चैतन्य प्रेम ‘मी कोण?’ हा प्रश्न मनात जागा होण्याचीच उसंत हे जग मिळू देत नाही. मला समजू लागण्याआधीच जगानं माझं नाव मला दिलेलं असतं. माझं घर, माझ्या पालकांची आर्थिक/ सामाजिक परिस्थिती, माझं शिक्षण, माझे आप्त, माझा मित्र-परिवार या सगळ्यांनी ‘मी कोण’ हे माझ्यावर बिंबवलेलं असतं. त्याचबरोबर माझ्या मनात उत्पन्न होणाऱ्या वासना, कल्पना, भावना यांतून निर्माण होणारे भ्रम, मोह, आसक्ती या सगळ्यांनी ‘मी’ची ओळख पक्की केलेली असते. या ‘मी’च्या ओळखीत रुतूनच आणि त्या ‘मी’नुसारच ‘माझे’ कोण हेही गृहीत धरून ‘मी’ जगत असतो. पण कधी तरी आयुष्यात असा एखादा प्रसंग घडतो की, ‘मी खरा कोण आहे’ आणि ‘माझं खरं कोण आहे’ हे दोन्ही प्रश्न मनात उत्पन्न होतात. या प्रश्नांची उत्तरं भौतिक जीवनात मिळत नाहीत; कारण भौतिक जीवनातील धक्क्यांनीच तर हे प्रश्न निर्माण केलेले असतात! भौतिक पातळीवर त्यांची जी उत्तरं मिळतात, ती मनाला नि:शंक करत नाहीत. या प्रश्नाचा आध्यात्मिक पातळीवर शोध सुरू होतो, तेव्हा अनेक संत, तत्त्वचिंतकांची उत्तरं मिळतात; पण सत्संग आणि साधनेची जोड नसल्यानं त्या शाब्दिक नसलेल्या, पण शाब्दिक भासणाऱ्या उत्तरांनी मन नि:शंक होत नाही. यातली दोन उत्तरं पाहू.. पहिलं उत्तर आपण गेल्या वेळी वाचलं आहे; पण ते उत्तर आहे, हेच कळत नाही! हे उत्तर आहे रमण महर्षीचं. ते म्हणतात, ‘‘मी कोण, या प्रश्नाचा हेतू उत्तर शोधणं हा नाही, तर प्रश्नकर्त्यां ‘मी’च अस्तंगत होणं हा आहे!’’ आता आपल्याला वाटेल, यात ‘मी कोण?’चं उत्तर कुठे आहे? उलट प्रश्न विचारणाऱ्यालाच बाद केलंय! पण हे उत्तरच आहे. इथं हा प्रश्न नेमका कोणाला पडलाय, तेच समजून घेण्याची प्रेरणा महर्षी देत आहेत. इथं ‘मी’नं अस्तंगत होणं म्हणजे ‘मी’चं नष्ट होणं आहे का? तर नाही! पण ‘मी’ अमुक अमुक आहे, ही जी ओळखींची आवरणं मी झुलीप्रमाणे अंगावर ल्यायली आहेत ना, त्या झुली फेकून देऊन जसा आहे तसा समोर उभा ठाकणं, हेच त्याचं उत्तर आहे. जेव्हा खरा ‘मी’ समोर उभा ठाकेल, तेव्हा उत्तरही आपोआप मिळालेलंच असेल! ‘मी कोण?’ हा प्रश्न ज्याला पडला आहे, त्याच्या मनात ‘माझे खरे कोण?’ हा प्रश्नही पडला आहे. आणि ‘मी खरा कोण?’ या प्रश्नापाठोपाठ ‘माझं खरं कोण?’ हा प्रश्नही सावलीसारखा मनात उमटलेलाच आहे. त्यातून साधनापथावर पावलं पडू लागली, तर ‘मी फक्त सद्गुरूंचा आणि सद्गुरूच खरे माझे,’ हे उत्तर मनात उसळी मारतं. पण साधनापथाच्या प्रारंभिक वाटचालीत ते अनुभवसिद्ध नसतं. मध्येच ‘मी’ पूर्वीच्या तोऱ्यात वावरू लागतो आणि जगच ‘माझे’ या भ्रमात अडकतो. अशा साधकाला श्रीवासुदेवानंद सरस्वती जागं करतात. ‘दत्तपुराण’ या ग्रंथात ते म्हणतात, ‘‘अहंममेति संज्ञेयं कस्येत्यालोचयानिशम्।।’’ म्हणजे- ‘अहं, मम अर्थात ‘मी’ आणि ‘माझे’ हा विचार यापुढे करू नकोस. तसा विचार मनात येताच ‘मी’/ ‘माझे’ला ‘कोणाचे?’ हा उलट प्रश्न विचार आणि त्याचं चिंतन कर.’ म्हणजे ‘मी’ जागा होताच ‘मी खरा कोणाचा?’ आणि ‘माझे’ उत्पन्न होताच ‘माझे खरे कोण?’ हे प्रश्न अंतर्मनाला विचारायचे. म्हणजे भ्रामक ‘मी’ आणि ‘माझे’चा तोरा उतरेल! तो खऱ्या ‘मी’च्या शोधाला उद्युक्तच करील. ‘मी कोण?’चं दुसरं उत्तर श्रीनिसर्गदत्त महाराज देतात, ते म्हणजे- ‘मी आहे’ यावरच स्थिर राहा, केंद्रित राहा! आता आपल्याला वाटेल, हे तरी उत्तर कसं म्हणावं?'