‘उपरवास’ कादंबरीसाठी १९७७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळविणारे गुजरातचे ज्येष्ठ कादंबरीकार, कवी, समीक्षक रघुवीर चौधरी यांना प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ज्ञानपीठ निवड समितीने ५१व्या पुरस्कारासाठी चौधरी यांचे नाव निश्चित केले. गुजरातमध्ये बापुपुरा येथे ५ डिसेंबर १९३८ रोजी जन्मलेल्या चौधरी यांनी कादंबरी, कविता, नाटक अशा विविध साहित्यांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ‘संदेश’, ‘जन्मभूमी’, ‘निरीक्षक’ आणि ‘दिव्य भास्कर’ अशा विविध दैनिकांमध्ये स्तंभलेखक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. कादंबरी आणि कवितांच्या माध्यमातून लेखनाला सुरुवात करणाऱ्या चौधरी यांच्या ८० पुस्तकांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘तमाशा’ (१९६५) आणि ‘वृक्ष पतन्मा’ (१९८५) या कवितासंग्रहांच्या माध्यमातून चौधरी यांनी मांडलेल्या विविध कल्पना मानवी मनाला परिस्पर्श करणाऱ्या आहेत. ‘अर्मिता’ (१९६५) ही कादंबरी अस्तित्ववादाच्या संकल्पना मांडणारी आहे. ‘रुद्रमहालया’ (१९७८) आणि ‘सोमतीर्थ’ (१९९६) या कादंबऱ्याही ऐतिहासिक आणि लोकप्रिय ठरल्या. त्याचप्रमाणे ‘वेणू वात्सल’ (१९६७), ‘पूर्वरंग’, ‘लागणी’ (१९७६), ‘एक दाग अगल बे दाग पच्छल’ (२००९) या अन्य कादंबऱ्याही खूप प्रसिद्ध ठरल्या. १९८८ मध्ये चौधरी गुजरात विद्यापीठातून हिंदी विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले. १९९८ ते २००२ या कालावधीत साहित्य अकादमीमध्ये व्यवस्थापकीय कार्यकारिणीमध्येही ते कार्यरत होते. चौधरी यांनी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. २००२ ते २००४ या कालावधीत ते भारतीय चित्रपट महोत्सवात निवड समिती सदस्य म्हणून कार्यरत होते. १९६५ ते ७० या कालावधीत त्यांच्या विविध साहित्यकृतींना गुजरात सरकारकडून गौरविण्यात आले. त्यांनी गुजराती भाषेऐवजी प्रामुख्याने हिंदी भाषेत लिखाण केले. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळविणारे ते चौथे गुजराती साहित्यिक ठरले आहेत. याआधी उमा शंकर (१९६७), पन्नालाल पटेल (१९८५) आणि राजेंद्र शाह (२००१) या गुजराती साहित्यिकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. गेल्या वर्षी भालचंद्र नेमाडे यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.