आरती अंकलीकर

‘शास्त्रीय संगीताच्या मैफलीत गाणं आणि चित्रपटासाठीचं पार्श्वगायन, यात खूप फरक असतो. मुख्य चौकट तंत्राची असली, तरी चित्रपटात पडद्यावरचा भाव नेमका सुरांत पकडून नायक-नायिकांना आपला आवाज द्यायचा असतो. आता पूर्वीच्या तुलनेत तंत्रज्ञानातली आधुनिकता आणि माणसांची व्यग्रता यामुळे कामाच्या पद्धतीत प्रचंड बदल झाला आहे. मी जी चित्रपटगीतं गायली, ती प्रामुख्यानं शास्त्रीय धाटणीचीच होती. तरीही ती चौकट अंगवळणी पडणं शिकून घ्यावं लागलं. मात्र त्यानं मला खूप आनंदही दिला..’

Careers for Dancers
चौकट मोडताना : नुपूरचे नृत्य
Loksatta editorial Spices Board bans some Indian brand products from Singapore and Hong Kong
अग्रलेख: अनिवासींच्या मुळावर निवासी!
Krushna Abhishek reacts on Mama Govinda
वादानंतर अनेक वर्षांपासून अबोला, तरीही मामा गोविंदाने भाचीच्या लग्नाला लावली हजेरी; कृष्णा अभिषेक म्हणाला…
Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी

मुंबईच्या वरळी भागात असलेला तो स्टुडिओ, रेडिओवाणी. तिथे आम्ही सगळे जमलो होतो. सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल, संगीत दिग्दर्शक वनराज भाटिया, त्यांचे तेव्हाचे सहाय्यक अशोक पत्की, मी, सारंगी वादक, तबला वादक आणि हार्मोनियम वादक असे सगळेच. एका गाण्याबद्दल चर्चा चालू होती. अभिनेत्री किरण खेर यांच्यावर चित्रित झालेलं एक गाणं मला गायचं होतं. सिंगर्स बूथमध्ये शिरले आणि माइकसमोर उभी राहिले.. बघता बघता आत्तापर्यतचं एकूण आयुष्यच सामोरं येऊन गेलं.. 

पहिलं चित्रपटगीत मी कधी ऐकलं बरं?.. पाच-सहा वर्षांची असताना असावं. घरात तीन वेळा भजन चालत असे. सकाळी काकड आरती, सकाळचं भजन. त्यानंतर आजी वगैरे भजन करत. संध्याकाळी परत भजन होत असे, शेजारती होत असे. अत्यंत सुरेख चाली असलेली ती भजनं, काही कानडी भजनं. सगळे मिळून एका सुरात ती भजनं गात असू. त्यामुळे भक्ती संगीत, भजनं, अभंग हे खूप कानावर पडले, लहानपणापासून. जन्मापासूनच.. किंबहुना आईच्या पोटात असल्यापासूनच!

हेही वाचा >>> कलावंतांचे आनंद पर्यटन : रस्ता गिळत.. अंग आदळत..

४-५ वर्षांची झाल्यावर इतरांप्रमाणेच शाळेत शिकलेली बडबडगीतं, नर्सरी ऱ्हाइम्स गायला लागले. सहसा चित्रपट संगीत रेडिओवर लावलं जात नसे. रेडिओच तसा फारसा लावला जात नसे! मात्र आमच्याकडे काही रेकॉर्डस् होत्या. ‘एल.पी.’ म्हणजे लाँग प्ले रेकॉर्डस् आणि आमच्या रेकॉर्ड प्लेअरवर त्या तबकडय़ा लावून आम्ही अनेक साई भजनं, भीमसेनजींची काही रेकॉर्डिग्ज ऐकत असू. पहिलं चित्रपटगीत ऐकलं, ते बहुधा उस्ताद आमिर खान साहेब आणि पं. भीमसेन जोशी यांनी गायलेल्या कुठल्या तरी चित्रपटातलं असावं. अनेकदा मी भावगीतं आणि नाटय़गीतं गात असे. त्यामुळे चित्रपट संगीताचा जाणीवपूर्वक अभ्यास लहानपणापासून झाला नाही. भावगीतांच्या स्पर्धामध्ये ‘जाहल्या काही चुका’ हे श्रीनिवास खळे साहेबांचं लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं, ‘पहा टाकले पुसोनी डोळे’ हे पं. हृदयनाथ मंगेशकर यांचं लताबाईंनीच गायलेलं गाणं, ‘स्वप्नातल्या कळय़ांनो’ हे आशा भोसले यांनी गायलेलं अनिल-अरुण या संगीतकार जोडीचं गाणं, तर कधी ‘जिवलगा राहिले दूर घर माझे’ अशी एकाहून एक सरस गाणी मी घोटून-घोटून गात असे. जेव्हा भक्तिसंगीताची स्पर्धा असे, तेव्हा ‘भेटी लागी जीवा’ हे खळेकाकांचंच लताबाईंनी गायलेलं गाणं, काही यशवंत देवांचीसुद्धा भक्तिगीतं गायलेली मला आठवतात.

अनेक नाटय़गीतंही मी गात असे स्पर्धामध्ये. त्या वेळी बालगंधर्वाच्या गाण्यांच्या अनेक तबकडय़ा किंवा रेकॉर्डस् उपलब्ध होत्या. त्या आमच्या रेकॉर्ड प्लेअरवर लावून मी शेकडो वेळा ऐकत असे. ‘खरा तो प्रेमा’, ‘नैने लाजवित’, ‘रुपबली नर शार्दूल’ अशी अवघड चालींची, दाणेदार ताना असलेली, अत्यंत मधुर नाटय़गीतं ऐकून मी ती स्पर्धेत गात असे. एक चित्रपटगीत मात्र मी नेहमी म्हणत असे. जिकडे जाईन तिथे मला हे गीत गाण्याची फर्माईश होत असे! ते म्हणजे वाणी जयराम यांनी गायलेलं ‘बोले रे पपिहरा’. आपसूकच माझा कल हा रागसंगीतावर आधारित, थोडी गायकी असलेल्या चित्रपटगीतांकडे होता. स्पर्धाच्या बरोबरीनं मी संगीताचे धडे घेतच होते आणि स्पर्धा जिंकल्यामुळे संगीत क्षेत्रामध्ये नाव हळूहळू पसरू लागलं.

हेही वाचा >>> ‘‘हो, स्त्रियाही शिकारी होत्या..’’

मला आठवतंय ते माझं पहिलं चित्रपटगीत. ‘वसंत देसाई संगीत स्पर्धे’मध्ये माझा दुसरा क्रमांक आल्यानंतर मिळालेल्या एका संधीच्या वेळी गायलेलं. पिनाझ मसानीचा पहिला क्रमांक आल्यामुळे माझा विरस झाला होता खूप! पण दुसरा क्रमांक येऊनसुद्धा वसंत देसाई यांनी त्यांच्या पुढील चित्रपटात गाण्याची आम्हा काही बालगायिकांना संधी दिली. पहिलीच वेळ माझी रेकॉर्डिगसाठीची. वरळीचा स्टुडिओ होता, बॉम्बे लॅब. बहुधा १२ वर्षांची असेन मी तेव्हा. आशा भोसले प्रमुख गायिका होत्या त्या गाण्याच्या आणि आम्ही काही लहान मुलं गाणार होतो. काही सोलो लाइन्स होत्या मला आणि काही कोरस. तो माझा पहिला अनुभव पार्श्वगायनाचा! माझा आवाज कुणावर चित्रित होणार हे माहीतही नव्हतं मला. आपल्याला शिकवलेल्या ओळी चोखपणानं आपली वेळ आली की गायच्या, एवढंच माहीत होतं. स्टुडिओमध्ये जवळजवळ ४० वादक कलाकार बसलेले होते. काही सतार, गिटार, तबला, वेगवेगळी तालवाद्यं, शहनाई, संतूर, बासरी आणि या सगळय़ा संचाला वाट दाखवणारा एक ‘कंडक्टर’देखील तिथे होता. आम्ही सिंगर्स बूथमध्ये एका माइकच्या भोवती तीन जण उभे होतो. आमची वेळ आली की गात होतो. सगळाच नवीन अनुभव.

आमचं गाणं स्टुडिओत रेकॉर्ड झालं ते आठवतंय. पहिला संगीताचा तुकडा झाला, आशाताईंनी सुरुवात केली, मग पहिल्या अंतऱ्याआधीचं संगीत वाजलं. आम्ही आमच्या ओळी गायलो आणि नंतर संगीत सुरू झाल्यावर वादक कलाकाराची काही चूक झाली म्हणून रेकॉर्डिग थांबलं. नंतर परत दुसऱ्या अंतऱ्याच्या आधीच्या संगीताच्या तुकडय़ानं रेकॉर्डिग सुरू झालं आणि पुढील संपूर्ण गाणं रेकॉर्ड केलं गेलं. नंतर हे दोन तुकडे जोडून एकसंध गाणं तयार केलं गेलं! एकाच वेळी सगळे वादक स्टुडिओमध्ये हजर होते, गायक होते आणि सगळय़ांनी एकत्रितपणे गाऊन, वाजवून रेकॉर्ड केलेलं हे गीत. अशी हजारो गाणी लतादीदी, आशाताई गायल्या. आता मात्र रेकॉर्डिगचं तंत्र खूप बदललं आहे. वादक कलाकार आणि गायक एकमेकांना भेटतदेखील नाहीत! एकत्र रेकॉर्डिगच होत नाही त्यांचं. वेगवेगळय़ा वेळी वेगवेगळे वादक येतात, त्यांच्यासाठी लिहिलेलं संगीत वाजवतात, ओळी वाजवतात किंवा तबल्याचे ठेके-तुकडे वाजवतात. प्रत्येक वादक त्याच्या सोयीच्या वेळी येतो आणि आपला भाग वाजवून जातो. गायकदेखील त्याच्या सोयीच्या वेळी येऊन गाऊन जातो. गायक आणि वादक अनेक वेळा एकच ओळ गाऊन/ वाजवून ती उत्तम येऊ लागल्यावर रेकॉर्ड करू शकतात. एका झटक्यात संपूर्ण गाणं गायची किंवा वाजवायची गरजच उरलेली नाही!

हेही वाचा >>> निसर्गकन्यकांचा गणेश!

तर पहिल्या पार्श्वगायनानंतर जसजशी मोठी होऊ लागले, तसतशी शेकडो चित्रपटगीतं कानावर पडू लागली. सगळय़ांच्या लाडक्या लतादीदी, आशाताई, मोहम्मद रफी, किशोर कुमार, मुकेश, हेमंत कुमार हे त्या काळचे प्रसिद्ध गायक. स्त्रीच्या आवाजातली बहुतेक गाणी लतादीदी किंवा आशाताई गात असत. कुठल्याही चित्रपटातलं गाणं असो, गायिका लतादीदी किंवा आशाताई! मदनमोहन, कल्याणजी-आनंदजी, शंकर-जयकिशन, एस.डी. बर्मन, आर.डी. बर्मन, या संगीतकारांची गाणी ऐकत राहिले. मदनमोहन यांची लताबाईंनी गायलेली गाणी मला खूप आवडत. पेचदार, शास्त्रीय रागांची बैठक असलेली, सुमधुर, गायला कठीण आणि अत्यंत भावपूर्ण अशी मदनजींची गाणी. त्या गाण्यांना लाभलेला लतादीदींचा आवाज म्हणजे सुवर्णकांचन योग! लताबाईंचा आवाज तिन्ही सप्तकांमध्ये लीलया फिरणारा. गाण्यात सरळ स्वर असोत, मींड असो, तान असो, मग ती सपाट असो की भिंगरीसारखी असो.. शब्दोच्चार, शब्दभाव, नायिकेला साजेसं गाणं. ‘परफेक्शन’ म्हणजे काय असतं ते दीदींच्या गाण्यानं दाखवून दिलं!

पं. जसराजजींचा मुलगा शारंगदेव पंडित यांनी संगीत दिलेल्या ‘राजा रानी को चाहिये पसीना’ या चित्रपटादरम्यान निर्माते व्ही. शांताराम, या चित्रपटाच्या दिग्दर्शक सुलभा देशपांडे, यांच्याबरोबर शांतारामबापूंच्या घरी अनेक तालमी होत असत त्यांच्या घरी, राज कमल स्टुडिओमध्ये. आपल्या गाण्यात त्या चित्रपटातलं नाटय़ कसं उभं करायचं, आपल्या गाण्यामध्ये भाव कसे आणायचे, उच्चार कसे करायचे, आपल्या आवाजाची फेक ध्वनिक्षेपकासाठी कशी असावी, कसं ‘असरदार गाणं गावं’, अशा अनेक गोष्टी शांतारामजींनीं शिकवल्या.

१९८० मध्ये मी किशोरीताईंकडे शिकायला सुरुवात केली. ताईंचं ‘गीत गाया पत्थरोने’ या चित्रपटातलं याच शब्दांचं सुप्रसिद्ध गाणं मी मात्र ऐकलंच नव्हतं. त्या वेळी ना टेपरेकॉर्डर होते, ना सीडी, ना पेन ड्राइव्ह, ना यूटय़ूब! ताईंकडे शिकू लागल्यावर त्यांच्या एका शिष्येनं हे गाणं मला ऐकवलं. थक्कच झाले ऐकून. ताईंचा पाण्यासारखा वाहणारा गळा, अत्यंत सहजता गाण्यात! खटका असो, मुरकी असो, कण असो, पल्लेदार ताना असोत.. ताईंच्या प्रत्येक स्वरात, प्रत्येक विरामात भावगर्भता. आपलं सर्वोत्तम देऊ शकणाऱ्या ताई!

हेही वाचा >>> शोध आठवणीतल्या चवींचा! : वैदर्भीय पदार्थाची नवलाई!

उदयबरोबर (अभिनेते उदय टिकेकर) माझं लग्न ठरलं १९८३ मध्ये. योगायोग असा, की उदय नायक असलेल्या ‘काफिला’ या चित्रपटासाठी मला एक गाणं गाण्याची संधी मिळाली. जुही चावला होती त्या चित्रपटाची नायिका. छान झालं होतं गाणं माझं. पण चित्रपट मात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाच नाही!  त्यानंतर बरीच वर्ष पार्श्वगायनाची संधी नाही मिळाली. १९८५ मध्ये लग्न झालं त्यानंतर थेट १९९५ मध्ये केदार पंडित या सुप्रसिद्ध तबला वादकाचा फोन आला. आता तो खूप चांगला संगीत दिग्दर्शकही आहे. त्या वेळी तो अनेक रेकॉर्डिग्जना तबला वाजवत असे. ‘‘एका रेकॉर्डिगमध्ये ठुमरी गायिकेची आवश्यकता आहे. तू गाशील का आरती ताई?’’ त्यानं विचारलं. मला खूप आनंद झाला. तात्काळ ‘हो’ म्हटलं. विचारलंदेखील नाही, की दिग्दर्शक कोण, संगीत दिग्दर्शक कोण हे. काही काळानंतर कळलं की श्याम बेनेगल दिग्दर्शक होते आणि वनराज भाटियांचं संगीत.. आणि किरण खेर यांच्यासाठी मला पार्श्वगायन करायचं होतं! तर, त्या गाण्याच्या निमित्तानं आम्ही रेडिओवाणी स्टुडिओमध्ये जमलो होतो.. या गाण्याबद्दलची संपूर्ण हकीकत पुढच्या (७ ऑक्टोबर) लेखात..

aratiank@gmail.com