उत्तर प्रदेशातील बरेली येथे राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात २२ प्रवाशांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस गोंडा जिल्ह्याच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. यावेळी बस आणि ट्रकची जोरदार टक्कर झाली. यानंतर पेट्रोल टँक फुटल्याने दोन्ही वाहनांनी लगेचच पेट घेतला. या आगीत बसमधील २२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर १५ प्रवाशी जखमी झाले आहेत. यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामन दलाची गाडी घटनास्थळी लगेचच दाखल झाली.  मात्र, आग इतकी भीषण होती की ती विझवण्यासाठी बराच काळ लागला. हा अपघात नेमका कसा घडला, याची माहिती अद्यापपर्यंत मिळालेली नाही. अपघातग्रस्त बस राज्य परिवहन मंडळाची असून ही बस गोंडा जिल्ह्याच्या दिशेने जात होती.