नक्षलवादी संघटनांवर ज्याप्रमाणे बंदी घातली जाते. त्याचप्रमाणे कडवा विचार करणाऱया सनातन संस्थेसारख्या संघटनांवर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी कॉंग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी गुरुवारी राज्यसभेत केली. 
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा विषय दलवाई यांनी शून्यकाळात उपस्थित केला. कडवा विचार करणाऱया संघटना मुस्लिम समाजात आहेत. त्याचप्रमाणे इतर समाजातही आहेत. त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी करीत हुसेन दलवाई यांनी महाराष्ट्रातील परिस्थिती खूप गढूळ झाली आहे, याकडेही लक्ष वेधले.
हुसेन दलवाई यांच्यासह डॉ. भालचंद्र मुणगेकर, रजनी पाटील, वंदना चव्हाण, डॉ. जनार्दन वाघमारे यांनीही या विषयावर बोलण्यासाठी अध्यक्षांकडे मागणी केली होती. मात्र, वेळेअभावी केवळ दलवाई यांच्या मताशी सहमत असल्याचे सांगण्यास उपाध्यक्षांनी त्यांना परवानगी दिली.