नवी दिल्ली : काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी पुढील दोन-तीन दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची गुरुवारी (७ मार्च) बैठक बोलावण्यात आली असून १३०-१५० उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे समजते. वायनाड मतदारसंघ काँग्रेससाठी सुरक्षित असल्यामुळे राहुल गांधी वायनाडमधून दुसऱ्यांदा रिंगणात उतरणार आहेत. मात्र, उत्तरेतूनही राहुल गांधी यांनी निवडणूक लढवावी असा पक्षांतर्गत सूर आहे. आठवडाभर छाननी समितीच्या बैठका होत आहेत. केरळ, तेलंगण, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, पंजाब, हरियाणा आदी राज्यांच्या उमेदवारांसंदर्भात चाचपणी करण्यात आली. प्रदेश काँग्रेसकडून सुचवण्यात आलेली नावे व राजकीय आखणीकार सुनील कानुगोळू यांनी दिलेला अहवाल यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात असून त्यानंतर नावे निश्चित केली जाणार आहेत. हेही वाचा >>>सनातन धर्मावर केलेल्या टिप्पणीवर उच्च न्यायालयाची नाराजी; उदयनिधी स्टॅलिन यांना मंत्रीपदावरून हटविण्यास मात्र विरोध महाराष्ट्र-बिहार दुसऱ्या टप्प्यात काँग्रेसने दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र या राज्यांमध्ये ‘इंडिया’तील घटक पक्षांशी आघाडी केली आहे. त्यापैकी दिल्ली व उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये जागावाटप निश्चित झाले आहे. महाराष्ट्र व बिहारमध्ये जागावाटप झालेले नाही. त्यामुळे गुरुवारी बैठकीमध्ये या दोन्ही राज्यांतील उमेदवारांवर चर्चा होण्याची शक्यता नाही. राहुल गांधी यांनी उत्तरेतूनही निवडणूक लढवावी असा पक्षांतर्गत सूर आहे. उत्तर प्रदेश काँग्रेस नेत्यांनी छाननी समितीमध्ये हा विचार बोलून दाखवल्याचे समजते. रायबरेलीतून प्रियंकांनी लढण्याची मागणी प्रियंका गांधी-वढेरा यांना रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवावी यासाठी कार्यकर्तांनी मागणी केली आहे. अनेक कार्यकर्ते दिल्लीत मुख्यालयात दाखल झाले होते. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांची राज्यसभेवर निवड झाल्याने त्या रायबरेलीतून निवडणूक लढणार नाहीत.