देशातील करोना संकटाचं भय कायम आहे. एकीकडे केंद्र-राज्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, करोनाच्या संसर्गाच्या प्रसाराला अद्यापही ब्रेक लागलेला नाही. देशात विक्रमी वाढ होत आहे. तर दुसरीकडे मृतांच्या आकड्यात कोणतीही घट होताना दिसत नाहीये. देशात गेल्या २४ तासांत ३,९२,४८८ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर साडेतीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. २४ तासांत देशात ३ लाख ९२ हजार ४८८ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर ३ हजार ६८९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याच कालावधीत देशभरात ३ लाख ७ हजार ८६५ हजार रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात सध्या ३३ लाख ४९ हजार ६४४ रुग्ण उपचार घेत आहेत. तर देशातील एकूण मृत्यूंची संख्या २ लाख १५ हजार ५४२ हजार इतकी झाली आहे.

देशात ऑक्सिजनअभावी ३० जणांचा मृत्यू

दिल्लीत शनिवारी एका रुग्णालयातील डॉक्टरसह १२ करोना रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला, तर गुजरातमध्ये एका रुग्णालयात लागलेल्या आगीत १८ जणांचा बळी गेला. त्यापैकी १६ करोना रुग्ण होते. दिल्लीस्थित बत्रा रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तेथील प्राणवायूचा साठा शनिवारी संपल्यामुळे आठ रुग्णांचा मृत्यू झाला. तर गुजरातच्या भडोच जिल्ह्यातील पटेल वेल्फेअर रुग्णालयात शनिवारी सकाळी घडली. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत दोन कर्मचारी आणि १६ करोना रुग्णांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रात ८०२ रूग्णांचा मृत्यू

राज्यात शनिवारी ८०२ रूग्णांचा मृत्यू झाला असून, ६३ हजार २८२ नवीन करोनाबाधित आढळून आले. सध्या राज्यातील मृत्यू दर १.४९ टक्के एवढा आहे. ६१ हजार ३२६ रुग्ण बरे देखील झाले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ३९,३०,३०२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८४.२४ टक्के आहे.