मी २०१२ मध्ये एलएल.बी. केले आहे. तेव्हापासून मी एमपीएससीची तयारी करत आहे. पण अद्याप प्राथमिक परीक्षाही उत्तीर्ण होता आलेले नाही. २०१२ साली माझे लग्न झाले. मला दोन मुले आहेत. आता काम करावे की अभ्यास? मला कुठे कामही मिळत नाही, कारण माझे इंग्रजी कच्चे आहे. मी काय करावे? विठ्ठल खरात

‘कोशिश करनेवालो की कभी हार नहीं होती’, असे म्हटले जाते. त्यात काही अंशी तथ्य आहे. पण हे प्रयत्न नेमके किती काळ करत राहायचे, हा मोठा मुद्दा आहे. तोच तुझ्या बाबतीत निर्माण झाला आहे. जवळपास पाच वर्षांपासून तुला राज्य लोकसेवा आयोगाच्या प्राथमिक परीक्षेचा टप्पा ओलांडता आलेला नाही. यावरून या परीक्षेची काठीण्य पातळी, तुझी बौद्धिक क्षमता, तुझी परीक्षेची तयारी या सगळ्याच्या सहसंबंधांची नीट कल्पना तुला आलेली असणारच. या परीक्षेच्या तयारीसाठी तू निवडलेला मार्ग निश्चितच चुकला असल्याचे स्पष्ट होते. तुझ्या अभ्यासाच्या कमकुवत बाजू कोणत्या याच्या लेखी नोंदी कराव्यास. त्यावर मात करण्यासाठी आतापर्यंत अभ्यास करण्याची जी पद्धत अवलंबली आहे ती बदलावी. दर्जेदार अभ्यासाचे साहित्य मिळवावे. चांगल्या प्रशिक्षण संस्थेतून मार्गदर्शन घ्यावे. अशा संस्थेत आपल्या अपयशाची स्पष्ट कबुली देऊन कमकुवत बाजू प्रशिक्षकांना सांगणे गरजेचे आहे. त्यात कोणताही अनमान करू नये वा कमीपणा वाटून घेऊ  नये. तुझी सध्याची मन:स्थिती बघता अभ्यास करण्यासोबतच काम करणेही गरजेचे आहे. कारण पुन्हा अपयश आले तर तुझ्या हाताशी हा प्लॅन बी तयार राहील. तू एलएल.बी. केले असल्याने तुझ्या गावातील / शहरातील मोठय़ा व नामांकित वकिलांकडे अप्रेंटिसशीप करता येणे शक्य आहे का हे बघ. अशा ठिकाणी प्रारंभी सांगकाम्या म्हणून काम करावे लागू शकते. याची तयारी ठेऊन काम केलेस तर अनेक गोष्टी तुला या अनुभवी वकिलांकडून शिकता येऊ  शकतात. पुढे तुला हे वकील, साहाय्यक म्हणून काम देऊ  शकतात. याच अनुभव आणि आत्मविश्वासाच्या बळावर तुला स्वतंत्ररीत्या वकिलीही करता येऊ  शकते. कनिष्ठस्तरीय न्यायाधीशांची निवड एमपीएससीमार्फत केली जाते. ही परीक्षासुद्धा तुला देता येईल. पण इंग्रजी चांगले नसण्याची समस्या मात्र राहीलच. त्यासाठी इंग्रजीचा एखादा चांगला गुरूच तुला शोधायला हवा. या वयात त्यांच्याकडे कसे जायचे असे जर तुला वाटत असेल तर तू ही भावना मनातून काढून टाक आणि कोरी पाटी घेऊन गुरूंकडे जा. बघ तुला यश नक्कीच मिळेल.

* मी सध्या मेकॅनिकल इंजिनीरिंगच्या चौथ्या वर्षांला शिकत आहे. पुढच्या वर्षी मला बँकिंग क्षेत्रातील प्रोबेशनरी ऑफिसर्सची परीक्षा द्यायची आहे. पण काही कारणास्तव मला काम करता करताच या परीक्षेची तयारी करावी लागेल. काम करता करताच बँकिंगच्या परीक्षेची तयारी करावी का? कारण मला आता इंजिनीअरिंगमध्ये फारसा रस वाटत नाही. तुमचे काय मत आहे?

राहुल विरकर

स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक वगळता बहुतेक सर्व सार्वजनिक बँकामधील प्रोबेशनरी ऑफिसर्स या पदाची भरती आयबीपीस- इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन या संस्थेमार्फत केली जाते. स्टेट बँक स्वत: स्वतंत्र परीक्षा घेऊन प्रोबेशनरी अधिकाऱ्यांची निवड  करते. दोन्ही पद्धतीच्या निवड प्रक्रियेत प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांचा समावेश असतो. दोन्हीकडे लाख-लाख उमेदवार या परीक्षांना बसतात. त्यामधून साधारणत: दोन ते तीन हजार प्रोबेशनरी ऑफसर्सची निवड केली जाते. ही स्थिती आणि आकडेवारी लक्षात घे आणि मग तू सध्या करत असलेले काम करता-करता ही परीक्षा द्यावीस, असे मला वाटते.