निरंजन मेढेकर

एका जागतिक आकडेवारीनुसार दर तीन मुलींमागे एक मुलगी, तर दर सहा मुलग्यांमागे एक मुलगा, हे वयाच्या अठराव्या वर्षांपर्यंत लैंगिक शोषणाला बळी पडलेले असतात. भारतात अशा मुलांचं प्रमाण १६ टक्के आहे आणि अनेकदा ही मुलं हे लैंगिक शोषण मनातच दाबून ठेवतात, कारण कुटुंबीय ऐकून घेणारे असतीलच असं नाही. करपलेल्या बालपणातील या दडपलेल्या भावना लग्नानंतर मात्र तीव्र भीतीच्या, नैराश्याच्या रूपात जोडीदाराबरोबरचं सहजीवनच होरपळून टाकतात. त्यावर वेळीच उपाय केला, तर मात्र या जोडप्यांचं आयुष्य सावरू शकतं.

Surya gochar 2024 in Taurus
सूर्याचा जबरदस्त प्रभाव! १४ जूनपर्यंत ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
Goa Police
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना
Budh Rahu Yuti 2024
१८ वर्षांनी एप्रिलमध्ये २ ग्रहांची महायुती; ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी? कोणाला मिळणार भरपूर पैसा?
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?

एका पन्नाशीच्या परिचितानं गप्पांदरम्यान लवकरच स्वत:च्या आयुष्यातील कटुगोड आठवणींवर पुस्तक लिहिणार असल्याचं सांगितलं. मला फारसं आश्चर्य वाटलं नाही, कारण एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखं नाटय़ त्यांच्या आयुष्यात अगदी ठासून भरलंय. चारचौघांसारखा संसार सुरू असताना सुरू झालेली व्यसनं, नंतर घटस्फोट, मग व्यसनांना कायमचा रामराम करत सुरू केलेली आयुष्याची दुसरी इिनग आणि आज आवडीच्या क्षेत्रात सुरू असलेली त्यांची मुशाफिरी! पण आयुष्यातल्या आपल्या सगळय़ा टोकाच्या भावनिक आंदोलनांचं, ठिसूळ नातेसंबंधांचं, मोडलेल्या संसाराचं आणि निर्णायक वळणांचं मूळ लहानपणीच्या काही घटनांमध्ये आहे, असं ते म्हणाले, तेव्हा मात्र ते पुढे काय सांगणारेत याचा अंदाज येईना. लहानपणी ओळखीच्या मुलांनी समलैंगिक संबंधांसाठी केलेल्या लैंगिक शोषणामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वावर कायमचा परिणाम झाला, असं ते म्हणाले तेव्हा बसलेला धक्का मोठा होता.

‘‘मी तेव्हा जेमतेम सात-आठ वर्षांचा होतो. माझ्या परीनं घरातल्यांसमोर आक्रस्ताळेपणा करत झाल्या प्रकाराबद्दल निषेध नोंदवायचा प्रयत्न करत होतो. पण चाळीसेक वर्षांपूर्वी पालकत्व आजच्यासारखं समंजस नव्हतं. मुलग्यांवर लैंगिक अत्याचार होऊ शकतो, याबद्दलही अज्ञानच होतं. पोरगं शिस्तीत वागत नाहीये म्हटल्यावर त्याला चोप द्यायचा, इतकंच आईवडिलांना कळायचं. त्यामुळे त्या नकळत्या वयात मनात जी असुरक्षितता निर्माण झाली, ती आता-आतापर्यंत माझा पिच्छा सोडत नव्हती. हे थेट कुणाला सांगू शकत नसल्यानं त्या प्रसंगाच्या आठवणींनी मन सतत पोखरत राहायचं. या सगळय़ाला आपणच कारणीभूत आहोत असं वाटून आयुष्यातली अनेक वर्ष मी न्यूनगंडात घालवली. लहान वयात ओळखीच्या व्यक्तींनी केलेल्या विश्वासघातानं मोठेपणीही दुसऱ्या कुणाशीच भावनिक बंध प्रस्थापित करायला मन तयार व्हायचं नाही. त्याचंच पर्यवसान मग व्यसनाधीनतेत आणि पत्नीबरोबरचं नातं तुटण्यात झालं, असं आता मागे वळून बघताना वाटतं,’’ बांध फुटल्यासारखे ते बोलत होते. 

बाललैंगिक अत्याचारांचं वाढतं प्रमाण, व्याप्ती बघता परिचितांमुळे किंवा त्रयस्थ व्यक्तींमुळे लहानपणी गुदरलेल्या लैंगिक अत्याचाराच्या गडद छाया प्रौढ वयातही राहतात का आणि त्याचा थेट परिणाम वैवाहिक कामजीवनावर होतो का, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. जागतिक संशोधनातील आकडेवारीनुसार दर तीन मुलींमागे एक मुलगी, तर दर सहा मुलग्यांमागे एक मुलगा, वयाच्या अठराव्या वर्षांपर्यंत लैंगिक शोषणाचे बळी ठरलेले असतात.

सायकियाट्रिस्ट आणि सेक्स थेरपिस्ट

डॉ. निकेत कासार सांगतात, ‘‘बाललैंगिक शोषणाच्या कटू आठवणींचा त्या मुलाच्या-मुलीच्या मनावर दीर्घकाळ परिणाम राहतो. त्यामुळे मानसशास्त्रीय आरोग्यावर आणि मोठेपणी जोडीदाराबरोबरच्या सहजीवनावरही परिणाम होऊ शकतो. कधी ते परिणाम लैंगिक समस्यांच्या स्वरूपात दिसून येतात, तर कधी नैराश्य, भावनिक अस्थिरतेसारखे किंवा मंत्रचळासारखे (ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर) स्वभावदोष, व्यसनाधीनता, या स्वरूपात ते प्रकट होतात. लहानपणी अत्याचार झाला असल्यास सेक्सबद्दलची भीती, तसंच प्रणय करताना येणारे अडथळे, अशा समस्या रुग्णांमध्ये दिसून येतात. स्त्रियांच्या बाबतीत विचार करता संभोगशूळ, योनीआकर्ष (vaginismus), म्हणजेच समागमादरम्यान योनीमार्गातील स्नायूंचं नकळत आकुंचन होण्याची समस्या मोठय़ा प्रमाणात दिसते. या समस्येत योनीचे स्नायू आखडल्यानं लिंगाचा योनीत प्रवेश होऊ शकत नाही, त्यामुळे वैवाहिक अपूर्ततेची (unconsummated marriage) समस्या उद्भवते.’’

आपल्याकडे आलेल्या एका प्रकरणासंदर्भात माहिती देताना विवाह समुपदेशक अ‍ॅड. शर्मिला पुराणिक सांगतात, ‘‘हे जोडपं उच्चविद्याविभूषित होतं. पण पती शारीरिक जवळीक साधत नाही, अशी पत्नीची तक्रार होती. समुपदेशनाच्या दोन-तीन सेशन्सनंतर याचं कारण उलगडलं. पती सहावीत असताना त्याच्या काकानं त्याचं लैंगिक शोषण केलं होतं. कुटुंब कर्मठ असल्यामुळे तो ही गोष्ट कुणालाही सांगू शकला नव्हता, पण त्या प्रसंगांचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. लग्नानंतर पत्नीबरोबर जवळीक साधताना ‘मला लहानपणी जो त्रास झाला, तो माझ्यामुळे पत्नीला होईल,’ अशी भीती त्याला वाटायची. आपला समाज लैंगिकतेसंदर्भात अजूनही पारंपरिकच असल्यानं तो हे पत्नीला विश्वासात घेऊन सांगू शकत नव्हता. परिणामी त्यांच्या नात्यात विनाकारण ताण निर्माण झाला होता.’’

या लेखाची तयारी करताना एलन बास आणि लॉरा डेव्हिस लिखित  The Courage to Heal: A Guide for Women Survivors of Child Sexual Abuse हे पुस्तक वाचनात आलं. मुलांचं लैंगिक शोषण हे प्रांत, देश, लिंग, धर्म यांच्या सीमारेषा ओलांडून जागतिक समस्या कशी आहे, हे त्यात अधोरेखित झालं आहेच, पण हे शोषण बहुतेकदा नात्यातल्या किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून होत असल्यामुळे त्याला वाचा फुटत नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. या पुस्तकाच्या लेखिकाद्वयींपैकी लॉरा यांच्या लहानपणी त्यांच्या ७० वर्षांच्या आजोबांनी त्यांचं लैंगिक शोषण केलं होतं.  वयाच्या पंचविशीपर्यंत ही गोष्ट कुणालाही न सांगितलेल्या लॉरा यांनी जेव्हा त्यांच्या आईला याविषयी सांगितलं, तेव्हा आईनंही आपल्या वडिलांची म्हणजे लॉराच्या आजोबांची बाजू घेत लॉरावरच दोषारोप कसे केले होते, हा प्रसंग त्यांनी प्रस्तावनेत नमूद केलाय. घरातल्या जवळच्या व्यक्तीकडून शोषण होत असल्यास आपले आईवडीलही आपल्यावर विश्वास ठेवतील का, हा प्रश्न मुलांना लहान वयात पडला तर तो गैर ठरत नाही, हे यावरून दिसून येतं. 

 सायकोथेरपिस्ट लतिका चौगुले सांगतात, ‘‘लहानपणी शोषण झालेल्या व्यक्तींचा वैवाहिक सहजीवनात शरीरसंबंध टाळण्याकडे कल असू शकतो किंवा त्यांना त्याविषयी घृणा असू शकते. पण व्यक्तीगणिक हे परिणाम बदलूही शकतात. नकळत्या वयात शोषण झालं असेल, तर बऱ्याचदा ते त्या व्यक्तीला त्या वेळी लक्षात आलेलं नसू शकतं. पण तान्हं बाळही इतकं संवेदनशील असतं, की त्याच्यापर्यंत भावना पोहोचू शकतात. एक वेळ मोठेपणी त्या व्यक्तीला तो कटू अनुभव आठवणार नाही, पण त्याचे व्रण हे मेंदूवर राहिलेले असू शकतात. बऱ्याचदा रुग्ण दुसऱ्या कुठल्यातरी समस्येसाठी समुपदेशनासाठी आलेला असतो. पण थेरपीदरम्यान अचानक ही घटना उफाळून वर येते. पूर्वीच्या काळी मुलांना अशा प्रसंगांत कुटुंबाचाही पानॉर्मंडीठबा नसायचा. त्यामुळे या घटनांचं संख्यात्मक प्रमाण उपलब्ध नाही. पण आताचे प्रौढ जेव्हा त्यांच्या बालपणी वाटय़ाला आलेले हे प्रसंग सांगतात, तेव्हा वाटतं की माणसं सगळय़ा काळात सारखीच आहेत. सुदैवानं आता जनजागृती वाढतेय आणि लोक तक्रार नोंदवण्यासाठी पुढे येताहेत.’’

‘नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स’च्या अभ्यासानुसार भारतात ५५ टक्के मुलांना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या शोषणाला तोंड द्यावं लागतं. यात मुलांवर होणाऱ्या शारीरिक नॉर्मंडीहसेचं प्रमाण २५ टक्के असलं, तरी त्याखालोखाल १६ टक्के मुलांना लैंगिक शोषणाचा सामना करावा लागतो. लहानपणी लैंगिक शोषण वाटय़ाला आल्यास त्या घटनेचं सार्वत्रिकीकरण करत ‘सगळेच पुरुष वाईट असतात’ किंवा ‘कुठलीच मोठी माणसं विश्वास ठेवण्याच्या पात्रतेची नसतात,’ अशी बोधात्मक चूक (cognitive error) प्रौढ व्यक्तींकडून होऊ शकते, हे सोदाहरण विशद करताना काउन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट रश्मी पटवर्धन सांगतात, ‘‘माझ्याकडे समुपदेशनसाठी     आलेल्या एका विवाहित स्त्रीला लग्नानंतर सासू-सासऱ्यांपासून वेगळं राहायचं होतं. तिच्या पूर्वेतिहासाची माहिती घेताना लहानपणी एकत्र कुटुंबात तिच्या काकानं तिचं लैंगिक शोषण केल्याचं तिनं नमूद केलं. वडिलांचा धाक असल्यानं इतक्या वर्षांत तिनं ही गोष्ट कुणाला सांगितली नव्हती. पण त्या घटनेचे आघात तिच्या मनावर खोलवर झाले होते. त्यामुळे इतक्या वर्षांनंतर जेव्हा काकाच्या वयाच्या सासऱ्यांबरोबर एका घरात राहण्याची वेळ आली, तेव्हा भूतकाळातील त्या प्रसंगांच्या आठवणींनी ती अस्वस्थ व्हायला लागली. अशा प्रकारे पतीबरोबर तिचे बंध उत्तम असले तरी वैवाहिक संबंधांत अडथळे यायला लागले.’’

बाललैंगिक अत्याचारांच्या स्मृती प्रौढपणीही पिच्छा सोडत नसल्या तरी योग्य उपचारांनी यावर मात करता येते, असा विश्वास या क्षेत्रातील तज्ज्ञ देतात. सायकियाट्रिस्ट डॉ. निकेत सांगतात, ‘‘वैवाहिक कामजीवनात काही समस्या असतील, तरी त्याचं एक कारण हे बालपणाशी निगडित असू शकतं. यावर मानसशास्त्रीय उपचार आहेतच, पण जोडप्यांमध्येही कामविषयक निकोप संवाद असायला हवा. तसा तो असला, की मग पती-पत्नी दोघंही डॉक्टरांची मदत घेऊ शकतात. Cognitive behavioral therapy (CBT), Eye movement desensitization and reprocessing (EMDR) या सायकॉलॉजिकल थेरपीज् ट्रॉमावर, नैराश्य, यांवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरतात.’’

आयुष्यातला सगळय़ात सुखाचा काळ म्हटलं तर बालपणाचा असतो. बालपण आनंदी असेल, तर त्या आठवणींचा ठेवा आयुष्यभर सोबत राहतो. पण लैंगिक अत्याचारांच्या कटू अनुभवांमुळे बालपण करपलं असेल, तर त्या वेदना मनातल्या खोल कप्प्यात गाडण्यापेक्षा या विषयातील तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी. भूतकाळ आपल्या हाती नसला, तरी वर्तमानावर त्याची काजळी येऊ न देणं निश्चित आपल्या हाती आहे. 

niranjan@soundsgreat.in