मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांना मत देऊ नका, असे आवाहन करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर मुंबईतील प्रचारसभांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. राष्ट्रवादीने इंजिन भाडय़ाने घेतल्याची संभावना करत मुख्यमंत्र्यांनी राज यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

उत्तर-पश्चिम मुंबईत शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्यासाठी अंधेरी पूर्व येथे तर उत्तर मुंबईतील भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्यासाठी दहिसर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सभा घेतली. फडणवीस यांनी राज यांच्या आरोपांचा समाचार घेतला. त्याचबरोबर मोदी सरकारच्या कामगिरीमुळे सर्वसामान्यांना झालेल्या लाभाचा लेखाजोखा मांडला. जन-धन योजनेत बँक खाते उघडल्यामुळे गेल्या पाच वर्षांत विविध योजनांचे ८० हजार कोटी रुपये थेट लोकांच्या खात्यावर जमा झाले, असे फडणवीस यांनी सांगितले.