हत्ती, घोडा आणि उंट हे तीन बलाढय़ प्राणी, पण दृश्य रूपातले नाहीत तर अदृश्य रूपात आपल्या आतच आहेत. कर्तव्यनिष्ठेचा हत्ती आपल्याला ध्येयाच्या मार्गावर सरळ चालत ठेवण्यासाठी आणि वाटेत येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी उपयोगी पडतो. तर काही वेळा तिरक्या रेषेत मुसंडी मारणारा उंट कामी येतो. परंतु काही वेळा ध्येयप्राप्तीच्या मार्गात अशा अनपेक्षित अडचणी येतात तेव्हा अडीच घरांचीचाल करू शकणारा म्हणजे अगदी चौकटीबाहेरचा विचार करणारा घोडा उपयोगी पडतो, हाच तो आपल्या आतला अदृश्य घोडा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लहानपणी आपण गोष्टी ऐकत असू. त्यात जंगलातले हत्ती, सिंह, ससा, असे प्राणी असायचे आणि ते माणसासारखे बोलायचे. मग सिंह असे म्हणाला, त्यावर कोल्हय़ाने असे उत्तर दिले वगैरे वगैरे. सगळे प्राणी आपल्यासारखेच बोलतात हे लहानपणी खरं वाटायचं. आता कळतं की ते बोलणं प्रत्यक्ष नसून त्या प्राण्यांच्या बोलण्यातून लहान मुलांना विचार/शिक्षण दिलं जायचं. लहानपणाच्या गोष्टी आता गेल्या पण त्या प्राण्यांनी आपल्या मनात तेव्हा केलेलं घर अजून आहे. इसापनीतीतल्या गोष्टींबरोबरच इतिहासातल्या आणि विशेषत: पुराणातल्या गोष्टीही आपल्याला खूप आवडायच्या. कारण त्यातल्या अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या कल्पनाशक्तीला खाद्य पुरवायच्या. या सर्व गोष्टींतला राजा म्हणजे समुद्रमंथनाचा प्रसंग. मनातच कल्पना करायची की तो समुद्र किती मोठा; त्याला घुसळायचं म्हणजे किती मोठी रवी आणि किती मोठा दोर लागणार! सगळंच आश्चर्यकारक. त्या समुद्रमंथनातून निघणारी लक्ष्मी आणि अमृत ही सर्वात मोठी रत्ने. पण त्याबरोबरच उच्चैश्रवा नावाचा अतिवेगवान आणि उडणारा घोडा, ऐरावत नावाचा धवल वर्णाचा हत्ती (जो स्वर्गाधिपती इंद्राने स्वत:जवळ ठेवला) असे प्राणीसुद्धा निघाले. असे वैशिष्टय़पूर्ण प्राणी आपल्याजवळही असावेत असं आम्हा मुलांना तेव्हा वाटे.

आनंदाची गोष्ट म्हणजे अशा प्राण्यांपैकी हत्ती, घोडा आणि उंट हे प्राणी आपल्याजवळ आहेत. पण ते दृश्य रूपात बाहेर नाहीत तर अदृश्य रूपात आपल्या आतच आहेत. (कसे ते आपण पुढे पाहणारच आहोत.) ढोबळपणे विचार करता शाकाहारी असणारे हे तीनही प्राणी एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत हे लगेच जाणवतं. कारण प्रत्येकाची बलस्थानं वेगळी. म्हणजे हत्ती म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो जंगलामध्ये मोठमोठे लाकडांचे ओंडके सहज वाहून नेणारा महाकाय, बलशाली प्राणी. घोडा म्हणलं की ‘तगडक, तगडक’ करत जाणारा राजकुमार किंवा शिवाजीराजे डोळ्यांसमोर येतात. घोडा म्हणजे सर्व प्रकारच्या भौगोलिक प्रदेशातून प्रवास करू शकणारे आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अंतर कापणारे वाहन. यालाच अभियांत्रिकी भाषेत पॉवर म्हणतात. (हॉर्सपॉवर हा शब्द तर आपल्या चांगल्याच परिचयाचा आहे.) पण उंटाकडे पाहिलं की मात्र ‘बिच्चारा!’ असाच विचार मनात येतो. आकाराने फारसा सुबक किंवा देखणा नसलेल्या या प्राण्याचे कामही रूक्ष आणि उष्ण वाळवंटातून ये-जा करण्याचं असतं. उन्हातान्हातून, पाण्याविना महिनोन्महिने हा प्राणी पाठीवर वजन घेऊन चालत असतो. कारण दम आणि चिवटपणा हे त्याचं बलस्थान असतं.

अजून थोडा विचार केला तर हेही आठवेल की पूर्वीच्या युद्धात हे तीनही प्राणी वापरले जात असत. माणसाला जेव्हा हे जाणवलं की त्याची एकटय़ाची शक्ती, हातात शस्त्र घेऊनही, कमी पडत आहे तेव्हा त्याने प्रथम घोडा, मग हत्ती आणि प्रसंगी उंट यांचा उपयोग करून घ्यायला सुरवात केली. हत्तीची प्रचंड शक्ती, घोडय़ाची चपळता, वेग आणि डोंगर-दऱ्या अशा आडवाटेने जाण्याची क्षमता व उंटाची अत्यंत रूक्ष आणि उष्ण वाळवंटातही दूरवर मजल मारण्याची चिकाटी या सर्व गोष्टी माणसाला मिळाल्या आणि त्याची युद्धाची क्षमता वाढली. हत्तीच्या बाबतीत बोलायचं तर पूर्वी त्याला एक विशेष दर्जा होता. हत्ती म्हणजे श्रीमंती/संपत्तीचे प्रतीक. राजवाडय़ाच्या प्रवेशद्वाराशी दोन्ही बाजूंना हत्ती झुलत असत. हत्तीवरून विजयाची साखर वाटली जायची.

परंतु काळ बदलला. आजच्या यंत्रयुगात कोणत्याही देशातल्या राजाची मिरवणूक हत्तीवरून निघत नाही, की कोणी गावाला जायला घोडय़ावर बसून जात नाही आणि राजस्थानसारखे वाळवंटी प्रदेश सोडले तर कोणी ‘शहाणा’ माणूस उंटावरची सवारीही करत नाही. आता माणूस शहरी झाला आणि तो शरीरापेक्षा मन-बुद्धीचा जास्त उपयोग करू लागला. म्हणूनच मानवाच्या दृष्टीने आता हे तीनही प्राणी एकत्र असे बुद्धिबळातल्या पटावर उरले. परंतु तिथे त्यांच्या क्षमतेवर (खेळाचे) बंधन आले. त्यांच्या चाली मर्यादित झाल्या. तिथे सरळ मुसंडी मारणारा हत्ती, तिरक्या रेषेत बाणासारखा जाणारा उंट आणि आणि जेव्हा हे दोघेही कमी पडतात तेव्हा आपल्या विशिष्ट चालीने दौड करणारा घोडा आपल्याला विजय मिळवून द्यायला आपल्या हाताशी असतात. एवढय़ाने भागत नाही. वेळप्रसंगी अधिक शक्तिशाली वजीर यांनाही हस्तक्षेप करावा लागतो. सगळ्याचं उद्दिष्ट हे आपल्या राजाला संरक्षण देणे आणि आपले राज्य शाबूत ठेवणे हे असते.

हत्ती, घोडा आणि उंट हे तीन बलाढय़ प्राणी उपयोगी आहेत हे तर खरेच आणि लेखात वर म्हटल्याप्रमाणे ते आपल्या आतच आहेत, पण आता प्रश्न असा की ते आपल्या आत कसे राहतात? उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू या. बुद्धिबळाचा खेळ आणि आपलं आयुष्य यात बरच साम्य दिसतं. आपल्या आयुष्यात आपण राजा असतो आणि आपलं राज्य म्हणजे आपला आनंद. आपल्या आणि आपल्या राज्याच्या रक्षणासाठी आपल्याकडेही सरळ रेषेत आक्रमण करणारा हत्ती असतो. या हत्तीला म्हणतात कर्तव्यनिष्ठा. हा कर्तव्यनिष्ठेचा हत्ती आपल्याला आपल्या ध्येयाच्या मार्गावर सरळ चालत ठेवण्यासाठी आणि वाटेत येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी उपयोगी पडतो. परंतु काही वेळा सरळ वाटेने (किंवा मळलेल्या वाटेने) जाऊन काम होण्यासारखे नसते. म्हणजेच सरळ मार्गी जाणारा हत्ती उपयोगी पडू शकत नाही. तिथे काही तरी निराळा, तिरका विचार करावा लागतो. हाच आपला तिरक्या रेषेत मुसंडी मारणारा उंट. ते शक्तिमान हत्तीचे काम नाही. आपल्याला बाजीराव पेशवे यांचा अतुलनीय पराक्रम माहितीच आहे. प्रचंड शक्तिशाली मुघल सैन्याबरोबर सरळ पद्धतीने सामना करून चालणार नाही हे वेळीच ओळखून आणि रणनीती करून त्यांनी अशी तिरकी चाल केली हे तर आपल्याला माहितीच आहे. परंतु काही वेळा ध्येयप्राप्तीच्या मार्गात अशा अनपेक्षित अडचणी येतात की सरळ किंवा तिरका विचार करूनही उत्तर सापडत नाही. अशा वेळी ‘अडीच घरांची’ चाल करू शकणारा म्हणजे अगदी चौकटीबाहेरचा विचार, वेगळ्याच प्रकारचा विचार करावा लागतो. हाच आपला आतला अदृश्य घोडा. औरंगजेबाच्या प्रचंड शक्तीच्या पुढे मावळ्यांची संख्या आणि शक्तीची तुलना होऊ  शकत नव्हती. पण म्हणून काय झालं, युक्ती तर करता येते ना? ‘गनिमी कावा’ हीच ती युक्ती. घोडय़ाची हीच अडीच घरांची चाल वापरून शिवाजी महाराजांनी अनेक लढाया यशस्वी केल्या आणि हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघणेही अशक्य वाटत असताना त्याची स्थापना केली.

आपल्या आयुष्याचा आनंदाच्या वाटेवरचा प्रवास.. हा अनेक वळणा वळणांचा असून त्यात काही वेळा दिशा बदलते किंवा बदलावी लागते आणि या प्रवासामधूनच आपण शिकत जातो, उन्नत होत जातो आणि या बाबतीत उंट हा आपल्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास दाखवतो. तसेच उंट हा दूरवरचा प्रवास सूचित करतो. आपलं आयुष्य आणि त्याचं ध्येय गाठणं हाही एक लांबचा प्रवासच आहे. ‘काय हा खडतर प्रवास?’, ‘किती वेळ अजून असंच चालायचं?’ असे निराशाजनक विचार न करता उंट चालतच राहतो. आपणही आपलं मन या उंटावर स्वार केलं तर नक्कीच शहाणे ठरू. त्या उंटाची चिकाटी आपल्याला आयुष्यात काही तरी दिव्य कार्य करण्यास ऊर्जा देत राहील. उंटाचा अजून एक गुण म्हणजे काटकसर. काटकसर म्हणजे कंजूषपणा नव्हे तर आपल्यापाशी असलेल्या साधनसामुग्रीचा ‘एफिशियंट आणि शहाणपणाने केलेला उपयोग’. उंटाच्या विलक्षण चयापचयाने पाणी वापराचे नियोजन केले जाते आणि म्हणून वाळवंटी भागातही पाण्याविना कित्येक दिवस तो लांबचा प्रवास करू शकतो. व्यवस्थापनशास्त्राच्या भाषेत याला रिसोर्स मॅनेजमेंट म्हणतात.

अजून एक.. हा प्रतीकात्मक उंट जसा आपण आपल्याजवळ बाळगू शकतो तसाच हत्ती आणि घोडाही आपण आपल्याजवळ ठेवू शकतो. तो कसा म्हणाल तर (शरीराच्या आणि मनाच्या) व्यायामाने हत्तीइतकी नाही तर हत्तीप्रमाणे कोणतेही जड दिसणारे किंवा वाटणारे काम लीलया करू शकू इतकी शारीरिक (आणि मानसिक) तंदुरुस्ती आणि ताकद कमविणे म्हणजे आपला हत्ती. शिवाय बुद्धिदेवता गणेश याचे मुख हत्तीचेच आहे. त्यावर अधिक भाष्य करण्याची गरजच नाही. घोडा हा बुद्धीतली वेगळा विचार करण्याची क्षमता जशी दाखवतो तशीच इच्छाशक्ती- ‘विल पॉवर’ (हॉर्सपॉवर सारखी) ही सूचित करतो.

तेव्हा आता आयुष्याच्या प्रवासात आनंद हे आपलं ध्येय निश्चित आहे. ध्येय जरी सर्वाचं एकच असलं, तरी प्रत्येकाच्या स्वभावप्रवृत्तीनुसार मार्ग वेगवेगळे असू शकतील, नव्हे ते असतातच. पण आपला मार्ग कोणताही असला तरी प्रवास नक्कीच अंतिम ध्येयापर्यंत होणार हे नक्की, कारण आता आपल्याकडे एक नव्हे, दोन नव्हे तर तीन वैशिष्टय़पूर्ण वाहने आहेत. तेव्हा.. शुभास्ते पंथान: सन्तु!

health.myright@gmail.com

मराठीतील सर्व जगू आनंदे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chess game importance in our life
First published on: 05-11-2016 at 01:20 IST