केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचं भाषण आणि त्यातले मुद्दे कायमच चर्चिले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वजीर अशी त्यांची ओळख आहे. त्याप्रमाणेच त्यांनी वारंवार स्वतःला सिद्धही केलं आहे. अशात त्यांनी त्यांच्या भाषणात केलेलं एक वक्तव्य चांगलंच गाजतं आहे. मी मंत्री होतो आणि पाच मिनिटांत कैदी झालो असं त्यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले अमित शाह? "मी गुजरातमध्ये मंत्री होतो. तेव्हा काँग्रेसचं सरकार देशात होतं. त्यावेळी सीबीआयच्या माध्यमातून माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला." सोहराबुद्दीन प्रकरणाचं नाव न घेता अमित शाह यांनी हा उल्लेख केला. अमित शाह म्हणाले, "गुन्हा दाखल झाल्यानंतर मला अटक करण्यात आली आणि तुरुंगात टाकण्यात आलं. त्यावेळी काँग्रेसचे निरुपम नानावटी यांनी हा मुद्दा उचलून धरला. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी हे प्रकरण लढलं आणि हा खटला जिंकला." असं अमित शाह म्हणाले. अमित शाह म्हणाले, "आम्ही तेव्हा दोन-तीन जण चर्चा करत होतो निरुपम नानावटी हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांची पार्श्वभूमी ही काँग्रेसची आहे. तरीही ते आपला खटला का लढतील? माझं मनही मला सांगत होतं की ते लढणार नाही. तरीही मी म्हटलं आपण विचारुन बघायला काय हरकत आहे? आमच्या एका मित्राद्वारे त्यांच्याशी मी संवाद साधला. आश्चर्य म्हणजे त्यांनी माझा खटला लढायला होकार दिला. सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण नेलं आणि विजयही मिळवला." तो दिवस मला अजूनही आठवतो आहे. मी पाच मिनिटांपूर्वी मंत्री होतो आणि पुढच्या पाच मिनिटांमध्ये कैदी झालो. माझ्यासाठी तो काळ कठीण होता. आता आपली केस कुणाला द्यायची? त्यावर चर्चा झाली होती तेव्हा निरुपम नानावटी यांचं नाव समोर आलं होतं त्यांनी उत्तम प्रकारे माझी केस लढली असंही अमित शाह म्हणाले. अमित शाह पुढे म्हणाले, "आम्ही दिल्लीच्या हॉटेलमध्ये जेवत होतो. तेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही माझी केस कशी काय घेतली? त्यावर ते म्हणाले काँग्रेसमध्ये माझेही मित्र आहेत. मला माहीत आहे तुम्हाला अडकवण्यात आलं आहे, त्यामुळेच मी तुमची केस लढतो आहे. " अमित शाह यांना तुरुंगात का जावं लागलं होतं? अमित शाह यांच्यावर गुजरात दंगल भडकवण्याचा ठपका ठेवण्यात आला होता. तसंच सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात त्यांना ९० दिवस तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यांच्या वेबसाईटवरही याचा उल्लेख आहे. नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय असल्याने काँग्रेसने त्यांच्यावर ही कारवाई केली असं लिहिण्यात आलं आहे. २०१५ मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना आरोपमुक्त केलं.