दुसऱ्या धर्मातील पुरूषाशी लग्न केल्याने ८ वर्षांनी वडिलांनी मुलीची हत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील सिद्दार्थ नगर येथील चिल्हीया परिसरात रविवारी सायंकाळी घडला. याप्रकरणी ५५ वर्षीय वडिलांना अटक करण्यात आली आहे. २८ वर्षीय सुनीता तिच्या सासऱ्यांच्या घराबाहेर उभी असताना ही घटना घडली.

पोलीसांच्या म्हणण्यानुसार, सुनीता तिचा शेजारी अब्दुल मोतीन सोबत २०१३ ला मुंबईला पळून गेली. तिचे कुटुंबीय या नात्याच्या विरोधात होते. त्यांनी अब्दुलच्या विरोधात मुलीचे अपहरण केल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, अब्दुल आणि सुनीता हे दोघे प्रौढ असल्याने ही केस बंद करण्यात आली होती.

हेही वाचा- उत्तर प्रदेशमधील करोना रुग्णांचे मृतदेह गंगेच्या पाण्यासोबत पश्चिम बंगालमध्ये येतात : ममता बॅनर्जी

दरम्यान, तीन आठवड्यापूर्वी सुनीता तिचा नवरा आणि दोन मुलांसह गावात आले होते. ती तिच्या सासरी राहत होती. तीन दिवसानंतर अब्दुलचे सलूनचे दुकान असल्याने तो मुंबईला परत गेला. दरम्यान, सुनीता गावात राहिल्यावर तिचे वडिल विश्वनाथ शर्मा तिला वारंवार मुंबईत जाण्यासाठी दबाव टाकत होते. रविवारी सायंकाळी, सुनीता तिच्या घराबाहेर असल्याचे वडिलांनी पाहिले. तेव्हा तिला मुंबईस परत जाण्यास सांगितले. त्यांच्यात खूप भांडण झाले.

दरम्यान, विश्वनाथने सुनीताला दगडाने डोक्यात मारले आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. चिल्हीया पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यशवंत सिंग यांनी सांगितले. सुनीताच्या नवऱ्याने मुंबईहून फोन केल्यावर आम्हाला या घटनेबाबत समजले असल्याचे पोलीसांनी सांगितले. दरम्यान, तिच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.