भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते जी व्ही एल नरसिंह राव यांच्या कारने शुक्रवारी दोन पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून आणखी एक महिला जखमी झाली आहे. आंध्र प्रदेशमध्ये ही घटना घडली असून अपघातानंतर जमाव संतप्त झाला होता. जमावाचा पवित्रा पाहता खासदारांनी तिथून काढता पाय घेतला. अपघातानंतर खासदार तिथून निघून गेल्याने सोशल मीडियावर राव यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

शुक्रवारी खासदार जी व्ही एल नरसिंह राव हे प्रकाशम जिल्ह्यातून विजयवाडा येथे जात होते. राष्ट्रीय महामार्गावर कोलनूकोंडा येथे दोन महिला रस्ता ओलांडत होत्या. या महिलांना राव यांच्या कारने धडक दिली. यानंतर कार दुभाजकावर जाऊन आदळली आणि तिथेच थांबली. ही धडक इतकी भीषण होती की एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली. अपघाताचे वृत्त समजताच दोन्ही महिलांचे नातेवाईक व ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. जमावाच्या संतप्त भावना पाहता राव यांनी घटनास्थळावरुन काढता पाय घेतला. दुसऱ्या कारमधून ते मार्गस्थ झाले. तर पोलिसांनी त्यांच्या चालकाला अटक केली. सदोष मनुष्यवधाप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर या अपघातावरुन राव यांच्यावर टीका होत आहे. जखमींना मदत करण्याऐवजी खासदार तिथून निघून गेले. हा दुर्दैवी प्रकार असल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.

घटनेवर राव यांनी देखील ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. ‘अपघात झाला त्यावेळी मी मागच्या सीटवर झोपलो होतो. पोलीस तिथे येईपर्यंत आणि जखमींना रुग्णालयात नेईपर्यंत मी घटनास्थळीच होतो. जवळपास ४५ मिनिटे मी तिथेच होतो. लवकरच मी दोन्ही कुटुंबाची भेट घेणार आहे, असे त्यांनी सांगितले.