पती किंवा पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं माहीत असूनही केवळ घटस्फोट नको म्हणून वैवाहिक नातं अबाधित ठेवणाऱ्यांची संख्या जशी मोठी आहे, तसंच शारीरिक गरज महत्त्वाची मानून ‘ओपन मॅरेज’चा पुरस्कार करणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचं विविध पाहण्यांमधून अधोरेखित होतंय. या त्रिकोणाचे केवळ त्या तीन व्यक्तींवरच नव्हे, तर त्यांच्या अपत्यांवर आणि कुटुंबांवर होणारे गुंतागुंतीचे परिणाम लक्षात घेता, नवरा-बायकोने ‘मेड फॉर इच अदर’ होण्यापेक्षा ‘मोल्ड फॉर इच अदर’ असा दृष्टिकोन ठेवला तर वयाच्या कुठल्याही टप्प्यावर सूर गवसू शकतो.

प्रिया तेंडुलकर यांच्या ‘होतं असं कधी कधी’ या कथेत पस्तिशीच्या नायिकेच्या मागे एक बडा उद्योजक अगदी हात धुऊन लागलेला असतो. तीनेक लग्न केलेल्या त्याचं चारित्र्य उद्योगवर्तुळात भलतंच कुप्रसिद्ध आहे. आपल्या लग्नाला अकरा वर्ष झालेली असताना आणि आपल्याला सात वर्षांची मुलगी असताना या बंगाली बाबूला आपल्यासारख्या गृहिणीत नेमकं काय दिसलंय हे तिला काही केल्या कळत नाहीये; पण त्याच्याशी झालेलं संभाषण, त्याचे येणारे ब्लँक कॉल्स ती नवऱ्यापासून तिच्याही नकळत लपवायला लागलीय. सुरुवातीला पूर्णपणे एकतर्फी असलेलं हे प्रकरण दुतर्फा होतं की काय अशी शक्यता वाटण्यासारखी परिस्थिती व्हायला लागलीय..

Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
Loksatta explained What are the reasons for the fall of the rupee against the dollar and what are its consequences
गेल्या १० वर्षांत २८.३ टक्के घसरण… डॉलरपुढे रुपयाची घसरण आणखी कुठपर्यंत? कारणे काय? परिणाम काय?
Bird Flu Outbreak Signs & Symptoms, Treatment
बर्ड फ्लूचा धोका वाढला! चिकन खाण्याआधी ‘ही’ काळजी घ्याच; डॉक्टरांनी सांगितली आजाराची लक्षणे व उपचार
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

हलक्याफुलक्या बाजाची ही कथा सुखान्ताची असल्यानं ‘विपरीत’काही घडत नाही, पण संसाररूपी ‘ऑक्टोबर हीट’नं पुरते भाजून निघत असताना अशी ‘अफेअर’रूपी एखादी वाऱ्याची मंद झुळूक आली तर काय, हा प्रश्न आजच्या मुक्त नातेसंबंधांच्या युगात गैर ठरत नाही! या कथेचा पंचवीस-तीस वर्षांपूर्वीचा काळ बघता तो तेव्हाही अवास्तव ठरत नव्हता. मात्र विवाहबाह्य संबंधांचे परिणाम आणि त्यामुळे होणारं नुकसान याची पूर्ण कल्पना असूनही, मुळात वैवाहिक बंधनात असतानाही बाहेरच्या व्यक्तीबद्दल हे आकर्षण का वाटतं हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.

हेही वाचा… कलावंतांचे आनंद पर्यटन: प्रश्नांची उत्तरं शोधणारी भटकंती!

बहुतेक विवाहबाह्य संबंधांमागे बहुतांशी वैवाहिक नातेसंबंधांतील तोचतोचपणा आणि दुसरीकडे भिन्निलगी व्यक्तीबद्दलचं तीव्र स्वरूपाचं आकर्षण असतं. डॉ. प्रियरंजन नंदी यांच्या ‘One for Joy’ या पुस्तकात ‘सेव्हन इयर्स इच’ ही संकल्पना उलगडताना म्हटलंय, की लग्नानंतर नव्याची नवलाई असते तेव्हा श्रृंगारादरम्यान डोपामाईन आणि ऑक्सिटोसिन ही संप्रेरकं (cuddle hormones) मुबलक प्रमाणात स्रवत असतात; पण लग्नाला साधारण सात वर्ष झाली, की या संप्रेरकांचा स्रोत आटायला लागतो. थोडक्यात, नात्यात तोचतोपणा डोकावायला सुरुवात होते.

आपल्या पतीच्या विवाहबाह्य संबंधांनी त्रस्त असलेल्या एका चाळिशीच्या बाईंचा पंधरवडय़ापूर्वी ई-मेल आला. त्या लिहितात, ‘आमच्या लग्नाला १७ वर्ष झाली आहेत. आम्हाला दोन मुलं आहेत. माझी समस्या म्हणजे पतीचं वागणं. दुसऱ्या मुलाच्या जन्मापासून आमच्यात शरीरसंबंध नाहीत. पतीला माझ्याबरोबर संबंध ठेवताना लैंगिक ताठरता येत नाही, त्यामुळे गेली दहा वर्ष आमच्यात संबंध आलेले नाहीत; पण याच माझ्या नवऱ्याला मी सोडून दुसऱ्या स्त्रियांशी संबंध ठेवायला काहीच अडचण जाणवत नाही. हे सर्व मला अलीकडेच समजलं आहे आणि त्यामुळे मला नैराश्य आलं आहे. मला पतीव्यतिरिक्त दुसऱ्या कुणाबरोबर संबंध ठेवण्याची इच्छा नाही. मुलांचा विचार करता मला घटस्फोटही घ्यायचा नाहीये. पतीवर माझं प्रेम असल्यामुळे मी त्याला सोडूही शकत नाही. त्यानं त्याचं वागणं सुधारावं असं वाटतं, पण हे शक्य होईल का माहिती नाही. मी पतीबरोबर या सगळय़ा गोष्टींवर चर्चा केलीय. त्याचं म्हणणं आहे, की दारू किंवा अन्य व्यसनाप्रमाणेच या गोष्टीला घ्यावं आणि त्याला थोडी सूट देऊन संसार पुढे न्यावा. काय करू हे मला समजत नाही..’

या बाईंचं हे प्रकरण प्रातिनिधिक असलं, तरी अलीकडच्या काळात विवाहबाह्य संबंधांचं प्रमाण आणि त्यातली गुंतागुंत वाढलीय का, हा प्रश्न पडतो. विवाह समुपदेशक अ‍ॅड. शर्मिला पुराणिक या दाव्याला दुजोरा देताना सांगतात, ‘‘मी १९९५ पासून समुपदेशनाच्या क्षेत्रात आहे. साधारण २००५ पर्यंत पतीचे किंवा पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत ही गोष्ट जोडीदाराला कळली की त्याचं पर्यवसान हे हमखास घटस्फोटात व्हायचं; पण २००५ नंतरच्या काळात या प्रकारच्या नातेसंबंधांना नाइलाजानं का होईना, स्वीकारण्याची मानसिकता अनेक जोडप्यांची असल्याचं जाणवतं. माझ्याकडच्या एका प्रकरणात पतीनं खासगी डिटेक्टिव्हच्या मदतीनं पत्नीच्या अफेअरचा तपास लावला. या मुद्दय़ावर त्याला सहज घटस्फोट मिळू शकतो, पण मुलाचा विचार करून तो लग्न टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय.’’

एका जागतिक अभ्यासानुसार भारतीयांमध्ये घटस्फोट घेण्याचं प्रमाण नीचांकी आहे. घटस्फोटाकडे आजही बट्टा म्हणून बघण्याचा भारतीयांचा दृष्टिकोन हे यामागील प्रमुख कारण आहे, असं हा अभ्यास सांगतो. त्यामुळेही विवाहबाह्य संबंधांसारख्या वैवाहिक नात्याच्या मूळ पायाला तडा जाणाऱ्या घटनांनंतरही लग्न टिकवण्याला भारतीय जोडप्यांचं पहिलं प्राधान्य असतं का, असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो.

अमेरिकेचे लेखक मार्गारेट सी. अँडरसन हे खरं प्रेम आणि शारीरिक आकर्षणातला फरक उलगडताना स्पष्ट करतात, की खऱ्या प्रेमात तुम्ही जोडीदाराचं हित चिंतता. तर शारीरिक आकर्षणात तुम्हाला त्या माणसाचा केवळ शारीरिक सहवास कायम हवा असतो. विवाहबाह्य संबंध वाढताहेत, असं निरीक्षण नोंदवत काऊन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट रश्मी पटवर्धन नमूद करतात, ‘‘प्रेमभंगाइतकंच हल्ली विवाहबाह्य संबंधांना सहजपणे घेतलं जातंय असं दिसून येतंय. सेक्सकडे केवळ एक शारीरिक गरज म्हणून जी माणसं बघतात, त्यांच्या दृष्टीनं विवाहबाह्य संबंध सोपे असावेत. दुसरीकडे जोडीदारामध्ये वैचारिक प्रगल्भतेचा (Intellectual intimac) अभाव असल्यानं बाहेर ती शोधण्याच्या निमित्तानं अफेअर घडल्याचे प्रकारही वाढताना दिसताहेत.’’

वैवाहिक नातं त्रासदायक असेल आणि बाहेरून आधार मिळाला, तरी विवाहबाह्य संबंध होण्याची शक्यता वाढते, असं सांगून रश्मी म्हणतात, ‘‘सायकॉलॉजिस्ट रॉबर्ट स्टनबर्ग यांनी प्रेमाचं त्रिकोणी प्रारूप मांडताना त्यात ‘इंटिमसी’, ‘पॅशन’ आणि ‘कमिटमेंट’ या तीन मुख्य घटकांचा समावेश केला. प्रेमात ज्या जोडप्यांना या तिन्ही घटकांची सांगड घालता येते, ते विवाहबाह्य संबंधांत अडकत नसावेत. अल्पकालीन सुख की दीर्घकालीन समाधान, यापैकी आपण कशाची निवड करतो हे महत्त्वाचं ठरतं. मला वाटतं, की ‘मेड फॉर इच अदर’ होण्यापेक्षा ‘मोल्ड फॉर इच अदर’ असा दृष्टिकोन ठेवला तर वयाच्या कुठल्याही टप्प्यावर सूर गवसू शकतो.’’

अमेरिकेचे सायकॉलॉजिस्ट डॉ. डोरोथी टेनॉव्ह यांनी असंख्य प्रेमी युगुलांच्या वर्तनाचा अभ्यास केला. यानुसार रोमँटिक नात्यातील तीव्र ओढ ही सरासरी दोन वर्ष टिकते, तर लपूनछपून केलेलं अफेअर (secretive love affair) यापेक्षा थोडं अधिक काळ टिकतं.

डॉ. विजय नागास्वामी लिखित आणि डॉ. मोहना कुलकर्णी अनुवादित ‘अफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर..’ या पुस्तकात कामवासनेमुळे घडणाऱ्या विवाहबाह्य संबंधांचा उल्लेख ‘विजेचा लोळ प्रकरण’ असा करण्यात आलाय. या पुस्तकात नमूद केलंय- ‘एखाद्या व्यक्तीबद्दल प्रचंड कामुक विचार मनात येणं आणि तीव्र कामवासना जागृत होणं हे विवाहबाह्य शरीरसंबंध होण्याचं एक महत्त्वाचं कारण असतं. आपल्या विवाहित जोडीदाराबरोबरचे कामजीवन समाधानकारक असलं, तरीही एखाद्या वेळी आत्यंतिक शारीरिक आकर्षणामुळे अशा कामवासनेचा लोळ अंगावर येऊ शकतो आणि तो थोपवता न आल्यानं त्या व्यक्तीकडून असं जारकर्म होतं.’

हेही वाचा… सूर संवाद: उपशास्त्रीय गाण्यांचा अद्वितीय आनंद

आपल्याकडे आलेल्या तिशीच्या दोन वेगवेगळय़ा स्त्रियांच्या प्रकरणांविषयी माहिती देताना अ‍ॅड. शर्मिला सांगतात, ‘या दोन्ही केसमधलं साधम्र्य म्हणजे ‘पत्नीबरोबर भावनिक गुंतवणूक नाही, म्हणून मी अफेअर केलं,’ असं पतीचं म्हणणं आहे. यातली एक स्त्री तर पतीचं जिच्याबरोबर अफेअर आहे तिलाही भेटली. ‘तुमच्या नवऱ्याबरोबर माझे भावनिक बंध उत्तम असल्यानं आमचे शरीरसंबंधही समरसून होतात,’ असं थेट स्पष्टीकरण त्या स्त्रीनं तिला दिलं. दुसरीकडे पत्नीला आपल्या अफेअरबद्दल कळल्यामुळे तो पुरुष सगळं करूनही शिरजोर झालाय. ‘आपल्यातली भावनिक गुंतवणूक वाढवण्यासाठी तू प्रयत्न करायला हवेत,’ असा उपदेश तोच आता पत्नीला देतोय. या दोन्ही प्रकरणांतल्या स्त्रियांची घटस्फोटाची तयारी नाहीये. त्यामुळे त्यांची मोठीच कुचंबणा होतेय.’’

‘ग्लिडन’ या विवाहबाह्य संबंधांना वाहिलेल्या फ्रेंच डेटिंग अ‍ॅपची सेवा भारतात २०१७ मध्ये सुरू झाली. आज या अ‍ॅपवर २० लाखांहून अधिक भारतीय सक्रिय आहेत. यावरूनही विवाहाकडे पारंपरिक नैतिकतेच्या दृष्टिकोनातून बघण्यापेक्षा वर्तमानातल्या मुक्त, ‘ओपन मॅरेज’च्या दृष्टीनं बघण्याची ‘मिलेनियल जनरेशन’ची मानसिकता अधोरेखित होते.

लग्न आणि लग्नानंतरचं कामजीवन ही प्रत्येक जोडप्याची अत्यंत खासगी बाब असते. त्यामुळेच हे नातं निभावताना स्वत:ला आणि जोडीदाराला किती मोकळीक द्यायची, हा वैयक्तिक प्रश्न ठरतो; पण ‘ओपन मॅरेज’ ही संकल्पना कितीही ‘सॉर्टेड’ वाटत असली, तरी जिथे तिसऱ्या माणसाशी तुलना येते, वैवाहिक जोडीदाराशिवाय बाहेरची भावनिक- शारीरिक गुंतवणूक येते, तिथे वैवाहिक नात्याची फरफट अटळ ठरू शकते. कुठलंही व्यसन हे ते करून बघण्यापूर्वीच सुटण्याची शक्यता सर्वाधिक असते, असं म्हणतात. तसंच वैवाहिक सहजीवन अनेक गोष्टींना ताजंतवानं करता येऊच शकतं, तसं ते सावरता येत असेल तर मनाला संयमाची शिकवण देऊन, जाणारा तोलही सावरता येऊ शकतो.