संपत्तीच्या वादातून ४५ वर्षीय इसमाने आपल्याच परिवारातील ६ जणांचा खून केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. लखनऊ पासून काही किलोमिटर अंतरावर असलेल्या गोडावली गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. घरातील धारदार शस्त्र आणि गावठी पिस्तूलाच्या सहाय्याने आरोपी अजय सिंहने आपले आई-वडील, भाऊ-वहिनी आणि त्यांच्या दोन मुलांची हत्या केली. महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकारात अजय सिंह यांचा २० वर्षीय मुलगा अविनाशनेही त्यांची साथ दिली. हा प्रकार घडल्यानंतर दोन्ही आरोपी स्थानिक पोलीस ठाण्यात शरण गेले आहेत.

लखनऊ शहराचे पोलीस आयुक्त यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, संपत्तीच्या वादातून हे हत्यांकांड झालेलं आहे. आरोपी अजयचे वडील अमर सिंह यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनीचा तुकडा हा आरोपी अजय सिंह याच्या नावे न करत आपला दुसरा मुलगा अरुण याच्या नावे केली. याच रागातून हे हत्यांकाड घडल्याचं समजतं आहे. पोलिसांनी आरोपीकडून हत्येसाठी वापरण्यात आलेलं शस्त्र आणि गावठी पिस्तूल जप्त केलं आहे. पोलीस तपासात आरोपीने आपला गुन्हा मान्य केला आहे. आपले वडिल व पत्नी यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. याचसोबत आपले वडिल आपल्याला बाजूला ठेवून संपत्तीची वाटणी करणार असल्याचाही संशय आरोपीच्या मनात होता. या रागातूनच हा प्रकार केल्याचं आरोपीने मान्य केलं.

आरोपीने सर्वप्रथम शेतात जाऊन आपल्या वडिलांचा गळा कापत त्यांची हत्या केली. यानंतर घरी परतलेल्या आरोपीने आई, आपला भाऊ त्याची पत्नी व दोन लहान मुलांचाही जीव घेतला. या सर्व प्रकारात आरोपीचा मुलगा अविनाशनेही त्याची साथ दिली. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.