मानसी होळेहोन्नूर

एखाद्या मोठय़ा बहुराष्ट्रीय कंपनीचे मुख्य कार्यालय ज्या गावात असते, त्या गावाची ओळखच त्या कंपनीच्या नावाने होत असते. असेच काहीसे झालेले आहे सिएटल शहराचे. ‘अ‍ॅमेझॉन’ या बहुराष्ट्रीय कंपनीचे मुख्यालय याच शहरात आहे. या शहरातील मोठय़ा लोकसंख्येला या कंपनीमुळेच रोजगाराच्या संधी मिळालेल्या आहेत, पण याच गोष्टीची दुसरी बाजूदेखील आहे. या कंपनीमुळे इथल्या जमिनींचे, घरांचे भाव वाढलेत. त्यामुळे अनेकांना घरं घेणे परवडतच नाही. एकूणच शहरात राहणे सगळ्याच अर्थाने महाग झाले आहे. अर्थात, हा सगळा विचार करून तिथले काही लोक या सगळ्यासाठी लढा देत आहेत. या लढय़ाचा आणि महाराष्ट्राचा एक वेगळाच संबंध आहे. या दोन वेगळ्या गोष्टींना जोडणारा दुवा आहे क्षमा सावंत. तसेही समाजसुधारणा आणि मराठी माणसांचा त्यातला सहभाग ही काही नवीन गोष्ट नाही.

पुण्यात जन्मलेल्या, मुंबईत वाढलेल्या आणि लग्न करून अमेरिकेत गेलेल्या क्षमा सावंत नुकत्याच तिसऱ्यांदा सिएटलच्या सिटी कौन्सिलमध्ये निवडून आल्यात. संगणक क्षेत्रातली पदवी घेऊन, लग्न करून त्या अमेरिकेत गेल्या खऱ्या, पण संपत्तीचे असमान वितरण, गरिबी यामुळे त्यांनी अर्थशास्त्रातले शिक्षण घ्यायचे ठरवले. पुढे त्यांनी अर्थशास्त्रातली पीएच.डी.देखील मिळवली. विवेक सावंत यांच्याबरोबर लग्न करून त्या अमेरिकेत आल्या होत्या. २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला, पण त्यांनी आडनाव कायम ठेवले. २०१५ मध्ये त्या केल्विन प्रीस्ट यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. २०१२ मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली समाजवादी पक्षाच्या झेंडय़ाखाली, पण त्या ती निवडणूक हरल्या. तरीही त्यांनी त्यांचे काम सुरूच ठेवले. त्याचेच फळ म्हणून २०१३ मधल्या सिटी कौन्सिलच्या निवडणुकीत डिस्ट्रिक्ट ३ मधून त्या निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०१५ मध्येदेखील त्या निवडून आल्या. मोठय़ा कंपन्यांमुळे स्थानिक लोकांवर अन्याय होतो, त्यांचे राहणीमान महाग होते. त्यामुळे या कंपन्यांवर अतिरिक्त कर लावला पाहिजे ही त्यांची ठाम भूमिका होती, आहे.

हा हेड टॅक्स ‘अ‍ॅमेझॉन’सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांवर लावण्यात त्या यशस्वीदेखील झाल्या होत्या. मात्र तो निर्णय परत फिरवला गेला. तरीही ‘अ‍ॅमेझॉन’सारखी कंपनी सावंत यांनी केलेला विरोध विसरली नव्हती. त्यामुळेच या वेळच्या निवडणुकांमध्ये सावंत यांच्याविरुद्ध उभ्या असलेल्या इगन ओरायन यांना ‘अ‍ॅमेझॉन’ने भरभक्कम आर्थिक मदत केली होती. सावंत निवडून येऊ नये म्हणून त्यांनी खूप प्रचारदेखील केला. अमेरिकेत कंपन्या राजकीय पक्षांना उघडपणे आर्थिक मदत करतात. त्यामुळे ‘अ‍ॅमेझॉन’चा सावंत यांना असलेला विरोध त्यांच्या पथ्यावरच पडला आणि त्यांना मागच्यापेक्षा जास्त मते या वेळी मिळाली.

क्षमा सावंत यांनी समाजवादाकडे झुकणारी त्यांची विचारसरणी कधीच लपवली नाही. त्यामुळेच एका पूर्णपणे वेगळ्या गावात, देशात त्या स्वत:ची ओळख तयार करू शकल्या. एखाद्या शहरात बाहेरून येणारे फक्त त्यांच्या स्वार्थासाठी थांबत तिथे राहत नसतात. काहीजण स्थानिक प्रश्न समजून घेऊन त्याविरुद्ध आवाजदेखील उठवतात. कितीही विरोध होवो, आर्थिक दबाव येवो, प्रामाणिकपणे आपले काम करतात. त्यामुळेच ते तिथल्या मातीतले कधी होऊन जातात ते त्यांनाही कळत नाही. त्यामुळेच परकी मातीही त्यांना आपलीशी करून घेते. क्षमा सावंत यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.

हवे मानवी संशोधन

कोणतेही संशोधन होत असताना त्याचे परिणाम मोजण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. बहुतेकदा हे प्रयोग प्राण्यांवर होतात, ते तिथे यशस्वी झाले, की मग माणसांवर केले जातात; पण क्वचित कधी-कधी हे माणसांवरचे प्रयोग जीवघेणे ठरू शकतात. असाच काहीसा अनुभव स्वीडनमधल्या शास्त्रज्ञांना आला आणि त्यांनी त्यांचे संशोधन मुदतीपूर्वीच थांबवले. गर्भारपणाचा वैद्यकीय कालावधी ४० आठवडे मानला जातो. त्यानंतरची प्रतीक्षा कदाचित बाळाच्या, आईच्या जिवाला धोका ठरू शकते, म्हणून ‘इंडय़ुस’ (कळा येण्याची औषधं देऊन) करून प्रसूती केल्या जातात. मात्र अनेक देशांमध्ये ४० आठवडय़ांनंतरही वाट पाहिली जाते, कधी कधी अगदी बेचाळिसाव्या आठवडय़ापर्यंतदेखील.

स्वीडनमध्ये २०१६ ला अशाच एका प्रयोगाला सुरुवात झाली. ४० आठवडय़ां नंतरच्या गर्भवती स्त्रियांचे दोन गट पाडले आणि त्यातल्या एका गटातल्या स्त्रियांची ४१ आठवडय़ांनंतर इंडय़ूस करून प्रसूती केली, तर दुसऱ्या गटातल्या स्त्रियांची आणखी एक आठवडा वाट पाहून बेचाळिसाव्या आठवडय़ानंतर प्रसूती केली. या जास्तीच्या दिवसांचा अर्भकांवर, स्त्रियांवर काय परिणाम होतो हे बघितले जात होते. मात्र हा प्रयोग मागच्या वर्षी एकाएकी थांबवला गेला. काही दिवसांपूर्वी या प्रयोगावरचा शोधनिबंध सादर केला गेला तेव्हा याची माहिती जगासमोर आली. हा प्रयोग थांबवण्याचे कारण म्हणजे या प्रयोगातल्या दुसऱ्या गटात पाच जन्मत:च मृत झालेली, तर एक जन्मल्यानंतर मृत झालेले अर्भक होते. या सहा पालकांनी त्यांचे मूल गमावले होते. त्यामुळे हा प्रयोग मधूनच गुंडाळला गेला होता. या सगळ्यात या सहाही मातांना शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही त्रासांना सामोरे जावे लागले असणार.

अति तिथे मातीच. त्यामुळे जशी लवकर जन्मणारी बाळं बहुतेक वेळा वैगुण्य घेऊन जन्माला येतात तशीच उशिरा जन्माला येणारी बाळंदेखील वेगळे प्रश्न सोबत घेऊन जन्माला येतात. निसर्गाला आपण गृहीत धरून चालू शकत नाही. आपल्याकडे हेळसांड झाल्यामुळे नवजात अर्भके मरण पावतात, तर प्रगत देशांमध्ये संशोधनामुळे काहींना जीव गमवावा लागला. अर्थात, आपल्याकडच्या मृत्युदराची तुलना अशा प्रगत देशातल्या मृत्युदराशी करता येणार नाही. संशोधन करत राहिलेच पाहिजे, मात्र त्यात माणसांचा जीव जाता कामा नये. माणुसकीशी बांधिलकी राखून संशोधन झाले तरच ते खरोखरीच सर्वाच्या भल्याचे असणार आहे.

भाषा जिवंत राहावी म्हणून..

‘भाषा टिकते ती स्त्रियांमुळेच’ असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. कारण स्त्रियांना बोलायला विषय अपुरे पडत नाहीत आणि संवादातून भाषा जगली, तगली तरच भाषा समृद्ध होत असते. पेरूमध्ये रोक्साना क्युस्पे कोलान्तेस हिने असेच केचुआ भाषेच्या संवर्धनासाठी अतिशय मोठे पाऊल उचलले आहे.

केचुआ ही इंका लोकांची भाषा आजही दक्षिण अमेरिकेतील जवळपास ८० लाखांहून जास्त लोक बोलतात. केचुआ ही जरी खूप जुनी भाषा असली तरी तिला स्वत:ची लिपी नाही. हिचे स्वरूप मुख्यत: बोलीभाषेसारखेच राहिले होते, पण १९७५ पासून पेरूमधील सरकारने प्रयत्न करून रोमन लिपीतून या भाषेचे लिखित रूपात पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू केलेत. मुळात ही भाषा समृद्ध आहेच, मात्र स्वत:ची लिपी नसल्याने किंवा ती लुप्त झाल्याने या भाषेत लिखित साहित्य सापडत नाही. आजघडीला या भाषेतले साहित्य या प्रकारातले सगळ्यात मोठे पुस्तक म्हणजे बायबलच म्हणता येईल. थोडीफार दोन-तीन शतकांपूर्वी लिहिलेली नाटके, कविता असे अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल, असे साहित्य असताना, रोक्साना हिने तिचा पीएच.डी.चा प्रबंध केचुआ भाषेत लिहून सादर करत एक नवीन इतिहास रचला आहे. पेरू आणि लॅटिन अमेरिकेतील साहित्य आणि त्यातील केचुआ कविता हा तिच्या प्रबंधाचा विषय होता. लिमामधल्या सॅन मार्कोस विद्यापीठाच्या ४६८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणीतरी स्थानिक भाषेत प्रबंध सादर केला. रोक्सानाने तब्बल ७ वर्षे अभ्यास करून तिचा प्रबंध लिहिला. तिच्या मते तिची भाषा एवढी समृद्ध आहे, की तिला दुसऱ्या भाषेतले शब्द वापरावे लागले नाहीत. आपल्या भाषेची ही श्रीमंती जगापुढे आणण्यासाठीच तिने तिचा प्रबंध केचुआ भाषेत लिहिला. पेरू त्यांच्या देशातील स्थानिक भाषांच्या संवर्धनासाठी युनायटेड नेशन्सचीदेखील मदत घेत आहे. जवळपास दोन हजारहून अधिक बोलीभाषांचे जतन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाषा जिवंत राहिली तर संस्कृती टिकते आणि संस्कृती टिकली तर इतिहास जिवंत ठेवला जात असतो.

भाषा हे संवादाचे माध्यम आहे. स्त्रीमध्ये उपजतच सगळे सांभाळून ठेवण्याची ऊर्मी असते त्यामुळेच आपली भाषा टिकवण्यासाठी रोक्सानाने हे पाऊल उचलले यात काही शंकाच नाही. आज आपल्या देशातही अशा अनेक बोलीभाषा आहेत, ज्या केवळ लिपी, लिखित स्वरूपात नसल्यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आपल्याकडेदेखील अशा रोक्साना तयार होवोत, जेणेकरून त्या भाषा जिवंत राहतील.

(फोटो व माहिती स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)

manasi.holehonnur@gmail.com

chaturang@expressindia.com