देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार आज थांबला. त्यानंतर येत्या मंगळवारी, २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. राज्यात १५ लोकसभा मतदारसंघांसाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. या सर्व मतदारसंघामध्ये आज प्रचार तोफा थंडावल्या. दरम्यान, रविवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उमेदवारांनी विविध प्रकारे मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

लोकसभा निवडणूक २०१९ साठी देशात ९ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यांपैकी राज्यात चार टप्प्यात मतदान पार पडणार आहे. निवडणूकीच्या आदर्श आचारसंहितेनुसार, मतदानापूर्वी ४८ तास आधी प्रचार थांबतो. त्यानुसार, तिसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संपला, या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील एकूण १५ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

तिसऱ्या टप्प्यामध्ये जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांमध्ये मंगळवारी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

रविवारीच प्रचार संपणार असल्याने सुट्टीचा दिवस साधत अनेक उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या. पदयात्रा, रोडशो त्याचबरोबर देवदर्शन याद्वारे उमेदवारांनी मतदार राजाला आणि देवालाही आपल्याला या लोकसभा २०१९च्या निवडणुकीत चांगले यश मिळू दे यासाठी साकडे घातले.