-संपदा जोगळेकर-कुळकर्णी
उधळलेल्या वासराच्या अवखळ ऊर्जेस योग्य चालना मिळेल अशी व्यवस्था करून त्याला शांत करणं एखाद्याच गुराख्याला जमावं! हेलन केलर ही विशेष मुलगी पुढे जगप्रसिद्ध कार्यकर्ती झाली, त्यालाही अॅन नामक अशीच एक कुशल शिक्षिका कारणीभूत ठरली. स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भागच असलेली लवचीकता खुबीनं वापरणारी अॅन आजच्या जगातही तितकीच कालसुसंगत आणि आवश्यक वाटते. हे मांडणारं वि.वा. शिरवाडकर आणि सदाशिव अमरापूरकर यांचं नाटक ‘किमयागार’ म्हणूनच महत्त्वाचं.

‘किमयागार’ हे नाटक १९९३ मध्ये लिहिलं ते लेखक वि.वा. शिरवाडकर आणि सदाशिव अमरापूरकर यांनी. अमेरिकेत १८८० मध्ये जन्मलेल्या हेलन केलर या अंध, मूक, कर्णबधिर असं तिहेरी अपंगत्व असणाऱ्या मुलीची आणि तिची शिक्षिका अॅन सुलेवान या दोघींची ही सत्यकथा. ही कथा आहे हट्टाविरुद्ध जिद्दीची! या सत्य घटनेवर १९६२ मध्ये ‘मिरॅकल वर्कर’ हा चित्रपट निर्माण झाला आणि त्यावरून हे नाटक लिहिलं गेलं. जवळजवळ ९० टक्के नाटक शिरवाडकरांनी लिहिलं आणि त्यानंतर त्यांच्या प्रकृति- अस्वास्थ्यामुळे पुढचं नाटक सदाशिव अमरापूरकर यांनी पूर्ण केलं.

हेलन केलर ८-९ वर्षांच्या असताना घडलेल्या घटनेवर बेतलेली ही गोष्ट. एक अतिशय सुंदर अशी कलाकृती त्यातून तयार झाली. त्या वेळी त्याचं दिग्दर्शन दीपा श्रीराम यांनी केलं होतं. छोट्या हेलनची भूमिका गडकरी आडनावाच्या (पहिलं नाव माझ्या विस्मृतीत गेलं आहे.) मुलीनं केली, तर अॅन या शिक्षिकेची भूमिका भक्ती बर्वे यांनी केली होती. पुढे २०१३ आणि २०१७ मध्ये या नाटकाचं दिग्दर्शन आणि अॅनची भूमिका मी केली, तर हेलनची भूमिका तृष्णिका शिंदे हिनं केली. पुन्हा २०२२ मध्ये ‘दूरदर्शन’च्या ‘सह्याद्री’ वाहिनीसाठी हे नाटक केलं, ते ‘सह्याद्री’च्या यूट्यूब वाहिनीवर पाहता येतं. त्यात हेलनची भूमिका राधा धारणे हिनं केली आहे. नाटकाचे अनेकदा प्रयोग होणं आणि अखेरीस त्याचं कायमसाठी झालेलं चित्रीकरण, ही मला महत्त्वाची गोष्ट वाटते. कलाकार, दिग्दर्शक म्हणून आव्हानात्मक तर ते आहेच, परंतु हे नाटक केवळ एक व्यक्तिगत कथानक नसून त्या विषयाची वैश्विक गरज आहे असं वाटतं.

आणखी वाचा-पाळी सुरूच झाली नाही तर?

बोलता येत नाही, ऐकू येत नाही आणि दिसत नाही, अशा हेलनची एक प्रकारची घुसमट होते. तिला काय म्हणायचंय हे जगाला कळत नाही आणि जग काय म्हणतं हे तिला कळत नाही! मग अशा मुलीसाठी त्या काळानुसार केवळ वेड्यांच्या इस्पितळात जागा असू शकते… परंतु त्याच वेळी एक शेवटचा उपाय म्हणून पार्किन्सनच्या अंध शाळेतली शिक्षिका अॅन सुलेवान हिला हेलनसाठी बोलावण्यात येतं. इथून नाटकाला कलाटणी मिळते. पहिल्या भेटीतच अॅनच्या लक्षात येतं, की हेलन अतिशय चाणाक्ष मुलगी आहे. जग तिला ओळखण्यात चूक करत आहे. हेलनमधल्या बुद्धीला आणि ऊर्जेला जर योग्य मार्गावर आणलं, तर ती उत्तम आयुष्य जगू शकते. परंतु तिचे केवळ लाड केले जात आहेत. आक्रस्ताळेपणा करून सर्व काही मनासारखं करता येतं, हे हेलनच्या बालसुलभ बुद्धीला कळतंय आणि तेच सोपं आयुष्य तिला आणि इतरांना योग्य वाटतं आहे.

प्रचंड बुद्धिमत्तेचं, जगाबद्दलच्या उत्सुकतेचं, ऊर्जेचं रूपांतर हेलनला आतून धडका मारतं आणि ती काही तरी वेगवान, चुकीचं कृत्य करत राहते. तिचं कुटुंब आणि भोवतीचा समाज तिला पूर्ण कंटाळतो आणि तिच्या अनिर्बंध उद्रेकी कारनाम्यांना बांध न घालता तात्पुरतं तिला खूश ठेवण्याचे उपाय करतो, तिला मनमानी करू देतो. अॅन सुलेवानला मात्र हे हेलनच्या आयुष्याचं मोठं नुकसान वाटतंय. हेलनच्या हट्टी होत चाललेल्या स्वभावाला ती प्रतिकार करते. हेलनच्या शारीरिक विध्वंसक आवेगाला ती त्याच पद्धतीनं उत्तर देते. तिचे अजिबात लाड करत नाही आणि सहानुभूती तर अजिबातच दाखवत नाही. मुख्य म्हणजे हेलनला शहाणं करायचं, तर तिला भाषा शिकवण्याचा प्रयत्न करते. हाताच्या स्पर्शानं ओळखता येईल अशी ‘साइन लँग्वेज’, स्पर्शाची भाषा शिकवते.

आणखी वाचा-तिचा पिलामधी जीव…

अर्थात हेलनला ती शत्रूच वाटू लागते. अॅनीला ती हरप्रकारे सतावत राहते. पण अॅनवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. ती तेवढ्याच सातत्यानं हेलनला शिस्त लावण्याचे तीव्र आणि टोकाचे प्रयोग करत राहते. हेलनच्या कुटुंबाला तिचे हे प्रयत्न दुष्टपणाचे आणि अविचारी वाटतात. अखेरीस केवळ १४ दिवसांच्या मुदतीपर्यंत तिनं प्रयत्न करावेत आणि नंतर हेलनच्या आयुष्यातून निघून जावं, असा फतवा ते काढतात. या काळादरम्यान झगडत झगडत का होईना, हेलन तिचं ऐकू लागते. स्पर्शाची भाषा हुशारीनं शिकू लागते. पण हा केवळ तिच्यासाठी हाताचा खेळ बनतो. याचा आयुष्यात नेमका उपयोग काय, हे काही तिच्या ध्यानात येत नाही. आपली माणसं सभोवती येताच पुन्हा ती मनमानी करू लागते. अॅनलाही कळत नाही की नेमके आपण हिच्यापर्यंत पोहोचतो आहोत की नाही?… अखेरीस १४ दिवसांच्या शेवटच्या दिवशी हातावर पाण्याचा स्पर्श होताच ती ‘वॉटर’ या शब्दाचा नकळत, अस्पष्ट उच्चार करते आणि इथेच हे नाटक संपतं.

या नाटकात तीन स्त्री व्यक्तिरेखा आहेत. एक केवळ माया करणंच जाणते, ती हेलनची आई. दुसरी जगात न वावरलेली, चाकोरीबद्ध आयुष्य जगणारी अशी हेलनला सांभाळणारी मावशी. आणि तिसरी व महत्त्वाची स्त्री म्हणजे प्रचंड जिद्दीची, समस्या सुटेपर्यंत सोडवणारी अॅन. हा प्रवास एका अनाथ मुलीपासून जगात महत्त्वाचं स्थान निर्माण करणाऱ्या मुलीपर्यंतचा आहे. अॅनला अनाथ म्हणून ‘अबला’ समजून समाजात पुरुषांनी सतावण्याचा प्रयत्न केलाय. स्त्री असल्यामुळे तिच्यात असणाऱ्या क्षमतेला कमी लेखलं आहे. परंतु समोर दिसणाऱ्या एका सत्यासाठी जिवाचं रान करणारी अॅन या सगळ्या अडथळ्यांना लाथ मारून पुढे जाते आणि हेलनलाही सर्व अडथळे दूर करण्यासाठी प्रवृत्त करते. तिच्या या कष्टांमुळेच हेलन एक सुज्ञ माणूस म्हणून घडते. पुढे महान समाजकार्यकर्ती होते. दिव्यांगांच्या प्रश्नांना समाजापुढे आणून त्यांचं आयुष्य सोपं कसं होईल यासाठी झगडणारी, एक मोठी कार्यप्रणाली उभी करणारी, जगभर याबद्दल सामंजस्य निर्माण करणारी, मनस्वी लेखन करणारी हेलन जगाला मिळते. ‘अतिविशेष स्त्री’ असं संबोधन तिला मिळतं. अॅन स्वत:च्या मृत्यूपर्यंत हेलनबरोबर सावलीसारखी राहते.

आणखी वाचा-स्त्री विश्व : स्त्रीचं ‘बार्बी’ शरीर

अॅननं हेलनच्या आयुष्याला जी कलाटणी दिली, ती स्त्रीत्वाची ताकदच आहे. सर्जनासाठी, एक अर्भक जन्माला घालण्यासाठी अत्यंत लवचीक असा अवयव स्त्रीकडे असतो- तो म्हणजे गर्भाशय. तसाच लवचीक तिचा स्वभाव असतो. या लवचीकतेत जे सामर्थ्य आहे, ते प्रचंड जिद्दीचं आहे. स्त्रीनं ते योग्य ठिकाणी वापरणं महत्त्वाचं असतं. अॅन आणि हेलनचं गुरू-शिष्येचं अनोखं नातं या नाटकात मांडलं आहे.

‘किमयागार’ आजच्या काळाचीही गरज आहे. पैशांसाठी वा आपल्या करिअरसाठी पाल्याला वेळ आणि प्रेम न देऊ शकणारे पालक त्यांचे अनाठायी लाड पुरवून स्वत:ची अपराधभावना कमी करतात. हातात संपर्कासाठी, ज्ञानासाठी नवनवी, आधुनिक गॅजेट्स देतात. या सर्व कारणांनी तरुण पिढी, लहान मुलंमुलीही आंधळी, बहिरी, मुकीच बनत आहेत, असं खूपदा वाटतं. वेळेचा अपव्यय, शरीराची हेळसांड, बुद्धीचा चुकीचा वापर, या सगळ्यामुळे त्यांना योग्य काय ते दिसत नाही, ऐकू येत नाही आणि कोणाशी बोलण्याची त्यांना गरजच वाटत नाही! हेही एक प्रकारचं अपंगत्वच! हे चित्र बघून वाटतं, की संपूर्ण समाजानं अॅनीसारखी कडक शिस्तीची शिक्षिका बनणं गरजेचं आहे! योग्य गोष्टीला ‘हो’ आणि अयोग्य गोष्टीला ‘नाही’ म्हणण्याची आवश्यकता आहे. मग हा नाटकाचा विषय कालातीत वाटतो. आजही तितकाच आवश्यक!

हे नाटक स्त्री, माणूस आणि सशक्त समाजाची घडवणूक या सर्वच पातळ्यांवर आदर्श आहे. काळावर आणि समाजावर किमया करणारं… किमयागार!

sampadajk@gmail.com