पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा गळाभेटीवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना टोला लगावला आहे. सभागृहात पहिल्यांदाच आपण अनेक गोष्टी अनुभवल्या सांगत गळाभेट आणि गळ्यात पडणं यातला फरक पहिल्यांदाच कळला असा टोमणा राहुल गांधींचं नाव न घेता मारला. पाच वर्षात कोणताही राजकीय भूंकप आला नाही असंही पुढे ते म्हणाले. नरेंद्र मोदींनी १६ व्या लोकसभेतील शेवटचं भाषण केलं. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

‘आम्ही ऐकत होतो की भूकंप येणार म्हणून…पण कोणताही भूकंप आला नाही. कधी विमानं उडवण्यात आली. पण आपल्या लोकशाहीची उंची इतकी मोठी आहे की कोणतंही विमान त्या उंचीपर्यंत जाऊ शकत नाही’, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना नरेंद्र मोदींनी राहुल गांधींनी घेतलेल्या गळाभेटीवरुन नाव न घेता टीका केली. ‘मी पहिल्यांदा येथे आलो तेव्हा अनेक गोष्टी नव्याने कळल्या. पहिल्यांदा मला गळाभेट आणि गळ्यात पडणं यामधील फरक कळला. पहिल्यांदाच पाहिलं की सभागृहात अनेकांची आँखो की गुस्ताखिया सुरु आहेत’, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी आणि मल्लिकार्जून खर्गे यांचं कौतुकही केलं. लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी अत्यंत योग्य पद्धतीने त्यांनी पेलली असल्याचं ते म्हणाले.