, मद्यपान, गुन्हेगारी, तोडफोड आणि इतर विकृत वर्तन) दर्शवतात. झोपडपट्टीतील रहिवाशांचे शहरी जीवनात एकीकरण न होणे हे क्षमता आणि सांस्कृतिक अडथळे या दोन्ही गोष्टी प्रतिबिंबित करतात. अशा प्रकारे झोपडपट्ट्या या केवळ झोपड्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती नसून, सामाजिक नेटवर्क, तीव्र सामाजिक-आर्थिक स्तरीकरणाच्या गुंतागुंतीच्या लोकांनी व्यापलेल्या आहेत.

भारतातील झोपडपट्ट्यांशी निगडित समस्या :

भारतात झोपडपट्ट्या म्हणजे एक किंवा दोन खोल्यांच्या झोपड्या आहेत; ज्या मुख्यतः सरकारी आणि सार्वजनिक जमिनीवर वसलेल्या आहेत. झोपडपट्ट्यांमधील घरे माती किंवा विटांच्या भिंतींनी बांधलेली असतात. छप्पर बहुतेक नालीदार पत्रे, टिन, बांबूच्या चटया, पॉलिथिन, बारीक पिशव्या आणि खाचांनी झाकलेले असते. खिडक्या व व्हेंटिलेटर आणि सार्वजनिक उपयोगिता सेवांशिवाय इथे लोक वस्ती करतात. झोपडपट्ट्यांमध्ये नेहमीच अत्यंत अस्वच्छ परिस्थिती असते. तीन-चार झोपड्यांच्या मधोमध उथळ खड्डे खणून आणि समोर पडदा म्हणून गोणपाट बांधून त्यांनी शौचालये बनवलेली असतात.

जेव्हा खड्डा ओव्हरफ्लो होतो, तेव्हा मलमूत्र आसपासच्या परिसरात पसरते आणि ते क्वचितच साफ केले जाते. झोपडपट्टीतील रहिवाशांना पाइपद्वारे पाणी उपलब्ध होत नाही आणि ते प्रामुख्याने पाणीपुरवठ्यासाठी उथळ हातपंपांवर अवलंबून असतात. असे हातपंप साधारणपणे गलिच्छ तलावाच्या मध्यभागी खोदले जातात. लोक हातपंपाखाली कपडे आणि भांडी धुतात; ज्यामुळे जलप्रदूषण होते. हातपंपाच्या सभोवतालचा संपूर्ण गाळ जमिनीत झिरपतो आणि जमिनीतील पाणी दूषित करतो. हे दूषित भूजल हॅण्डपंपाद्वारे बाहेर काढले जाते; ज्यामुळे झोपडीवासीयांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. परिणामी, रहिवासी जलजन्य रोग जसे की, रक्त आमांश, अतिसार, मलेरिया, टायफॉइड, कावीळ इत्यादींनी ग्रासले जातात.

हे आजार वर्षभर लोकांना होत राहतात. पोट फुगलेली किंवा भुकेलेली, सांगाडा असलेली मुले, पोलिओग्रस्त अनेक व्यक्ती हे एक झोपडपट्टीतील सामान्य दृश्य आहे. बहुतांश नाल्यांजवळ झोपडपट्ट्या आहेत; ज्यामध्ये अस्वच्छ पाणी असते. या नाल्यांवर कोट्यवधी माश्या आणि डासांच्या थवे असतात. साहजिकच त्यामुळे संसर्गजन्य आजार होतात. अशा नाल्यांमुळे लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये झोपडपट्ट्या वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जातात. त्यांना कोलकात्यात बस्ती, दिल्लीत झुग्गी-झोपरी, मुंबईत झोपडपट्टी, किंवा चाळ आणि चेन्नईमध्ये चेरी म्हणतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : जनसंवाद म्हणजे नेमकं काय? त्याचे मुख्य घटक कोणते?

भारतातील झोपडपट्ट्यांत वाढ होण्याची कारणे :

शहरी लोकसंख्येची जलद वाढ, ग्रामीण भागातील बेरोजगारी, अकुशल व अर्धकुशल कामगारांचे ग्रामीण भागातून शहरी भागात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर, शहरी भागात स्थलांतरीत ग्रामीण लोकसंख्येसाठी मर्यादित रोजगार संधी, शहरी भागात मर्यादित जमीन आणि जमिनीच्या उच्च किमती, शहरी भागात स्वस्त निवासस्थानांची कमतरता, अशा अनेक बाबींमुळे भारतात झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे आणि भरपूर प्रमाणात भारतात झोपडपट्टी क्षेत्रे निर्माण होत आहेत.

भारतातील वेगवेगळ्या शहरांत झोपडपट्ट्यांचे प्रमाण :

मुंबईत सर्वाधिक ५२ लाख झोपडपट्टी रहिवासी आहेत; जे शहराच्या महापालिकेच्या एकूण लोकसंख्येच्या २८.२६ टक्के आहे. त्यानंतर हैदराबाद (२३ लाख), कोलकाता (२३ लाख), दिल्ली (१६ लाख) व चेन्नई (१३ लाख) यांचा क्रमांक लागतो. संबंधित शहरांच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी विचारात घेतल्यास, हैदराबाद सर्वांत वर आहे जिथे २९.८७ टक्के लोकसंख्या झोपडपट्टी भागात राहते. त्यापाठोपाठ मुंबई (२८.२६%), कोलकाता (१६.३१%), चेन्नई (१४.९४%) व दिल्ली (९.८%) यांचा क्रमांक लागतो. मध्य मुंबईतील धारावी झोपडपट्टी ही आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे.

पूर्वी मुंबईतील धारावी ही आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी होती; पण २००९ मध्ये युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP)ने जारी केलेल्या मानव विकास अहवालानुसार (Human Development Report २००९), ‘कराचीतील ओरंगी’ ही आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे. इथल्या काही ठिकाणच्या गल्ल्या इतक्या अरुंद आहेत की, सायकलही जाऊ शकत नाही. संपूर्ण परिसरामध्ये सदनिकांच्या इमारती आहेत, वरच्या भागात गंजलेल्या लोखंडी पायऱ्या असलेल्या दोन किंवा तीन मजली उंच घरे आहेत. जिथे एक खोली संपूर्ण कुटुंबाने भाड्याने दिली आहे, कधी कधी १२ किंवा अधिक लोक एकाच एका खोलीत राहतात. सावलीहीन, वृक्षहीन सूर्यप्रकाश, अनियंत्रित कचरा, अस्वच्छ पाण्याचे साचलेले तलाव अशा या ठिकाणी फक्त कावळे आणि लांब राखाडी उंदीर हेच मानवेतर प्राणी आहेत.

भारतात २०११ च्या जनगणानेनुसार १३.७ दशलक्ष झोपडपट्टी कुटुंबांपैकी, ७४% लोकांना नळाचे पाणी उपलब्ध आहे, झोपडपट्टी नसलेल्यांमध्ये ९२% च्या तुलनेत ९०% लोकांना वीज उपलब्ध आहे. तसेच झोपडपट्टी रहिवासी ७७% लोकांनाच कायमस्वरूपी घरे उपलब्ध आहेत. अहवालात असेही दिसून आले आहे की, झोपडपट्टीतील ७०% कुटुंबांकडे टीव्ही, ६३% लोकांकडे मोबाइल फोन आणि १०.४% संगणक आहेत. हे अहवाल दर्शवतात की, झोपडपट्टी क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास घडवून आणणे अत्यंत आवश्यक आहे.