सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशात लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवक प्रत्येक आवश्यक ती मदत करण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. प्रतिपदेच्या भाषणादरम्यान ते बोलत होते.

“शासन आणि प्रशासनाच्या प्रत्येक आवश्यक त्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तयार आहेत. देशातील नागरिकांच्या मदतीसाठी सर्व आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा करण्याचं काम पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीनं स्वयंसेवकांनी सुरू केलं आहे. आपण सर्वांनी यावेळी नियमांचं कठोरपणे पालन केलं पाहिजे, अस मोहन भागवत यावेळी म्हणाले.

” संपूर्ण समाजाद्वारे अनुशासनाचं पालन केलं पाहिजे. औषधं आणि अन्य आवश्यक सेवा सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. करोनाविरोधातील या युद्धातील प्रमुख बाब म्हणजे सोशल डिस्टंसिंग आहे. ही आपल्या समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. यावरूनच आपण करोनावर विजय मिळवू. हे युद्ध आपल्याला एकत्रित लढायचं आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

आणखी वाचा- करोना व्हायरसमुळे देशात आणखी एक मृत्यू, आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू

सध्या देशातील करोनाग्रस्त रूग्णांची संख्या ५५० च्या जवळ पोहोचली आहे. तर ११ जणांना करोनामुळे मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री देशाला संबोधित केलं. तसंच पुढील २१ दिवस म्हणजेच १४ एप्रिल पर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केलं आहे.