भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरंट जारी केल्यानंतर पत्नी हसीन जहाँने न्यायव्यवस्थेचे आभार मानले आहेत. हसीन जहाँने गतवर्षी कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पश्चिम बंगालच्या अलीपूर कोर्टाने शमीविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. न्यायालयाने शमीला आत्मसमर्पण करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे.

“मी न्यायव्यवस्थेची आभारी आहे. मी जवळपास गेल्या एक वर्षापासून न्याय मिळवण्यासाठी झटत आहे. शमीला आपण खूप प्रभावशाली तसंच खूप मोठे क्रिकेटर आहोत असं वाटतं,” अशी प्रतिक्रिया हसीन जहाँ यांनी एएनआयशी बोलताना व्यक्त केली आहे.

“जर मी पश्चिम बंगालची नसते, जर ममता बॅनर्जी आमच्या मुख्यमंत्री नसत्या तर मी येथे सुरक्षित राहू शकले नसते. उत्तर प्रदेशातील अमरोहा पोलीस सतत मला आणि माझ्या मुलीला त्रास देत होते. पण सुदैवाने त्यांना यश मिळालं नाही,” असंही हसीन जहाँ यांनी म्हटलं आहे.

मोहम्मद शमीसोबत त्याचा भाऊ हसीद अहमद याच्याविरोधातही अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. न्यायालयाने आत्मसमर्पण करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली असून या कालावधीत शमी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करु शकतो असंही कोर्टाने म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप मोहम्मद शमीच्या पत्नीनं फेसबुकवरून केल्यानं गेल्यावर्षी एकच खळबळ उडाली. शमीची पत्नी हसीन जहाँने फेसबुकवर शमीच्या काही अश्लील चॅट्स आणि काही मुलींचे फोटोही अपलोड केले होते. यामुळे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. नागपूर, कोलकाता, कराची, काश्मीर आणि बेंगळुरुतील तरुणीचे शमीशी संबंध आहेत, असा आरोप त्याच्या पत्नीनं फेसबुक पोस्टद्वारे केला होता.

हसीन जहाँने केलेल्या आरोपांनंतर या दोघांचाही वाद चव्हाट्यावर आला. मोहम्मद शमी, त्याचा भाऊ, त्याची आई हे आपला छळ करत असल्याचाही आरोपही हसीन जहाँने केला होता. पैशांसाठी आपल्याला उपाशी ठेवले गेले, माझा मानसिक आणि शारिरीक छळ केला असाही आरोप हसीन जहाँने केला होता. आता या सगळ्या प्रकरणात पश्चिम बंगाल येथील अलीपूर कोर्टाने मोहम्मद शमी आणि त्याच्या भावाविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे.