पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला बुधवारी लंडनमध्ये अटक करण्यात आली. नीरव मोदीला अटक केल्यानंतर आता भारतात त्यावर प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. भाजपानेच नीरव मोदीला पळून जाण्यास मदत केली होती. तेच त्याला आता भारतात आणत आहेत. निवडणुकीसाठी नीरव मोदीला ते भारतात घेऊन येत आहेत. निवडणुकीनंतर ते (भाजपा) त्याला पुन्हा पाठवतील, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांनी केला आहे.

नीरव मोदीला लंडनमध्ये अटक केल्याचे माध्यमांनी सांगितल्यानंतर आझाद यांनी ही प्रतिक्रिया दिली. आर्थिक घोटाळा केलेल्या नीरव मोदीला पळून जाण्यात भाजपानेच मदत केल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

तत्पूर्वी, पोलिसांनी फरार नीरव मोदीला लंडनमधील हॉलबॉर्न मेट्रोल स्थानकावरून अटक केली. भारतात घोटाळा करुन फरार झालेल्या या उद्योगपतीविरोधात लंडनमधील वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. भारतात प्रत्यार्पण प्रकरणाची सुनावणी आता न्यायालयात केली जाणार आहे.