योगेश शेजवलकर – yogeshshejwalkar@gmail.com

लहानपणी अनेक नाती रूढ अर्थानं जवळची नसूनही मनानं जवळची असतात. या निव्र्याज नात्यांमध्ये कोणत्याही अटी, अपेक्षा नसतात. मात्र वय वाढत जातं तसतसे नात्यांना वेगवेगळे हिशेब चिकटतात. ‘जे फायद्याचं, ते आपलं’ आणि ज्याचा व्यवहारात विशेष उपयोग होण्याची शक्यता नाहीये त्यावर फार गुंतवणूक नको, अशी वृत्ती बनत जाते; पण अशाच ‘विशेष फायद्याच्या’ नसलेल्या नात्यांचे खरे अर्थ एखाद्या संकटकाळीच समजतात.. पण त्याच्याही एक पाऊल पुढे जायला हवं..

summer vacation at home
उन्हाळ्याच्या सुट्टीतलं घर
Ram Navami 2024 Shubh Yog
२०२४ च्या रामनवमीला अत्यंत शुभ योग जुळून आल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत? ‘या’ रूपात दिसू शकते श्रीरामकृपा
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
Taiwanese nurses protecting babies during earthquake video
Taiwan Earthquake Video: अन् मृत्यूही हरला! तैवान भूकंपात नर्सनी जीव धोक्यात घालून बाळांना वाचवले; थरारक ३१ सेंकद व्हायरल

त्या दिवशी सकाळी रुग्णालयाच्या बाहेर गाडी थांबली. साधारण पस्तिशीच्या आसपास असलेला तो तोंडावर मास्क लावून गाडीतून उतरला. मग वेगानं रुग्णालयाच्या मुख्य दरवाजात असलेल्या सॅनिटायझरच्या बोगद्यातून बाहेर पडला. रुग्णालयाची इमारत आणि दरवाजा यांच्यामध्ये एक मोठं टेबल ठेवलं होतं आणि त्या टेबलाच्या पलीकडे हातमोजे आणि मास्क घातलेला एक वॉर्डबॉय त्याचीच वाट पाहात उभा होता.

तो टेबलापाशी गेला आणि हातातली डब्याची पिशवी त्यानं टेबलावर ठेवली. मग पुढची पाच मिनिटं त्या वॉर्डबॉयबरोबर बोलून तो पुन्हा गाडीच्या दिशेनं परतला. त्याच्या आजीला ‘करोना’चं निदान झाल्यामुळे ती गेले दहा दिवस त्या रुग्णालयात होती; पण  सुदैवानं आता तिची तब्येत सुधारत होती. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातल्या बाकी सर्वाच्या करोना चाचण्या ‘निगेटिव्ह’ आल्या होत्या ही जमेची बाजू होती. डॉक्टरांनी घरचा डबा आणण्याची परवानगी दिली असल्यानं सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण,  संध्याकाळचा चहा आणि रात्रीचं जेवण पोहोचवण्यासाठी घरातली मंडळी आणि जवळचे नातेवाईक यांच्या रुग्णालयात सतत फेऱ्या सुरू होत्या. वयोमानानुसार आजीचं खाणं अगदीच कमी होतं; पण ते घरातून येत होतं हा तिच्यासाठी सर्वात मोठा आधार होता.

त्या दिवशी ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे त्याला ऑफिसमध्ये जाणं क्रमप्राप्त होतं. तेव्हा आजीचा सकाळचा नाश्ता रुग्णालयामध्ये देऊन तो मित्राबरोबर ऑफिसला निघाला  होता. तो पुन्हा गाडीत येऊन बसला तसं मित्रानं गाडी सुरू करत आजीच्या तब्येतीची चौकशी केली. सहज बोलता बोलता मित्र म्हणाला, ‘‘दहा दिवसांत रुग्णालयामधल्या सुरक्षारक्षकापासून सगळेच तुझ्या ओळखीचे झालेले दिसत आहेत. आता त्या  वॉर्डबॉयबरोबर तर तू वर्षांनुवर्षांची ओळख असल्यासारखं बोलत होतास.’’ त्यावर क्षणभर विचार करून तो म्हणाला, ‘‘त्याची आणि माझी ओळख खूप वर्षांची आहे. फक्त दुर्दैवानं त्याला पुन्हा ओळख दाखवावी, ही जाणीव मला काही दिवसांपूर्वीच झाली.’’ त्याच्या बोलण्यातला कोणताच संदर्भ न समजून मित्र म्हणाला, ‘‘म्हणजे?’’ त्यावर एक दीर्घ सुस्कारा सोडत तो म्हणाला, ‘‘तो वॉर्डबॉय माझा एक नातेवाईक आहे.’’

‘‘म्हणजे चुलतभाऊ, आत्येभाऊ, की मावसभाऊ?..’’ मित्राचा पुढचा प्रश्न त्याच्यासाठी  तयार होता. त्या प्रश्नावर भूतकाळात हरवत तो म्हणाला, ‘‘लहानपणी जेव्हा आम्ही भरपूर खेळायचो.. तेव्हाही तो कोणता भाऊ आहे, यानं कधी फरक पडला नाही. तो माझ्याच वयाचा आणि तितकाच दांडगोबा होता हे महत्त्वाचं होतं. मे महिन्याच्या आणि दिवाळीच्या सुटीत आम्ही तुफान कल्ला करायचो.’’

‘‘मग असं काय झालं?..’’ त्याच्या प्रत्येक वाक्यागणिक मित्राच्या मनातले प्रश्न वाढत होते.

मित्राच्या त्या प्रश्नावर तो काही वेळ गप्प राहिला. गाडी ‘हायवे’वर आली तसं मोकळी हवा घेण्यासाठी एसी बंद करून त्यानं खिडकी उघडली. थंडगार वाऱ्यामुळे त्याच्या मनातली अस्वस्थता कदाचित थोडी कमी झाली आणि मग मित्राच्या प्रश्नाचं उत्तर देत तो म्हणाला, ‘‘लहानपणीचे दिवस सगळ्यात छान होते. खेळायचं.. खायचं.. झोपायचं. जागं झालं की पुन्हा खेळायचं. या माझ्या आजीच्याच घरी आम्ही सगळे जमायचो. मग पुढे शाळेच्या इयत्ता वाढत गेल्या तशी एकमेकांशी तुलना सुरू झाली. वाढत्या वयाबरोबर ही तुलनाही वाढत गेली. भरघोस गुण आणि बक्षिसं हे नेहमीच माझ्या वाटय़ाला आलं, तर गटांगळ्या आणि लाल रेघा त्याच्या नशिबात आल्या. माझी ही हुशारी पाहून माझी संगत फक्त हुशार मुलांबरोबरच असावी, असा ‘अभिनव’ विचार करून घरातल्यांनी  माझा त्याच्याबरोबरचा खेळ बंद केला. एकमेकांना भेटणं बंद झालं. पुढे मी इंजिनीअरिंगला असताना या आमच्या बंधूंनी कोणत्या तरी डिप्लोमाला प्रवेश घेतल्याची बातमी मला समजली. त्याचा तो डिप्लोमा पूर्ण होईपर्यंत मी परदेशात पुढच्या शिक्षणासाठी गेलो. तोपर्यंत मलाही शिंगं फु टली होती. त्यानंतर आमचा संपर्क पूर्ण तुटला. म्हणजे मीच तो तोडला. तो माणूस म्हणून पहिल्यापासूनच अतिशय व्यवस्थित होता. फक्त माझ्या ‘स्टेटस’च्या व्याख्येत तो बसेनासा झाला.’’ त्याचं ते बोलणं ऐकून मित्र फक्त गालातल्या गालात हसला.

तो  सांगतच होता, ‘‘परदेशात जाताना आपण कोणी तरी भारी आहोत, आपले हात आता आकाशाला टेकले आहेत, अशीच माझी समजूत होती. नंतर मिळालेल्या भरभक्कम नोकरीमुळे ती समजूत आणखी पक्की झाली. काही वर्षांनी मी इथं परत आलो तेव्हा मला माझं आयुष्य एकदम ‘टॉप क्लास’ आणि ‘ब्रँडेड’ हवं होतं. त्या सगळ्यात त्याचा नंबर कुठेही लागण्याची शक्यता नव्हती. मलाही ते नकोच होतं. म्हणून मग दोन-तीन वेळा मी घरातल्या कार्यक्रमांच्या वेळीही त्याला ठरवून टाळलं होतं. हे असं मी फक्त त्याच्याच बाबतीत वागलो असं नाही, तर इतरही काही जणांशी मी असेच संबंध संपवले.’’

त्यावर मित्र शांतपणे म्हणाला, ‘‘समोरचा माणूसही आपल्याला आपल्याच नियमांत बसणारा हवा असतो. तो जसा आहे तसं आपण त्याला स्वीकारत नाही.. तर काही वेळा आपल्या आजूबाजूचे त्याला स्वीकारू देत नाहीत. हे आपलं आजचं नाही, तर परंपरागत अपयश आहे. त्यात किती तरी जण दुखवतात, तुटतात.. संबंध कायमचे संपतात; पण त्याचा विचार कुणाला करायचा असतो? शिवाय सध्या तर आपण इतके हिशेबात पक्के झालो आहोत, की नात्यातही आपण फायदा बघतो. मग ते नातं  टिकवण्यासाठी जो काही वेळ देतो त्या वेळाला गुंतवणूक समजतो. ज्या नात्यात फायदा जास्त, ते टिकवण्यासाठी आपली धडपड जास्त. असं आपल्या सगळ्यांचं सध्याचं गणित आहे. तेव्हा माणूस अगदी साधा असेल तर त्याची नोंद तरी का घ्यायची? नाही का?’’

मित्राचा रोखठोक प्रश्न ऐकून काहीसं ओशाळून तो म्हणाला, ‘‘हो, खरं आहे. प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या गणितात बांधणं आणि त्याच्यापासून कसा फायदा होईल याचं सूत्र शोधण्यासाठी प्रयत्न करणं, हेच बहुतेकदा आपल्या जगण्याचं उद्दिष्ट  झालेलं आहे. कोणताही फायदा नसतो अशा माणसावर तर आपण थेट फुली मारतो. त्याच्या बाबतीत तरी मी काय वेगळं केलं? आता मी अशा उंचीवर पोहोचलो आहे, की तिथे मला त्याची गरजच काय, असा सोईस्कर विचार मी कायम केला. शिवाय त्याच्याशी संपर्क ठेवला आणि कोणत्या ना कोणत्या निमित्तानं जर त्यानं पैसे मागितले, तर तो नात्यातला असल्यानं ते द्यावे तर लागतील, पण परत मागता येणार नाहीत, अशी विचित्र भीती मनात ठेवून मी त्याला टाळत राहिलो.’’

‘‘आणि आज काय परिस्थिती आहे?’’ मित्रानं त्याचा अंदाज घेत विचारलं. त्यावर शून्यात हरवलेली नजर तशीच ठेवत तो म्हणाला, ‘‘आजची परिस्थिती ही आहे, की घरातल्या इतक्या सगळ्या मंडळींमध्ये हा एकमेव असा माणूस आहे, की जो लांबून का  होईना, पण आजीला भेटू शकतो. तिला आधार देऊ शकतो. घरातलं जेवण तिच्यापर्यंत पोहोचवू शकतो. आज माझ्याकडे रग्गड पैसा आहे, जगभरातलं ‘नेटवर्क’ आहे; पण मी रुग्णालयामधल्या त्या खोलीत जाऊ शकत नाही. एका मर्यादेच्या पलीकडे मला  काहीही करता येत नाही; पण हा ते करू शकतो आणि मुख्य म्हणजे कोणतीही कटुता न ठेवता ते तो करतो आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नात्यातली असली तरी ही आजी त्याच्या सख्ख्या आज्यांपैकी नाही.’’

त्याचं बोलणं तोडत मित्र म्हणाला, ‘‘हो, त्याचबरोबर हेही तितकंच महत्त्वाचं आहे, की तो जे काही करतो आहे, ते फक्त तुमच्यासाठी करत नाही. रुग्णालयामधले इतर रुग्ण तर त्याच्या नात्यातलेही नाहीत; पण तो तिथे निष्ठेनं उभा आहे. ही निष्ठा कोणत्याही शाळेत किंवा महाविद्यालयात शिकवली जात नाही. पैसे फेकून ती कोणत्या तरी ‘ब्रँड’च्या नावाखाली विकत मिळत नाही. ती तुमच्यातच असावी लागते.’’

‘‘अगदी खरं आणि स्पष्ट शब्दांतच सांगायचं झालं, तर गेल्या काही महिन्यांतल्या विचित्र परिस्थितीनं माझ्या ‘ब्रँडेड’ जगण्याला एक सणसणीत थोबाडीत मारलेली आहे.’’ तो काहीसा हताशपणे म्हणाला. ‘‘आणि ती सणसणीत थोबाडीत अगदी योग्य आहे.. हे तुला पटलंय ना?’’ मित्रानं त्याला शांतपणे विचारलं. त्यावर तो होकारार्थी मान हलवत म्हणाला, ‘‘एकशे एक टक्के योग्य आहे. नाही तर, मी जे काही वागलो त्याची जाणीव मला कधीही झाली नसती. अर्थात ही जाणीव होण्यासाठी आजीला रुग्णालयामध्ये जावं  लागलं, याचं मला राहून राहून वाईट वाटतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा मी त्याला भेटतो, त्याच्याशी बोलतो, तेव्हा माझं मन मला खात राहतं. काही तरी करून त्यानं जे काही माझ्यासाठी, आमच्या सगळ्यांसाठी केलं आहे, त्याची परतफेड करता आली पाहिजे.’’

त्यावर मित्र म्हणाला, ‘‘अगदी खरं सांगू? आता तू काहीही केलंस तरी त्याची परतफेड होऊ शकणार नाही. तेव्हा त्याच्यासाठी काही तरी भव्यदिव्य करून आपल्या चुकांचं प्रायश्चित्त होईल, अशी स्वत:ची खोटी समजूत घालण्याच्या भानगडीत पडू नकोस.  त्याचं हे ऋण तुझ्यावर कायम राहणार आहे, हे मोकळेपणानं मान्य कर. त्याचा आणखी एक फायदा असा होईल, तो म्हणजे आजी घरी आल्यावर, सगळं आयुष्य पूर्वीसारखं झाल्यावर तुला पुन्हा गणितं मांडण्याचा मोह होणार नाही. विश्वास ठेव, मीही हे सगळं  तुला मला आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांतूनच सांगतो आहे. डोक्यावर असं ऋण असलं, की त्याच्या जाणिवेमुळे म्हण किंवा ओझ्यानं म्हण.. पण आपले पाय कायम जमिनीवरच राहतात. शेवटी परिस्थिती आपले रंग कितीही बदलत राहिली, तरी तिच्यासमोर आपण टिकून राहण्यासाठी शेवटी पाय जमिनीवर राहणंच निर्णायक असतं.. नाही का?’’