उत्तर प्रदेशात करोनामुळे झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीत फेरफार झाल्याचा आरोप करत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. योगी सरकार मृत्यूंचे आकडे नाही तर स्वताचे तोंड लपवत आहे, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली. त्यांनी ट्विट करत योगी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

अखिलेश यादव म्हणाले, “माहितीच्या आधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, असे दिसून आले आहे की, ३१ मार्च, २०२१ पर्यंत ९ महिन्यांत उत्तर प्रदेशातील २४ जिल्ह्यांमध्ये मृतांची संख्या सरकारच्या आकडेवारीपेक्षा ४३ पट जास्त आहे. त्यामुळे भाजप सरकार मृत्यूची आकडेवारी नव्हे तर आपले तोंड लपवत आहे.”

मे महिन्याच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशमध्ये गंगा नदीत शेकडो मृतदेह तरंगताना आढळून आले होते. तसेच नदीच्या काठांवर वाळूमध्ये गाडलेले हजारो मृतदेह बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये दिसून आलेले. यापैकी अनेकांचा मृत्यू करोनाने झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली. पैसे नसल्याने या मृतांच्या नातेवाईकांनी त्यांचे मृतदेह नदीकाठी पुरले किंवा नदीत वाहून दिले असा अंदाज व्यक्त करण्यात आला. या मृतदेहांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर देशातील प्रसारमाध्यमांबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसारमाध्यमांनीही त्यांची दखल घेतली होती.