१५ एप्रिलच्या रात्री प्रयागराजच्या कॅल्विन रूग्णालयाच्या बाहेर जे काही झालं ते मीडियाच्या कॅमेरातून सगळ्या जगाने पाहिलं. हो बरोबर अतिक अहमद आणि अशरफ या दोघांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली ECfती घटना सगळ्या जगाने पाहिली. अतिक आणि अशरफ यांना वैद्यकीय चाचणीसाठी आणण्यात जात असतानाच या दोघांची हत्या करण्यात आली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात तिघेजण शिरले आणि त्यांनी पोलिसांचं कडं असूनही या दोघांवर गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यांना ठार करण्यात आलं. या हत्येला ४५ तासांपेक्षा जास्त कालावधी उलटलाय. तरीही काही प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरीतच आहेत. अतिक आणि अशरफ या दोघांच्या हत्येचा कट रचला गेला का? हा प्रमुख प्रश्न आहे. कारण या दोघांना ठार करणारे तीन हल्लेखोर विविध भागातून प्रयागराजला पोहचले होते. या तिघांनी जय श्रीरामचे नारे दिले. हत्या केल्यानंतर तातडीने बंदूक फेकून देत आत्मसमर्पण केलं. त्यामुळे यामागे फुलप्रुफ प्लान करून कट रचला गेला का? हा प्रश्न आहेच. ज्या तिघांनी अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची हत्या केली त्यांनी सांगितलेलं कारण हे चक्रावून टाकणारं आहे. अतिक आणि अशरफ या दोघांची हत्या करून आम्हाला प्रसिद्ध व्हायचं होतं हे या दोघांनी सांगितलं आहे. एवढे पोलीस असतील असं या हल्लेखोरांना वाटलं नसेल. हल्ला केल्यानंतर आपण चारही बाजूने घेरले जाऊ असं या तिघांना वाटलंही नसेल. अशात कुठले सहा प्रश्न अनुत्तरीत आहेत हे आपण जाणून घेऊ. काय आहेत अतिकच्या हत्येनंतरचे प्रश्न? १) प्रयागराजमध्ये अतिक आणि अशरफवर हल्ला करणारे हल्लेखोर कसे जमले? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सनी सिंह हा हमीरपूरचा आहे. लवलेश तिवारी बांदा या ठिकाणी राहतो तर तिसरा हल्लेखोर अरूण मौर्य कासगंजचा आहे. या तिघांचं वय फार तर १८ ते २० वर्षे असेल. हे तिघे एकत्र कसे आले? त्यांनी अतिकचीच हत्या का केली? हा प्रश्न कायम आहे. २) विदेशी पिस्तुल कुठून आलं? अतिक आणि अशरफवर हल्ला करणाऱ्यांकडे आधुनिक बनावटीचं पिस्तुल होतं. या अत्याधुनिक पिस्तुलमधून तातडीने गोळ्या चालवण्यात आल्या. आता प्रश्न हा आहे की हे पिस्तुल यांच्याकडे आलं कुठून? हे पिस्तुल मेड इन तुर्कस्तान आहे ते या मारेकऱ्यांपर्यंत कसं पोहचलं? लॉजिस्किट आणि लोकल सपोर्ट कुठून मिळाला? अतिक आणि अशरफ या दोघांनाही मारण्यासाठी मारेकरी पत्रकाराच्या वेषात आले होते. त्यांच्याकडे बनावट आयकार्ड, बनावट माईक आणि डमी कॅमेराही होता. हे तिघेही हत्येच्या आधी विविध शहरांमधून येत प्रयागराजच्या एका हॉटेलमध्ये थांबले होते. आता प्रश्न हेदेखील आहे की हे सगळं हल्लेखोरांनी कुणाच्या सांगण्यावरून केलं? अतिक अहमदला मारल्यावर घोषणाबाजी का? ४) आतिक आणि अशरफ या दोघांची हत्या झाल्यानंतर या हल्लेखोरांनी जय श्रीरामचे नारे का दिले? हे नारे देण्यामागे त्या तिघांचा काय उद्देश होता? हे कारणही समजलेलं नाही. ५) याच प्रकरणातला पाचवा प्रश्न असा आहे की हे तीन आरोपी हत्या करायला आले होते तर मग हत्या झाल्यानंतर या तिघांनीही आत्मसमर्पण का केलं? या तिघांनाही असं वाटलं होतं का की पोलीस इथेच आपल्यावर गोळ्या झाडण्यात येतील असं या तिघांना वाटलं होतं का? याचं उत्तरही मिळायचं आहे. ६)अतिक आणि अशरफ या दोघांची रेकी या तिघांनी कधी केली? कारण हल्लेखोरांच्या सांगण्यानुसार अतिक आणि अशरफला मेडिकलला आणलं जाईल त्याचवेळी ठार करायचं हे या तिघांचं ठरलं होतं. मात्र यासाठी त्यांनी रेकी कशी काय केली? असाही प्रश्न पोलिसांसमोर आहे. या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने पोलीस चौकशी करत आहेत. त्यात त्यांना कसं यश मिळणार आणि काय काय माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.