केरळमधील कुन्नूर येथे नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज (रविवार) उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. याबरोबरच ४ आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले केरळ हे भारतातील पहिलेच राज्य ठरले आहे. कुन्नूर येथे सुमारे २००० एकर परिसरात हे विमानतळ उभारले असून यासाठी १८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. केरळमध्ये कुन्नूर विमानतळाशिवाय तिरुवनंतपुरम, कोच्ची आणि कोझिकोड हे आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या कार्यरत आहेत.

कुन्नूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लि.ची (केआयएएल) २००० प्रवाशांची क्षमता आहे. या विमानतळावरील रनवेची लांबी ही ३,०५० मीटर असून ती ४००० मीटरपर्यंत वाढवता येऊ शकते. विमानतळावर एअरोप्लेसचे संचालन सुरु करण्यात आले आहे. अबूधाबीसाठी येथून पहिल्या व्यावसायिक आंतरराष्ट्रीय विमानाने उड्डाण केले.

विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर काँग्रेस आणि भाजपाने या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. शबरीमला वादावरुन भाजपाने तर राज्य सरकारने माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमान चंडी यांना निमंत्रण न दिल्यामुळे काँग्रेसने बहिष्कार टाकला होता.

तत्कालीन मुख्यमंत्री ओमान चंडी यांच्या कार्यकाळातच विमानतळाचे ९० टक्के काम झाले होते. याचे सर्व श्रेय त्यांनाच जाते, असे मत काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केले. सुमारे १ लाख लोक या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते.