छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात काँग्रेसचे काही नेते मृत्युमुखी पडले असतानाच नक्षलवाद्यांना न घाबरता परिवर्तन यात्रा पुढे सुरू करण्याचे काँग्रेसने ठरवले आहे. जिराम घाटी जवळच्या केसलूर खेडय़ातून ही परिवर्तन यात्रा पुढे चालू होईल.  ही यात्रा पुन्हा सुरू झाल्यानंतर ६ जूनला सर्व जिल्हा मुख्यालयात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल, त्यांचा मुलगा दिनेश व माजी विरोधी पक्षनेते महेंद्र कर्मा, आमदार उदय मुदलियार यांच्यासह सर्व मृतांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. बस्तर जिल्ह्य़ातील बस्तर, दान्तेवाडा, विजापूर, नारायणपूर, सुकमा व कंकेर येथे मात्र श्रद्धांजलीचे कार्यक्रम होणार नाहीत.
दरम्यान, छत्तीसगड सरकारच्या बरखास्तीच्या मागणीसाठी राज्यातील काँग्रेसच्या आमदारांनी दबावतंत्र अवलंबिले असून प्रसंगी सामूहिक राजीनामे देण्याचा प्रस्ताव त्यांनी श्रेष्ठींसमोर मांडला आहे.