विस्मरणाचा कधी विचार केलाय? तुम्हाला काय वाटतं? आपण जे पाहतो, वाचतो वा ऐकतो ते फक्त मेंदूच्या स्मृतिपटलांवरतीच साठवलं जातं? हजारो वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनी मेंदूचे शवविच्छेदन करूनसुद्धा त्यांना मन सापडले नाही. मग मला सांगा एखाद्याने त्याच्या मनाच्या आतमध्ये साठवलेले ज्ञान त्यांना कधी सापडणार? आणि हो, याचा मात्र असा अर्थ घेऊ नका की, ज्ञान हे फक्त मेंदूत आणि मनातच साठवले जाते. कारण असं जर असतं तर ‘मेरे दिल को लगी हुयी चोट मैं कभी भूल नही सकता!’ असे म्हणण्याला काही अर्थच राहिला नसता. याचाच अर्थ आयुर्वेदाने सांगितलेले सत्य आहे. असे आणखी कोणते तरी तत्त्व आहे की ज्यात आपण आपल्या स्मृती साठवून ठेवू शकतो. पण आपण विसरलो विसरलो म्हणतो म्हणजे नक्की काय विसरतो? ज्ञान घ्यायलाच विसरतो? योग्य कप्प्यात साठवायला विसरतो? की, ते कोणत्या कप्प्यात साठवले आहे हे आठवायलाच विसरतो? मग या विसरलेल्या गोष्टी नक्की जातात तरी कुठे? आणि थोडासा जरी बुद्धीला ताण दिला तरी त्या आठवतात तरी कशा? मग नक्की या विसरतात की, सापडत नाहीत?
खरंच बुद्धिवर्धक औषधांनी ही बुद्धी वाढते का? काय आहे नक्की या पाठीमागचे रहस्य? का आजकाल शाळेतील मुलाच्या, त्याच्या पालकाच्या विस्मरणात वाढ झाली आहे? एवढेच काय पण आज कित्येक घरांत कित्येक आजी-आजोबा या विस्मरणाने त्रस्त झाले आहेत. काही तर आपल्यात असूनही हरवूनच गेले आहेत. अल्झायमरचे प्रमाण वाढू
लागले आहे.
आपलीच माणसे आपल्याच लोकांना जेव्हा ओळखत नाहीत तेव्हा काय होत असेल त्या कुटुंबातील इतर व्यक्तींचे? का विस्मरण ही देवाने दिलेली देणगी समजून आपणही त्यावर काही शास्त्रोक्त उपाय आहे का हे जाणून न घेता विसरून जायचं? प्रश्न पडतोय न? हो हा खरंच विचार करण्यासारखा विषय आहे नाही तर आपल्या आयुष्यात आपण कितीही मोठे असलो तरी आपलाही ‘नटसम्राट’ व्हायला वेळ लागणार नाही. कारण छोटे छोटे विस्मरणच मोठय़ा मोठय़ा विस्मरणाला जन्म देत असते. म्हणून यावरील आयुर्वेद शास्त्रोक्त मत, प्रकार व उपचार आपण पुढील भागात जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– वैद्य हरीश पाटणकर
harishpatankar@yahoo.co.in

मराठीतील सर्व आयुर्वेदाच्या स्मृतीतून बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oblivion
First published on: 23-07-2016 at 01:04 IST