उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे बस आणि टॅम्पोच्या धडकेमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी ,रात्री साडे आठच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सचेंडी पोलिसांनी दिली आहे. जखमींना लाला लजपत राय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

“दोन वाहनांची धडक झाल्यानंतर बस पलटली. ही बस लखनऊवरुन दिल्ली जात होती. चार जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत,” अशी माहिती कानपूरचे पोलीस निरिक्षक मोहित अग्रवाल यांनी दिली. जखमी व्यक्तींनी ते कानापूर जिल्ह्यातील सचेंडी येथील असल्याचे सांगितले आहे. जखमीपैकी अनेकजण हे येथील बिस्कीटच्या कारखान्यामध्ये काम करणारे कामगार आहे. हे कामगार टेम्पोने कामासाठी कारखान्यामध्ये जात असतानाच हा अपघात झाल्याची माहिती मोहित यांनी दिली आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला तपास पोलीस करत आहे, असंही मोहित यांनी स्पष्ट केलं.

कानपूरचे पोलीस कमिश्नर असीम अरुण यांनी दिलेल्या माहितीनुसार एक खासगी बस कामगारांना उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथून गुजरातला घेऊ जात होती. या धडकेमध्ये टेम्पोत असणाऱ्या अनेकांना गंभीर दुखापत झालीय अशी माहिती अरुण यांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच दोन पोलीस स्थानकातील तुकड्या घटनास्थळी पोहचल्या आणि त्यांनी मदतकार्य सुरु केले. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी १० जणांचा दाखल करण्याआधीच मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. तर सात जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. इतर जखमींची अवस्थाही चिंताजनक असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीय.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताची दखळ घेतली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणात तातडीने मदत करण्याचे आणि जखमींवर उपचारासंदर्भातील निर्देश दिले आहेत. या अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त करतानाच मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येक दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. हा अपघात कशामुळे झाला याची चौकशी करुन आपल्याला अहवाल सादर करावा असे आदेश योगींनी दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही या अपघातामध्ये मरण पावलेल्यांना आणि जखमींना मदत जाहीर केलीय आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रधानमंत्री उत्तर प्रदेशमधील अपघातामध्ये मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नातलगांना राष्ट्रीय मदतनिधीमधून २ लाख रुपये देण्याची घोषणा केलीय. जखमींना ५० हजारांची मदत केली जाणार आहे,” असं म्हटलं आहे.

पोलिसांनी या अपघातामागील कारणं शोधण्यासाठी तपास सुरु केलाय.