रिलायन्समुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक वायूच्या किंमतींच्या मुद्द्यावर मौन बाळगून असणा-या राहुल गांधींनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप असणा-या नेत्यांना काँग्रेस पक्ष उमेदवारी देणार का असा सवाल आम आदमी पक्षाकडून राहुल गांधी यांना विचारण्यात आला आहे. आपचे राष्ट्रीय नेते अरविंद केजरीवाल यांनी राहुल गांधी आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना लिहलेल्या पत्रात अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी देशाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या नैसर्गिक वायूच्या किंमतीच्या मुद्द्यावर मौन का बाळगून आहेत?
सरकार घेत असलेले अनेक निर्णय गांधी घराण्याच्या संमतीशिवाय होत नाहीत. मुकेश अंबानी यांनी ८रूपये प्रतिडॉलर दराने नैसर्गिक वायूची विक्री करायची ठरवल्यास त्यांच्या निर्णयाला तुमचा पाठिंबा असेल का?
मुकेश अंबानी पैशाच्या बळावर युपीए सरकारला निर्णय बदलण्यास भाग पाडतात असे बोलले जाते. जेव्हा दिल्ली सरकारतर्फे मुकेश अंबानी आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या निर्णयाला काँग्रेस नेत्यांनी विरोध का केला?
गॅसच्या किंमतीमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय निवडणुकांपूर्वीच्या काळात जाणूनबुजून घेण्यात आला. यासाठी मुकेश अंबानी यांनी काँग्रेस पक्षाला केलेली आर्थिक मदत जबाबदार आहे का ?
आप सरकारने भ्रष्टाचार विरोधी शाखेतर्फे मुकेश अंबानी यांची चौकशी करण्याचे ठरविले असता काँग्रेस आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्याविरोधात आक्षेप का घेतला? यासाठी मुकेश अंबानी आणि पक्षांमधील ‘आर्थिक ऋणानुबंध’ कारणीभूत आहेत का?