मध्य प्रदेशात गेल्या वर्षभरात शिकार व इतर कारणांमुळे तब्बल १६ वाघांचा मृत्यु झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यांपैकी बहुसंख्य वाघांचा मृत्यु नैसर्गिकरित्या झाल्याचे मध्य प्रदेश वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले असले, तरी सरकारच्या अपयशामुळेच या वाघांचा मृत्यु झाल्याचा आरोप या क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या एका स्वयंसेवी संस्थेने केला आहे.

एकेकाळी वाघांच्या सर्वाधिक संख्येसाठी ओळखल्या जाणाऱया मध्य प्रदेशाची आता सर्वाधिक वाघांचा निवास असलेल्या राज्यांच्या यादीमध्ये तिसऱया स्थानी घसरण झाली आहे. यास राज्य सरकारचे अपयश कारणीभूत असून, आठ वर्षांनंतरही वाघांच्या संरक्षणाच्या उद्देशार्थ घोषणा करण्यात आलेल्या विशेष पथकाची अद्याप स्थापना करण्यात आलेली नाही, असे प्रयत्न या स्वयंसेव संस्थेचे संचालक अजय दुबे यांनी सांगितले.

याशिवाय, राज्यात वाघांची शिकार करणाऱयांना शिक्षा होण्याचे प्रमाण देखील दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे. तस्करीसंदर्भात माहिती गोळा करण्याचे प्रमाण तर शून्य टक्के इतके असल्याचेही दुबे पुढे म्हणाले. दरम्यान, मध्य प्रदेश सरकारकडून याबाबत अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.