केरळच्या कोझिकोड विमानतळावर धावपट्टीवरून विमान घसरल्याची माहिती मिळताच बचावकार्यासाठी धाव घेत यंत्रणा कामाला लागल्या होत्या. दुर्घटनाग्रस्त विमानातील जास्तीत जास्त प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले होते. विमातनळांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या सीआयएसएफच्या सुत्रांच्या हवाल्याने एनडीटीव्हीने दुर्घटनेनंतर पहिल्या पाच मिनिटांत नेमकं काय झालं होतं याची माहिती दिली आहे.

७ वाजून ४० मिनिटांनी दुबईहून १९० प्रवाशांना घेऊन येणारं एअर इंडिया एक्स्प्रेस बोईंग ७३७ विमान धावपट्टीवरुन घसरताच एका अधिकाऱ्याने सीआयएसएफला फोन केल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. सहाय्यक उपनिरीक्षक अजित सिंग ८ नंबर गेटवर उपस्थित होते. त्यांनी तात्काळ सीआयएसएफला वॉकी टॉकीवरुन मेसेज पाठवला. एअरपोर्ट लँण्डिंगजवळ असणाऱे क्रॅश गेट हे तात्काळ सेवेसाठी असतात.

आणखी वाचा- केरळ विमान अपघात : राफेलची जबाबदारी असलेल्या स्क्वॉड्रनमध्ये कार्यरत होते कॅप्टन दीपक साठे

७ वाजून ४१ मिनिटांनी – सीआयएसएफने एअर ट्राफिक कंट्रोल आणि सीआयएसएफ क्विक रिस्पॉन्स टीमला फोन केला
७ वाजून ४२ मिनिटांनी – एअरपोर्ट फायर स्टेशनला अलर्ट देण्यात आला
७ वाजून ४३ मिनिटांनी – सीआयएसएफने आरोग्य विभागाला फोन केला
७ वाजून ४४ मिनिटांनी – सीआयएसएफ कंट्रोल रुमने विमानतळाच्या टर्मिनल मॅनेजर, डायरेक्टर यांना फोन केला. तर दुसरा फोन एअरपोर्टवरील आरोग्य विभागाला करण्यात आला.
७ वाजून ४४ मिनिटांनी – सीआयएसएफ कंट्रोल रुमने स्थानिक पोलिसांना फोन केला

आणखी वाचा- … म्हणून वाचले अनेकांचे प्राण; दीपक साठेंच्या भावाची भावनिक पोस्ट

अपघातानंतर पाच ते सात मिनिटात स्थानिक क्रॅश गेटवर पोहोचले होते. दुर्घटना मोठी असल्याने काही ठराविक स्थानिकांना बचावकार्यासाठी आतमध्ये येण्याची परवानगी देण्यात आली. विमान दुर्घटनेतील जखमींपैकी १४ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे मलप्पुरमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. या अपघातात दोन वैमानिकांसह १८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. जखमींपैकी १०९ प्रवाशांवर उपचार सुरू आहेत. त्यांची करोना चाचणीही केली जात आहे. आतापर्यंत ४९ प्रवाशांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, अपघातात मृत्यूमुखी पडलेले कॅप्टन दीपक साठे यांचे पार्थिव रविवारी मुंबईत आणण्यात आले. त्यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार होतील.