६ जुलैचा चतुरंग चांगल्या धाटणी, बांधणीचा वाटला. खूप खूप धन्यवाद. आजोबा झाल्यामुळे ‘ठेवा बाळाला सुरक्षित’ हा डॉ. लिली जोशी यांचा लेख खूपच बोधकारक वाटला, आई घरात हजर नसल्यामुळे लहान बाळाला सांभाळण्यासाठी कशी काळजी घ्यावी, त्याला इजा होऊ नये यासाठी कशी आखणी करावी, हे चांगले समजले. ‘चतुरंग मैफली’त अरुण दाते यांनी आपले मनोगत खूपच सुंदर मांडलेले आहे. गाणे चिरंतर टिकविण्यासाठी त्यांनी त्याचे श्रेय कवी आणि संगीतकाराला दिले आहे, यात त्यांची आदरभावना समजते. या लेखातील सर्व फोटो मन प्रसन्न करतात. हे फोटो म्हणजे संगीतप्रेमींना एक पर्वणीच आहे. ‘तेजस्वी शलाका’ या रोहिणी गवाणकरांच्या लेखात येशूबाई सावरकर यांचा कणखर बाणा अनुभवायला मिळतो.
‘तंबाखू, सेक्स आणि चुकलेला बिरबल’ हा डॉ. शशांक सामक यांचा लेख बोधपूर्वक आणि माहितीपूर्वक होता तसेच प्रा. माधुरी शानभाग यांचा ‘अवकाश भरारीचा सुवर्णोत्सव’ हा लेख माहितीपूर्ण होता.
शरद वर्तक, अंधेरी, मुंबई.

भ्रमणध्वनीचा गैरवापर
डॉ. वर्षां दंडवते यांचा २७ जुलैच्या अंकातील ‘भ्रमणध्वनी – एक विसंवाद’ हा लेख वाचला आणि रस्त्यावर ऐकलेले अनेक सुसंवाद (?) आठवले.
एक बाई बँकेच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या राहून भ्रमणध्वनीवर मोठय़ाने कुणाशीतरी बोलत होत्या. ‘अगं, परवा आपल्याला लग्नाला जायचंच म्हणून मी आता बँकेतल्या लॉकरमधून दागिने काढायला आले आहे. तुझं कोणते कोणते दागिने काढून आणू ते सांग, कारण उद्या बँक बंद आहे.’ पलीकडच्या व्यक्तीला यांचा आवाज बरोबर ऐकू येत नसावा. कारण परत मोठय़ांदाच- आजूबाजूच्या दहा लोकांना ऐकू जाईल अशा आवाजात तोच प्रश्न दोनदा विचारला व हं, हं म्हणत फोन बंद करून आत बँकेत जाणार तोच मी त्यांना थांबवले. म्हटले, ‘अहो किती मोठय़ांदा ‘ही’ खाजगी गोष्ट बोलत होतात. तुम्ही, दहा लोकांना ऐकू जाईल अशा आवाजात? एखाद-दुसऱ्यानी बँकेतून परतताना तुमच्यावर पाळत ठेवली तर नको ते संकट ओढवेल ना?’ यावर त्या बाई पटकन मला म्हणाल्या, ‘अहो, मी मिस्टरना बोलावलंय इथे. आणि ते नाही आले तर सरळ रिक्षा पकडून घरी जाईन.’ मी तिला सावध करणं तिच्या दृष्टीने निर्थकच होते.
दुसरी घटना खोटं बोलण्याची. एक बाई नट्टापट्टा करून चित्रपटगृहाच्या आवारात शिरत शिरतच, भ्रमणध्वनीवरून बोलत होती, हा मॅडम, माझी तब्येत लई बिघडलीया. मी आत्ता दवाखान्यात चाललीया दवा घ्यायला. कामाला येणार नाय बरं आज.’ ती बहुतेक धुणं-भांडय़ाची कामे करणारी असावी व तिने मालकिणीला फोनवरून खोटेच कारण सांगितले असावे. फोन बंद करून तिने आपल्याबरोबरच्या मैत्रिणीच्या हातावर टाळी दिली व कशी बनवली मालकिणीला, अशा थाटात चित्रपटगृहात गडप झाली.
एक तरुण मित्राला मोबाइलवरून सांगत होता, अरे मी जरा बाहेर जातोय, पण घरच्यांना पंधरा-वीस मिनिटांनी फोन करून कळव. रमेश र्अजट मीटिंगला गेलाय, त्याला यायला उशीर होईल व त्याने फोन स्विचऑफ करून ठेवलाय. नाहीतर उगाच सारखा फोन करीत बसतात व मग नयनाशी मला धड बोलताही येत नाही. आपल्याबरोबर मित्रालाही खोटं बोलायला लावणारी अशी माणसं बघून मन उद्विग्न होतं. अरे घरची माणसं काळजीपोटीच फोन करत असतील ना? हा बेफिकीरपणा न पटणाराच आहे.
भ्रमणध्वनी आपल्या प्रगतीचे पाऊल आहे. महत्त्वाच्या कामासाठी, वेळी-अवेळी त्याचा उपयोग होतो हेही मान्य. पण काही वेळा ‘अतिपरिचयात अवज्ञा’ झाल्यासारखे वाटते.
– शुभदा कुळकर्णी, कुर्ला.

संगीताचे महत्त्व
डॉ. श्रुती पानसे यांचा ‘सुजाण पालकत्व’ या सदरात आलेला ‘संगीत देतं उद्दीपन’  (२० जुलै) हा लेख फार आवडला. संगीताचं महत्त्व त्यांनी फारच सुंदररीत्या समजावून सांगितले आहे. मुलांना अभ्यासात संगीत चांगलंच उपयोगी पडलं या मुद्दय़ाविषयी मी सहमत झाले. त्यांचा हा लेख पालकांनी वाचून मुलांमध्ये संगीताची आवड निर्माण केली तर ती त्यांच्या सर्वागीण विकासासाठी नक्कीच उपयोगी पडेल असे मला वाटते. मुलांनी रूक्ष वातावरणातच अभ्यास करावा, असा अट्टहास करणाऱ्या पालकांसाठी हा लेख फारच महत्त्वाचा आहे.
माझी एक मैत्रीण दंतरोगतज्ज्ञ आहे. तिला कायम तिच्या क्लिनिकमध्ये जुन्या गाण्याच्या सीडी ऐकायला आवडतात किंवा गाण्याशिवाय तिला तिचे कामच करता येत नाही असे म्हटले तरी चालेल. दाताच्या अवघड शस्त्रक्रिया गाणे चालू असताना कशी करू शकते याचे मला आश्चर्य वाटायचे, परंतु हा लेख वाचून कळले की, क्लिनिकमधील संगीतच तिला अवघड काम करण्यास मदत करते.
प्रौढांनासुद्धा हा लेख आयुष्यातील ताणतणाव कमी करण्यास मदत करेल.
– वैशाली अजय, अंधेरी.

घटस्फोट- स्त्रियांची मक्तेदारी?
८ जूनच्या ‘प्रतिसाद’मध्ये  एका ‘व्यथित’ पालकाने ‘घटस्फोट- मुलाचीही बाजू’ असा लेख लिहिला होता, त्या संबंधात  हा पत्रप्रपंच.
त्या ‘व्यथित पालकाने’ अक्षरश: उत्तमरीत्या मुलाची बाजू मांडली आहे. कारण समाजात अशा प्रकारे मुलाची बाजू मांडण्याचा कोणीही प्रयत्नच करताना दिसत नाही, पेपरमध्ये फक्त स्त्रियांविषयी, स्त्रियांच्या बाजूने व स्त्रियांवर होणारा अन्याय व स्त्रियांचा ‘हक्क’ याविषयीच लिहिलेले असते. खरं तर घरगुती हिंसाचारात आजकाल स्त्रियासुद्धा पुरुषांवर अत्याचार करतात, पण त्याला कोणीही प्रसिद्धी देत नाही किंवा त्याबद्दल कोठेही छापून येत नाही. पुरुषाला मन नसतं? भावना नसतात? आणि हे कोणी ठरवायचं? स्त्रियांनी?
आजच्या काळातल्या स्त्रियांनी व तिच्या पालकांनी घटस्फोट हा पतीकडून गलेलठ्ठ पोटगी उकळण्याचा एक ‘धंदाच’ करून टाकला आहे.
घटस्फोटात काय फक्त स्त्रीला व तिच्या पालकांनाच दु:ख होत असते काय? नाण्याची दुसरी बाजू असते हा विचारच कोणी समजून घेत नाही. भारतात आजकाल मदर्स डे, फादर्स डे, वूमन्स डे साजरे करण्याचे फॅड वाढले आहे. यामध्ये ‘मदर्स डे व वूमन्स डे’ला प्रत्येक पेपरमध्ये त्याबद्दल रकाने छापून येतात. मात्र ‘फादर्स डे व मेन्स डे’ याबद्दल मात्र फक्त छोटय़ाशा कॉलममध्ये व तेसुद्धा शेवटच्या पानावर छापून येते, हा कुठला न्याय?
घटस्फोटात जेवढी मुलीची व तिच्या पालकांची घालमेल होत असते तेवढीच घालमेल व फरफट मुलाची व त्याच्या पालकांचीसुद्धा होत असते, पण प्रत्येक वेळी मुलीचीच बाजू किती खरी यावर सगळीकडे लिहून येते व स्त्री म्हणून न्यायालयसुद्धा बऱ्याचदा स्त्रीच्या बाजूनेच कौल देते, असे मला वाटते. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे.  नाहीतर यापुढे सरकारने करत असलेल्या कायद्यामुळे पुरुषाला लुबाडणाऱ्या ‘संधीसाधू व धूर्त’ महिलांची संख्या खूप वाढण्याचा धोका आहे व याचा समाजावर खूपच वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे.
(मुलाचीही बाजू बरोबर असू शकते व त्याबद्दल आत्ता कोठे समाजात जागरूकता येत आहे. त्या व्यथित पालकाने किमान वाचा फोडली याबद्दल त्यांचे अभिनंदन.)
एक त्रस्त पत्नीपीडित पती