लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे प्रतिपादन अण्वस्त्रसज्ज शेजाऱ्यांबरोबरच्या वादग्रस्त सीमा आणि छुप्या युद्धामुळे (प्रॉक्सी वॉर) सुरक्षा यंत्रणा, साधनांवर ताण पडत आहे, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी गुरुवारी केले़ चीन आणि पाकिस्तान यांचा नामोल्लेख टाळत जनरल नरवणे यांनी एका चर्चासत्रात बोलताना राष्ट्रीय सुरक्षेपुढील आव्हानांवर भाष्य केले़ ‘‘भारताला भविष्यातील संघर्षांची झलक आधीच पाहायला मिळाली आहे़ शत्रुराष्ट्रे त्यांची सामरिक उद्दिष्टे साध्य करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवणार आहेत़ भारत असाधारण, मोठ्या आणि बहुआयामी सुरक्षाविषयक आव्हानांचा सामना करत आहे़ सीमांवरील घडामोडींमुळे, देशाची अखंडता व सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज व सक्षम फौजांची गरज पुरेशी अधोरेखित झाली आहे’, असे लष्करप्रमुख म्हणाले. ‘‘भविष्यातील संघर्षाची चुणूक अनेक क्षेत्रांत दिसते़ माहिती-तंत्रज्ञान, नेटवर्क आणि सायबर क्षेत्रासह अनेक क्षेत्रांत हा संघर्ष दिसत आहे़ त्याआधारे भविष्यातील युद्धक्षेत्रावरील चित्राची कल्पना करणे आणि त्यानुरूप सज्जता हे आमचे काम आहे’, असेही लष्करप्रमुखांनी सांगितले. गलवान खोऱ्यात मृत्युमुखी चिनी सैनिकांची संख्या ४२ गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांबरोबरच्या संघर्षादरम्यान चीनच्या चार नव्हे, तर ४२ सैनिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिले आहे़ या संघर्षात आपल्या चारच सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा चीनने केला होता़ भारताचे त्यात २० जवान शहीद झाले होते़