देशी बनावटीची दारू प्यायल्यानंतर बिहारमध्ये एका रात्रीत ११ जणांना आपल्या प्राणांना मुकावे लागले. बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडला. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. अद्याप पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विषारी दारू प्यायल्यामुळे हे मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याला प्रशासनाकडून दुजोरा देण्यात आलेला नाही. मृत पावलेले सर्वजण नोनिया तोला भागात राहणारे असून, सर्वजण गरीब कुटुंबातील आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. मंगळवारी रात्री त्यांनी देशी बनावटीच्या दारूचे प्राशन केले होते. त्यानंतर रात्रीतून सर्वांनाच उलट्या, पोटदुखी, अतिसाराचा त्रास होऊ लागला. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. पाच जणांवर अद्याप उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. गोपाळगंजचे जिल्हाधिकारी राहुल कुमार यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमली असून, समितीला लवकरात लवकर अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पीडितांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे राहुल कुमार यांनी सांगितले. दरम्यान, गोपाळगंजचे पोलीस अधीक्षक रवि रंजन यांनी विषारी दारू प्यायल्यामुळे हे मृत्यू झाल्याची शक्यता फेटाळून लावली. ही अफवा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.