पालनपूरचा पालनहार..
पाटणा जिल्ह्य़ातील पालीगंज गावातील शेतकऱ्यांना माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी दिलेल्या शिकवणीची फळे मिळू लागली आहेत. कृषिविज्ञानाबाबत डॉ. कलाम यांनी सांगितलेल्या युक्तीच्या चार गोष्टींमुळे शेतकऱ्यांच्या सांपत्तिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे.
पालीगंजमधील शेतकऱ्यांच्या दारासमोर मोटार उभी राहिल्याचे चित्र पाहावयास मिळत असून दूरदर्शन संच आणि रेफ्रिजरेटरचा गारवाही त्यांच्या घरात अनुभवावयास मिळत आहे. गेल्या दहा वर्षांत कृषिक्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात तिपटीने वाढ झाली आहे.
डॉ. कलाम यांनी २००३ ते २०११ या कालावधीत पालीगंजला जवळपास चार वेळा भेट दिली. प्रत्येक वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि पीक कशा पद्धतीने वाढवावे याची शिकवण दिली, असे पालीगंज बितरणी कृषक समितीचे चिटणीस वाल्मीकी शर्मा यांनी सांगितले.
डॉ. कलाम हे पालीगंजला आले असतानाच नव्हे, तर शेतकऱ्यांनी चार वेळा राष्ट्रपती भवनात जाऊनही त्यांच्याशी चर्चा केली आणि कामाची माहिती करून घेतली. या क्षेत्राला आपली सेवा अर्पित केल्याने डॉ. कलाम यांना पालीगंजचे नागरिकत्व देण्याची योजनाही ग्रामस्थांनी आखली असल्याचे शर्मा म्हणाले.
डॉ. कलाम यांच्याकडून शास्त्रीय माहिती उपलब्ध झाल्याने आता शेतकरी एक एकर क्षेत्रातून २७ क्विण्टल धान्य पिकवू लागला आहे. त्यापूर्वी हे प्रमाण केवळ नऊ क्विण्टल इतकेच होते. त्याचप्रमाणे गव्हाच्या उत्पादनातही पाच क्विण्टलवरून प्रति एकर १२ क्विण्टल इतकी वाढ झाली आहे, असे समितीचे अध्यक्ष गोपाळसिंग यादव यांनी म्हटले आहे.
प्रमाणित बियाण्यांचे महत्त्व, पेरणीचा कालावधी आणि योग्य साठा याबाबत डॉ. कलाम यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती दिली. इतकेच नव्हे तर खरीप आणि रब्बी पिकांच्या हंगामाच्या मध्यंतराच्या कालावधीत वैद्यकीय उपयोगाच्या वनस्पतींची लागवड करण्यासही शेतकऱ्यांना माजी राष्ट्रपतींनी शिकविल्याचे शर्मा यांनी सांगितले. विज्ञानाची कास धरून कलाम यांनी समर्थ भारताचे स्वप्न प्रथम मांडले ते आता प्रत्यक्षात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.