– चैतन्य प्रेम

जी परिस्थिती येईल त्यात योगी समाधानीच असतो. त्याच्यात रस—आसक्ती उरलेली नसते (यदृच्छा आलें तें सेविती। रसआसक्ती सांडूनि।।). पुढे अवधूत योग्याची अंतर्दशा मांडताना म्हणतो, ‘‘योगियांचा आहारू घेणें। काय सेविलें हें रसना नेणे। रसनापंगिस्त नाहीं होणें। आहारू सेवणें निजबोधें।।२८।।’’ (एकनाथी भागवत, अध्याय ८). योगी हा सदैव आत्ममग्न असतो. त्या भावदशेत वाटय़ाला येईल तो आहार ग्रहण करत असतो. खाल्लेल्या पदार्थाच्या चवीत तो अडकत नाही. तो रसनेनं आहार घेत असला तरी रसनेच्या आहारी जात नाही! पुढे तो म्हणतो, ‘‘आंबट तिखट तरी जाणे। परी एके स्वादें अवघें खाणें। सरस नीरस कांहीं न म्हणे। गोड करणे निजगोडिये।।२९।।’’ योग्यालाही आंबट आणि तिखट या चवी उमगत असतात, पण त्या पदार्थाला तो बरं-वाईट म्हणत नाही. उलट आत्मगोडीनं त्याला प्रत्येक पदार्थ गोडच वाटतो. आता हे फक्त अन्नधान्यानं रांधल्या जात असलेल्या ‘आहारा’चं वर्णन नाही. प्रत्येक इंद्रियांचा जो जो विषय आहे तो तो भोगताना मन, चित्त, बुद्धी आणि अहंकडून जे जे आत्मसात केलं जात असतं तो तो ‘आहार’च आहे. अर्थात डोळ्यांनी जे पाहिलं जातं, कानांनी जे ऐकलं जातं, त्वचेनं स्पर्शिलं जातं तो ‘आहार’च आहे. पण जे वाटय़ाला येणार ते प्रारब्धानुसारच येतं, हे योगी ठामपणे मानतो. त्याला प्रसंगातली अनुकूलता – प्रतिकूलता कळत का नाही? तरी तो काही न बोलता त्या परिस्थितीचा स्वीकार करतो. म्हणजे परिस्थिती बरी असो की वाईट, सुखकारक असो की क्लेशकारक; योगी शांतचित्त असतो. प्रतिकूल परिस्थितीतही तो आपला अंतर्मनाचा गोडवा मिसळत असतो. काही मिळालं नाही तरी अजगर वारा पिऊनदेखील राहतो तसा योगीही राहू शकतो, असं अवधूत सांगतो. तो म्हणतो, ‘‘तैशीचि योगियांची स्थिती। वाताशनें सुखें वर्तती। आहारालागुनी पुढिलांप्रती। न ये काकुलती सर्वथा।।’’ म्हणजे, अजगराप्रमाणेच योगीही राहू शकतो, पण आहारासाठी तो कुणासमोर लाचार होत नाही. यावरच खरा मुख्य भर आहे. आता अन्न नाही मिळालं तरी अजगर शांत पडून असतो तसा योगीही निश्चल असतो. कारण, ‘‘अदृष्टीं असेल जें जें वेळे। तें तें मिळेल तेणें काळें। यालागीं त्याचें ज्ञान न मैळे। धारणा न ढळे निजबोधें।।३६।।’’ अदृष्ट म्हणजे जे दिसत नाही ते. माणसाला प्रारब्धात काय आहे, ते दिसत नाही, उमजत नाही. पण जे घडणार असतं ते घडतंच. संयोग-वियोग, लाभ-हानी, भर-तूट, यश-अपयश हे सगळं वाटय़ाला येत जातं. त्याबाबत कोणतेही ठोकताळे बांधता येत नाहीत. कधी कधी भरपूर परिश्रम करूनही अपयश वाटय़ाला येतं, तर कधी विशेष प्रयत्न केले नसताना आणि कोणतीही अपेक्षा नसताना यश भरभरून लाभतं. कधी अतिशय काळजी घेऊनही हानी होते, तर कधी निष्काळजीपणे वर्तन घडूनही लाभ होतो. तेव्हा या गोष्टी वाटय़ाला याव्यात वा न याव्यात यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रयत्न करतानाही माणूस गांगरलेलाच असतो. योगी मात्र अदृष्टावर सोपवून निश्चिन्त असतो. जे घडणार आहे ते घडेल. मिळणार असेल ते मिळेल. त्यासाठी तो आटापिटा करीत नाही. त्याचं ज्ञान मलिन होत नाही की धारणा ढळत नाही. पण योग्यासारखं सामान्य माणसाला झेपेल का हो? तो असं वागू शकतो का? मग या जर आवाक्याबाहेरच्याच गोष्टी आहेत, तर त्या वाचून तरी काय लाभ, असं कुणाच्याही मनात येईल. मग अवधूत हे का सांगत आहे?