एखाद्या वाहनाचा चालकच अकार्यक्षम असेल तर त्या गाडीचे भाग बदलूनही काहीच फायदा होत नाही, अशा शब्दांत बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. मोदी सरकारच्या दिल्लीत पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचे नेतृत्त्व अकार्यक्षम आणि अव्यवहारी असल्याचेही म्हटले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे मंत्रिमंडळ म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा क्लब’ एखाद्या वाहनाचा चालकच जर अकार्यक्षम, अकुशल आणि अव्यवहारी असेल तर त्या गाडीचे इंजिन, स्टेअरिंग, चाकं, क्लच, ब्रेक हे इतर भाग बदलून फायदा नसतो. अगदी नवीन गाडी घेतली तरी काहीच फरक पडत नाही, असे तेजस्वी यादव यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तेजस्वी यांचे हे ट्विट केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदल निरर्थक असल्याचे सुचवते. नितीशकुमारांवर भाजपचा विश्वासच नाही, लालूप्रसाद यादव यांची तिखट शब्दात टीका केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्यानिमित्ताने तेजस्वी यांनी महाआघाडीची साथ सोडून भाजपचा हात पकडणाऱ्या नितीश कुमार यांच्यावरही खोचक टीका केली. कालच्या मंत्रिमंडळ विस्तारात 'जदयू'सह एकाही घटकपक्षाला स्थान देण्यात आले नव्हते. याशिवाय, मंत्रिमडळातील नऊ नव्या चेहऱ्यांमध्ये राज कुमार सिंग आणि अश्विनी कुमार चौबे यांचा समावेश करण्यात आला. मात्र, हे दोन्हीही नेते नितीश कुमार व सुशील मोदी यांचे कट्टर विरोधक आहेत. यावरून पंतप्रधान मोदी नितीश कुमार आणि सुशील कुमार यांची बिलकूल पर्वा करत नसल्याचे दिसते, असा टोलाही तेजस्वी यांनी लगावला आहे. यापूर्वी काँग्रेसनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला होता. मंत्र्यांची कामगिरी हाच जर फेरबदल आणि विस्ताराचा निकष असेल तर सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे पंतप्रधानपद सोडावे अशी टीका राज्यसभेत काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केली होती. मागील तीन वर्षांमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कामगिरी सर्वात वाईट आहे. रोजगाराचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, जम्मू काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्था, नोटाबंदी हे आणि असे अनेक निर्णय आहेत ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरले आहेत. इतर मंत्र्यांच्या तुलनेत त्यांची कामगिरी सर्वात वाईट आहे, अशा स्थितीत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशीही मागणी गुलाम नबी आझाद यांनी म्हटले होते.