राजकोटच्या गेमिंग झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीची दखल गुजरात उच्च न्यायालयाने घेतली आहे. या आगीत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. न्यायमूर्ती बिरेन वैष्णव आणि न्यायमूर्ती देवन देसाई यांच्या विशेष खंडपीठाने रविवारी सकाळी राज्य सरकार आणि महापालिकांकडून अशा गेमिंग झोन आणि मनोरंजनाच्या सुविधा कोणत्या कायद्याच्या तरतुदींनुसार चालवण्यास परवानगी दिली आहे, याचा अहवाल मागवला आहे.

ही मानवनिर्मित आपत्ती

“राजकोट गेमिंग झोनने गुजरात कॉम्प्रिहेन्सिव्ह जनरल डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स (GDCR) मधील त्रुटींचा फायदा घेतल्याचे दिसून येते. यामुळे बेकायदा गेमिंग झोन तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला”, असे सूचित करणाऱ्या बातम्यांची दखल घेत खंडपीठाने ही मानवनिर्मित आपत्ती असल्याचं खंडपीठाने म्हटलं आहे.

हेही वाचा >> गुजरातच्या राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये भीषण आग; २७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये १२ चिमुरड्यांचा समावेश

“हे करमणूक झोन वृत्तपत्राने सुचविल्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांच्या आवश्यक मंजुरीशिवाय करण्यात आले आहेत. काही गुजराती वर्तमानपत्रे असेही सुचवतात की फायर एनओसीसह परवानग्या/एनओसी घेण्यावर मात करण्यासाठी आणि बांधकाम परवानगीसाठी, तात्पुरती संरचना तयार केली गेली आहे. जी वरवर पाहता टिन शेड आहेत. राजकोट शहराव्यतिरिक्त, अहमदाबाद शहरात सिंधू भवन रोड आणि एसपी रिंग रोडवर अशा प्रकारचे गेम झोन तयार झाले आहेत, ज्यामुळे सार्वजनिक सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे याची आम्ही दखल घेतो. अशा प्रकारचे गेम झोन/मनोरंजन उपक्रम परवानगीशिवाय बांधण्यात आले आहेत. काही वृत्तपत्रे असेही सुचवतात की राजकोट गेमिंग झोनमध्ये पेट्रोल आणि टायर आणि फायबर ग्लास यांसारख्या अत्यंत ज्वलनशील पदार्थांचा साठा होता”, असं खंडपीठाने म्हटलं.

या घटनेची खंडपीठाने जनहित याचिका म्हणून स्वत:हून दखल घेण्याचे निर्देश रजिस्ट्रीला देत, खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ मे रोजी ठेवली. या कॉर्पोरेशन्सने कायद्याच्या कोणत्या तरतुदींनुसार हे गेमिंग झोन/मनोरंजन सुविधा सुरू ठेवू दिल्या आहेत किंवा स्थापित केल्या आहेत आणि वापरल्या जाऊ दिल्या आहे याची माहती पुढील सुनावणीत देण्याचे निर्देश दिले आहेत.

२७ जणांचा मृत्यू

गुजरातच्या राजकोट शहरातील एका गेमिंग झोनमध्ये शनिवारी संध्याकाळी भीषण आग लागली. यामध्ये जवळपास २७ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. टीआरपी गेम झोन येथे लागलेल्या आगीत अनेक लहान मुले आणि मोठी माणसे अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रात्री उशीरा लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.