लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रासह देशातले पाच टप्पे पार पडले आहेत. आणखी दोन टप्पे बाकी आहेत ज्यासाठी २५ मे आणि १ जून रोजी मतदान पार पडतं आहे. त्यानंतर ४ जून रोजी निकाल लागणार आहे. या निकालात एनडीएसह भाजपाने ४०० पारचा नारा दिला आहे तर यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत, इंडिया आघाडी ३०० किंवा त्याहून अधिक जागा जिंकेल असा दावा इंडिया आघाडीने केला आहे. अशात इंडिया आघाडीचा पंतप्रधान कोण? हे ठरलेलं नाही. अशात जयराम रमेश यांच्या वक्तव्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

इंडिया आघाडीचे पाच वर्षांत पाच पंतप्रधान, असा राऊत आणि ठाकरेंचा दावा

जयराम रमेश यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला एक सविस्तर प्रतिक्रिया या बाबत दिली असली तरीही याआधी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी पाच वर्षांत पाच पंतप्रधान असतील असा दावा केला आहे. याची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने खिल्लीही उडवली. अशात आता जयराम रमेश यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचा चेहरा असतील का?

राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे इंडिया आघाडीचे उमेदवार असतील का? हे विचारलं असता, जयराम रमेश म्हणाले “पंतप्रधान पदाच्या नावाची घोषणा करण्याची एक प्रक्रिया आहे. पंतप्रधान पदाचा चेहरा निवडणं म्हणजे काही सौंदर्य स्पर्धा नाही. आमचा पक्ष लोकशाही मानणारा पक्ष आहे. आमच्यासाठी एक व्यक्ती नाही तर पक्ष महत्त्वाचा आहे. पक्ष ज्या नेत्याची निवड करेल तोच नेता पंतप्रधान होतो.” असं उत्तर जयराम रमेश यांनी दिलं आहे.

हे पण वाचा- शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य, “पंतप्रधान नरेंद्र मोदीच फक्त राहुल गांधींची टिंगल करतात, पण देश…”

इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण?

इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? हे विचारलं असता जयराम रमेश म्हणाले, “२००४ मध्ये जेव्हा आमची सत्ता आली तेव्हा मनमोहन सिंग यांच्या नावाची घोषणा निकालानंतर चार दिवसांत झाली होती. यावेळी चार दिवसही लागणार नाहीत. पंतप्रधान कोण असेल? या नावाची घोषणा दोन दिवसांत होईल. खासदार एकत्रित बसून निर्णय घेतील. चेहरा आधीच ठरवून टाकायचा वगैरे ही मोदींची कार्यशैली आहे. आम्ही त्यांच्यासारखे अहंकारी नाही. सर्वात मोठा पक्षाचा उमेदवार हा पंतप्रधान होईल. याचाच अर्थ ज्या पक्षाच्या जास्त जागा येतील त्या पक्षाकडून ज्या नेत्याचं नाव सुचवलं जाईल तो व्यक्ती देशाचा पंतप्रधान असेल. २००४ मध्येही आम्ही अशीच प्रक्रिया राबवली होती.” असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.