विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल हा खरं तर भाजपचा पराभव आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी केली. या पोटनिवडणुकांमध्ये भाजपने दहापैकी पाच जागा जिंकून आपले वर्चस्व राखले असले तरी याला भाजपचा विजय म्हणता येणार नाही. सत्ताधारी पक्षासाठी हे गौरवास्पद आहे का, असा सवाल चिदंबरम यांनी उपस्थित केला. यासाठी चिदंबरम यांनी मध्य प्रदेशात काँग्रेसकडून भाजपच्या झालेल्या पराभवाचा उल्लेख केला आहे. खरं तर हा प्रसारमाध्यमांतील बातम्यांचा मथळा असायला पाहिजे होता, असे चिदंबरम यांनी म्हटले. त्यामुळे आता भाजप चिदंबरम यांच्या या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, कर्नाटकमधील विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजपला मोठा धक्का बसला. कर्नाटकमध्ये पुढील वर्षी निवडणूका आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारला धक्का देण्याची रणनीती भाजपने आखली होती. त्यासाठी भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी.एस. येडीयुरप्पांनी नंजनगुड आणि गुंडलूपेट या दोन्ही मतदारसंघांमध्ये पंधरा दिवसांहून अधिक काळ तळ ठोकला होता. पण अखेर दोन्ही ठिकाणी काँग्रेसनेच बाजी मारली. या निकालाने सिद्धरामय्यांना विधानसभा निवडणुकीला तोंड देण्यास आणखी बळ मिळेल. ईव्हीएम मशीन्समध्ये घोटाळा न झाल्याने यश मिळाल्याची टिप्पणी सिद्धरामय्यांनी केली.

उत्तर प्रदेश, उत्तराखंडमधील विजयाची मालिका भाजपने आठ राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकांमध्येही चालू ठेवली. दहापैकी पाच जागा जिंकून भाजपने वर्चस्व टिकविले. मात्र, भाजपच्या नाकावर टिच्चून कर्नाटकमध्ये काँग्रेसने दोन्हीच्या दोन्ही जागा मिळविल्या. पण सर्वांत धक्कादायक निकाल लागला तो दिल्लीमध्ये. तिथे आम आदमी पक्षाच्या उमेदवारावर थेट अनामत रक्कम जप्त होण्याची वेळ आली.