नवीन शिक्षण धोरण २०२० अंतर्गत मध्य प्रदेशमधील महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन अभ्यासक्रमाअंतर्गत बीएच्या पहिल्याव वर्षाच्या विद्यार्थ्यांना महाभारत, रामचरितमानस, योग आणि ध्यान यासंदर्भात शिकवलं जाणार आहे. नवीन अभ्यासक्रमानुसरा ‘श्री रामचरितमानस अप्लाइड फिलॉसफी’ हा पर्यायी विषय म्हणून ठेवण्यात आलाय. इंग्रजीच्या फाउंडेशन कोर्समध्ये पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना सी. राजगोपालचारी यांनी लिहिलेली महाभारताची प्रस्तावना शिकवली जाणार आहे. राज्याच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी इंग्रजी आणि हिंदीबरोबरच योग आणि ध्यान या दोन विषयांना तिसऱ्या फाउंडेशन कोर्सच्या रुपामध्ये शिकवलं जाणार आहे. यामध्ये ‘अमो ध्यान’ आणि मंत्रांसंदर्भातील अभ्यासाचा समावेश आहे.
श्री रामचरितमानसअंतर्गत असणाऱ्या धड्यांमध्ये भारतीय संस्कृतीचे मूळ या क्षेत्राशी संबंधित विषयांमध्ये अध्यात्मिकता आणि धर्म यासारख्या विषयांचा समावेश असणार आहे. ‘वेद, उपनिषदं आणि पुराणांचे चार युग’, ‘रामायण आणि श्री रामचरितमानसमधील फरक’ आणि ‘दिव्य अस्तित्वाचा अवतार’ हे विषयही शिकवले जाणार आहेत. नवीन अभ्यासक्रमानुसार हे विषय व्यक्तिमत्व विचार आणि चारित्र्य अधिक सक्षम बनवण्यासाठी शिवकण्यात येणार आहेत. प्रभू रामचंद्र त्यांच्या वडिलांच्या किती आज्ञेत होते यासंदर्भातही विद्यार्थ्यांना शिकवलं जाणार असल्याचं ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
विद्यार्थ्यांना श्री रामचंद्र हे किती कुशल अभियंता म्हणजेच इंजीनियर होते याचंही शिक्षण दिलं जाणार आहे. ‘राम सेतूची निर्मिती’ या विषयाअंतर्गत विद्यार्थ्यांना भगवान रामाकडे असणाऱ्या अभियांत्रिक ज्ञानाची माहिती करुन दिली जाणार आहे. रामाच्या इंजीनियरिंग गुणांबद्दल विद्यार्थ्यांना शिकवलं जाणार असल्याचं ‘हिंदुस्तान टाइम्स’ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. श्री रामचरितमानसबरोबर २४ पर्यायी विषय देण्यात आले असून यामध्ये मध्य प्रदेशातील उर्दू गाणी आणि उर्दू भाषा यांचाही समावेश आहे.
मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री मोहन यादव यांनी या विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आयुष्यातील मुल्यांबद्दल शिकवण देण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी याचा फायदा होईल असंही सांगितलं जात आहे. “आपण रामचरितमानस आणि महाभारताकडून बरंच काही शिकलोय. त्यामुळे विद्यार्थ्यांना सन्मान देणं म्हणजे काय आणि इतर मुल्यांसोबरतच जीवनामध्ये पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. आता आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवायचं नाहीय तर त्यांना महान व्यक्ती म्हणून विकसित करायचं आहे,” असं यादव यांनी म्हटलं आहे.
विरोधी पक्षांनी भाजपाकडून त्यांची विचारधारा अभ्यासक्रमांमध्ये थोपवली जात असल्याची टीका करण्यात आलीय. काँग्रेसचे नेैते पीसी शर्मा यांनी, “आमच्याकडून महाभारत, गीती आणि रामचरितमानस अभ्यासक्रमामध्ये शिकवण्याला काहीच विरोध नाहीय. मात्र विद्यार्थ्यांमध्ये सांप्रदायिक सद्भावना विकसित करण्यासाठी त्यांना अभ्यासक्रमामध्ये बायबल, कुरणा आणि गुरु ग्रंथ साहिबसारखे धार्मिक ग्रंथही शिकवले पाहिजेत. मात्र असं ते (सत्ताधारी) करणार नाही कारण ते त्यांच्या विचारधारेच्या विरोधात आहे,” असं म्हटलं आहे.