हिवाळा, पावसाळा, उन्हाळा या ऋतूंत बागेतील झाडांची पाण्याची गरज ही वेगवेगळी असते. पावसाळ्यात पाऊस पडतच असतो. २ ते ३ दिवस अंतराने येणारा पाऊस, हवेतील तापमान, याचा विचार करूनच मग झाडांना पाणी द्यावे. पाऊस सलग व भुरभुर येत असल्यास व हवेत आद्र्रता असल्यास झाडांना पाण्याची गरज पडत नाही. भिजपावसात बागेतील जमीन, कुंडीतील माती चांगली भिजते, तर हिवाळ्यात सहसा एकदाच पाणी द्यावे. सकाळी, दिवसा दिलेले पाणी हे झाडांना अपायकारक ठरण्याची शक्यता असते, कारण दिवसभर वातावरणातील उष्णता वाढलेली असते. त्यामुळे कुंडय़ा, वाफे, जमीन तापते. आत गरजेपेक्षा अधिक वाफसा तयार झाल्यामुळे मुळ्या सडतात. हिवाळ्यात पाणी सायंकाळी द्यावे म्हणजे झाडे ही निवांतपणे पाणी ग्रहण करतात, तर उन्हाळ्यात दोनदा पाणी द्यावे. सायंकाळचे पाणी हे थोडे थांबून व जास्तीच द्यावे. बागेला, कुंडय़ांना रोज पाणी दिल्याने ती काहीशी आळशी म्हणजे त्यांची वाढ मंदावलेली जाणवते. रोजच्या वेळापत्रकात खूप सारा बदल न करता फक्त आठवडय़ातून एकदा एका वेळचे पाणी बागेला देऊ नये. पाण्याची देण्याची पाळी साधारणत: सायंकाळी तोडावी. सकाळी बागेची पाहाणी करून सकाळी मात्र पाणी द्यावे. पाणी तोडल्यामुळे झाडांवर पाण्याचा ताण पडतो. मातीत असलेला ओलावा कमी होतो. झाडांची प्रतिकार क्षमता वाढते. मुळे सक्रिय होतात. - संदीप चव्हाण, sandeepkchavan79@gmail.com