|| डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे

ज्ञानदेवी-चाइल्डलाइनला एक वडील व्याकूळतेने ७-८ वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाची व्यथा सांगत होते. कुठे गेला असेल? सर्व शक्यता पडताळून, तक्रारी करून झाल्या. कोणी सांगे अमुक-तमुक गावी पाहिला, हिमालयात/यात्रेच्या ठिकाणी दिसला, बराग्यांच्या टोळीत पाहिला. प्रत्येक बातमीचा मागोवा चिकाटीने हे वडील घेत. पशापरी पसा जात होता व पूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य उद्ध्वस्त झाले होते. आशा सुटत नव्हती. मृत्यू पावला असेल/ अपघात झाला असेल या शक्यता गृहीत धरून त्यांनी बातमी मिळेल तेथील शवागारे, इस्पितळे पालथी घातली होती. काय मन:स्थिती असेल या बापाची! खरोखरच तो मुलगा या जगात नसेल तर तसे कळलेले बरे. पण असे अधांतरी जगणे अवघड. त्या वडिलांची, त्या आईची व्यथा, वेदना खरोखरच बघवत नव्हती. आपण त्यात सांत्वना देण्यापलीकडे आणि मर्यादित स्वरूपात शोधमोहिमेत भाग घेण्यापलीकडे काही करू शकत नाही ही वस्तुस्थिती हतबल करणारी होती.

Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
Loksatta vasturang On the occasion of Gudi Padwa home purchase investment
गुढीपाडवा आणि गृहखरेदी

एका रस्त्यावर सापडलेल्या, परभाषी मुलाचा महत्प्रयासाने घरचा नंबर मिळवला. त्याला घरी सोडायला जात असता स्वच्छतागृहाचे निमित्त करून रेल्वेतून पळून गेला. तर दुसऱ्या एकाला पोचवायला गेले असता पालकांनीच मारून-मारून हाकलून दिला. अशी पळपुटी मुले कुठल्या निवाऱ्यातही राहत नाहीत. भटकंतीचे त्यांना जणू व्यसनच लागते. आई-वडील व्याकूळ होतात. शोधण्यासाठी जंग-जंग पछाडतात. हाकलून देणारे या मनोवृत्तीलाच कंटाळलेले असतात. पण मुले मुळात घर का सोडतात हा खरा बिनीचा प्रश्न आहे. उबदार घरटय़ातून पक्षिणीलासुद्धा पिल्लाला ढकलून द्यावे लागते, तर इथे स्वत:हून मुले का आसरा सोडत आहेत? सगळीच हरवलेली मुले ‘हरवलेली’ नसतात. काही पळवली जातात, काही पळून जातात, पळून जाणारी कशाला तरी त्रासून घर सोडतात.

बालकामगार/वेठबिगारी, भीक मागण्यासाठी, वेश्यावृत्तीसाठी, मध्यपूर्वेतील उंट-शर्यतीसाठी, अवयव चोरण्यासाठीसुद्धा मुले पळविल्याचे अनेक अभ्यास दाखवतात. ही झाली पळविलेली मुले. पण सिनेसृष्टीच्या/मुंबईसारख्या झगमगत्या जगाच्या आकर्षणानेही मुले घर सोडतात. सचिन तेंडुलकरला भेटायचे म्हणून पश्चिम-बंगालमधून आलेला सुखवस्तू घरातील एक मुलगा मुंबई-‘चाइल्डलाइन’ला सापडला होता. शहराच्या मोहाने कुठल्या तरी चित्रपटातील/क्रिकेटमधील हिरोला भेटायच्या ओढीनेही मुले घर सोडतात आणि परतीचा मार्ग न सापडल्याने शहरात कुठे तरी बेवारस भटकत राहतात. ‘चाइल्डलाइन’कडे एक मुलगा मुंबई-पुण्यात फुटबॉल-क्लब आहेत कळल्यावरून फुटबॉल हिरो बनण्यासाठी बिहारमधून आला होता. धट्टीकट्टी शरीरयष्टी, लाडाकोडात वाढलेला असा होता. पुणे रेल्वे-स्टेशनवर एकटाच दिसला. समुपदेशन करून त्याला घरी परत पोचविले. परंतु काही वर्षांनंतर तो पुन्हा पुण्यात ‘चाइल्डलाइन’कडे आला. त्याला पाहून खूप वाईट वाटले. एकेकाळचा आरोग्यसंपन्न मुलगा आता फक्त सापळा राहिला होता. पण फुटबॉल-हिरोच होणार हे वेड डोक्यातून गेले नव्हते. अशी मुले कितीदाही घरी पोचवली तरी परत-परत पळून जातात.

मुद्दा असा की, ही मुले स्वत:लाच हरवून घेतात. अशी अनेक मुले पुणे-‘चाइल्डलाइन’ च्या १७ वर्षांच्या प्रवासात सापडली, घरी पोचवली पण ती तिथे टिकली नाहीत. एक मुलगा तर भारतातल्या ५ ते १० ‘चाइल्डलाइन’ना माहिती झाला होता. प्रत्येकाने महत्प्रयासाने त्याला घरी सोडले होते. हक्काने ‘चाइल्डलाइन’कडे जेवणाखाणाची मागणी करायचा. निरीक्षणगृहात ठेवला तर तेथूनही पळून जायचा.

स्टेशनवर राहणाऱ्या, घर सोडलेल्या मुलांबरोबर तसेच पळून आलेल्या अशा मुलांना ज्यांना घरी जायचेच नाही अशांबरोबर गप्पा मारत, त्यांचे विश्व समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही मुलांसारखीच त्यांनाही मायेची भूक असते. कोणी तरी आपल्याला विचारावे, आपली हालहवाल कोणाला तरी माहीत असावी ही आस असते. ‘ज्ञानदेवी’शी दोस्ती झाली की स्टेशनवरची मुले हमखास फोन करून, ‘‘दिदी अब बनारस गाडीसे जाके, दो दिन बाद वापस आऐंगे’’ अशा स्वरूपाची घरी सांगून जावे तशी माहिती द्यायचे. ‘‘कोयला को बुखार आया है, रामजानेने झगडा किया है,’’ अशी माहितीही द्यायचे. या मुलांची नावे त्यांना स्वत:लाच माहीत नसतात. त्यामुळे अशी नावे ते घेतात. मिसिंग तक्रारींमधून सापडावीत कशी? काही वेळेला त्यांच्याकडून घरचा पत्ता मिळतोही. पण ती जायला तयार नसतात. आप्त न्यायला आले तरी खूप मनधरणी केल्यावर जातात. पण पुन्हा घर सोडतात. मुळात ज्यामुळे प्रेमाचे पाश तुटले ती कारणे, ते घाव इतके खोलवर असतात की त्यांना परत जायचेच नसते. स्वातंत्र्याची, बंधनमुक्त आयुष्याची सवय लागलेली असते ती वेगळीच. पुष्कळदा ही मुले कौटुंबिक कलहाला कंटाळून बाहेर पडतात. अनेकदा त्यांच्यावर शारीरिक व लैंगिक अत्याचार झालेले असतात. गरिबी, भूकमारी असेही प्रश्न कदाचित असतात.

मिसिंग तक्रारीचा गरउपयोग कसा केला जातो हेही पाहू. एकदा परराज्यातील संस्थेने तेथील पोलिसांमार्फत त्यांच्या गावातील एक हरवलेली मुलगी ही पुण्यातील बुधवार पेठेत डांबून ठेवल्याचे व तिला सोडविण्यासाठी मदत करण्याचे ‘चाइल्डलाइन’ला आवाहन केले. तिच्या वडिलांनी आपल्या गावी तक्रार दिलेली होती. जिवावर उदार होऊन एका वेश्यागृहात लपवून ठेवलेली ही अल्पवयीन मुलगी ‘चाइल्डलाइन’च्या कार्यकर्त्यांनी बाहेर काढली. नंतर बाहेर आले ते सत्य वेगळाच धडा देऊन गेले. मुलीला आधी विकायचे, मग जास्त मोठे गिऱ्हाईक आले तर स्वत:च मिसिंग तक्रार द्यायची. पद्धतशीरपणे गळे काढून स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकत्रे, पोलिसांना कामाला लावायचे. मुलगी राजरोसपणे ताब्यात घ्यायची व पुन्हा मोठय़ा गिऱ्हाईकास विकायची, असा हा मिसिंगचा धंदा.

मुली हरविण्याचे किंबहुना नाहीशा होण्याचे आणखी एक कारण म्हणजे एकीकडे सातत्याने दुजाभाव तर दुसरीकडे लग्न या संकल्पनेबाबत लहानपणापासून निर्माण केलेला स्वप्नांचा महाल. याचा गरफायदा घेणारे अनेक असतात. दोन गोड शब्द, थोडेसे प्रेम, भेटी याला मुली प्रेम समजतात. फिल्मी मनोवृत्तीने ‘सराट’ होतात. लग्नाच्या भूलथापांना सुटकेचा मार्ग समजतात व पळून जातात.

प्रेमप्रकरणांमध्ये मुले जोडीने पळून जातात, किंवा फूस लावून मुली पळविल्या जातात. सापडल्या त्या वाचल्या. परंतु अनेक जणी अवैध मानवी-वाहतूक करणाऱ्यांच्या हाती लागतात. फेसबुक मित्राने दिलेल्या भूलथापांना भुलून घरात चोऱ्या करून घरदार सोडणाऱ्याही अनेक जणी आहेत. नको असलेल्या मुलाशी लग्न ठरवले/शिकत असताना लग्न ठरवले किंवा ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याबरोबर लग्न करून दिले नाही म्हणूनही मुली पळून जातात. अटेन्शन सिकिंगची समस्या असणाऱ्या किंवा पौगंडावस्थेतील थ्रिलची आस म्हणून मत्रिणी-मत्रिणी, मित्र-मित्र असेसुद्धा गायब होतात. अति दडपणे, अपेक्षांचे अवाजवी ओझे, हीपण घर सोडण्याची कारणे असतात. अगदी छोटी मुले खूपदा सापडतात तेव्हा आई हरविली/बाबा हरविले म्हणून सांगतात. वास्तविक हात सुटून अथवा आई-वडील गप्पांत अथवा मोबाइलमध्ये गुंतले म्हणून ती गहाळ झालेली असतात.

एका अभ्यासानुसार देशात जवळपास ८० हजार मुले दरसाल हरवतात. ३ पकी २ कधीच सापडत नाहीत. ही संख्या सहसा हरवल्याच्या नोंदीवर आधारित असते. परंतु अशी लाखो मुले असू शकतात जी हरवली म्हणून कुठे नोंदच झाली नाही.

आई-वडिलांचा घटस्फोट, सावत्र पालकाचे आगमन, घरातील मायेच्या व्यक्तीचा मृत्यू, गरिबी, व्यसनी आई-बाप हीसुद्धा घर सोडण्याची कारणे असतात. लैंगिक शोषण अथवा मारहाण, शिवीगाळ एवढेच काय आईचा होणारा छळ सहन न झाल्याने, हट्ट न पुरविला गेल्यामुळे पळून जाणारेही आहेत. घरात लैंगिक शोषण होत असते, सांगायचे कसे किंवा सांगितले तरी एक तर विश्वास ठेवला जात नाही किंवा गप्प केले जाते, हे सहन न होऊन मुले पळून जाण्याचा विचार करतात. पिढीतील वैचारिक अंतरामुळे होणारी भांडणे, संस्कारातील फरक हाही मुलांना घर सोडण्यास उद्युक्त करू शकतो. नापास झाल्यामुळे, रागाच्या भरात, वैफल्यातून, मित्रांच्या आग्रहास्तव किंवा निव्वळ थ्रिल म्हणून बाहेर पडलेली मुले सरभर होतात. पोलिसांकडे मदत मागायला घाबरतात. ‘चाइल्डलाइन’सारख्या एखाद्या संस्थेला सापडली तर वाचली. नाही तर नशीब नेईल तिकडे भरकटत जातात. असामाजिक तत्त्वांना बळी पडू शकतात. म्हणून लहानपणापासून या सर्वाची चर्चा घरात होणे व रागाने घर सोडलेले असो अथवा कोणी पळविलेले असो, घर आणि घरच्यांची मायेची मिठी ही नेहमीच त्यांची असणार आहे- काय वाट्टले ते झाले तरी, ही खात्री मुलांना मिळाली पाहिजे. त्याबरोबरच घरी परतण्यासाठी कुठे मदत मिळू शकते याची माहिती तोंडपाठ पाहिजे. मुलाला त्याचे नाव शिकवताना पत्ता व घरचा फोन नंबर अगदी लहान वयात शिकवला गेला पाहीजे.

मला आठवते, मी अगदी प्राथमिक शाळेत असताना शाळेच्या बसने जात असूनही, माझी आजी माझ्याजवळ थोडे पसे देत असे. हरवलीस तर सरळ रिक्षा करून घरी ये. आल्यावर पसे देऊ हे आश्वासनही असे. गर्दीत जाताना मुलांच्या गळ्यात नाव-पत्त्यांचे आयकार्ड घालणे हाही एक सुरक्षेचा मार्ग असतो. भारतभर ७८९ शहरांमध्ये ‘चाइल्डलाइन’ उपलब्ध आहे. त्यामुळे १०९८ वर फुकट फोन करून मदत मागता येते. १०० नंबरही मदत करतो. हे सर्व मुलांना माहीत पाहिजे. मायक्रोचीपचा ताईत हा मार्ग आधुनिक काळात सुचवावासा वाटतो.

मूल पळून जाणार याची काही लक्षणे दिसतात- जसे उशिरापर्यंत बाहेर राहणे, घरी येण्यास टाळाटाळ करणे, मित्रांच्या/परिचितांच्या घरी जास्त राहणे, शाळेत जातो सांगून फिरत राहणे, वर्तणुकीत फरक, वाढलेली आक्रमकता, सगळ्यांपासून स्वत:ला तोडणे, खोटे बोलणे, व्यसनांचा आधार, स्वत:ला इजा करणे, आत्मकेंद्रित होणे, संवाद टाळणे.. इत्यादी. मुलाशी शाब्दिक आणि शब्दांपलीकडला संवाद असेल तर वेळेवर वर्तणुकीतील बदल जाणवून पुढील विपरीत परिणाम टळू शकतात.

हरवलेल्या मुलांची नोंद सहसा पोलिसांकडे केली जाते. ‘चाइल्डलाइन’सारख्या संस्थांकडेही त्याची माहिती येते. भारत सरकार व ‘चाइल्डलाइन इंडिया’ यांनी मिळून ‘खोया-पाया’ हे अ‍ॅप विकसित केले आहे. इतरही अनेक अशा सुविधा उपलब्ध आहेत. परंतु एकुणात या सर्वात समन्वयाचा अभाव जाणवतो. तसेच बालकामगार, बालवेश्या, बालभिकारी, विविध अनाथाश्रमात असलेली, रेल्वे प्लॅटफॉर्मवर दिसणारी, रेल्वेमधून फिरणारी मुले, देशात-परदेशात दत्तक गेलेली मुले अशा मुलांची गणना केल्यास अनेक हरवलेल्या मुलांचा माग लागू शकेल व त्याबरोबरच मुलांच्या वाहतुकीला पायबंद बसेल. विविध खाती/संस्था/पोलीस अशा मुलांची सुटका/कारवाई करत असतात. परंतु एकमेकांकडील माहितीचा समन्वय होताना दिसत नाही. टाकून दिलेल्या मुलांची किंवा अज्ञानी पालकांच्या हरवलेल्या मुलांची नोंदही नसते. म्हणजेच प्रत्यक्ष हरवलेली मुले किती हा एक प्रश्नच आहे. हरवलेले सापडतील पण मुळात ते हरवू नयेत व हरवले तरी सापडावे अशी आपली योजना हवी.

anuradha1054@gmail.com

chaturang@expressindia.com