माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हाती घेत भाजपाचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना आव्हान दिले आहे. सध्या माढा लोकसभा मतदारसंघात दोन्ही उमेदवाराचा जोरदार प्रचार सुरू आहे. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारासाठी आज शरद पवार यांची अकलूजमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवड्याला महाराष्ट्रात येत असून ते पंतप्रधान नाही तर आठवडामंत्री झाले आहेत”, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार काय म्हणाले?

“काही लोक म्हणतात ही लोकसभेची निवडणूक आहे. मग धैर्यशील मोहिते पाटील यांना कशाला तिकडे पाठवता. त्याऐवजी दुसरा कोणीतरी वरिष्ठ उमेदवार हवा होता. यावर मला गंमत वाटली. लोकशाहीमध्ये काम करण्याची हिंमत, कर्तृत्व आणि समाजाची बांधिलकी या गोष्टी असतील तर वय कधीही आढवे येत नाही. उदाहरण सांगायचे झाले तर मी वयाच्या २६ व्या वर्षी महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेलो. २९ व्या वर्षी मंत्री झालो आणि ३७ व्या वर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. त्यामुळे वय कधीही आडवे येत नाही. आता माढा मतदारसंघात धैर्यशील मोहिते यांना तर राजकीय पार्श्वभूमी आहे”, असे शरद पवार म्हणाले.

हेही वाचा : महादेव जानकर अजित पवारांना म्हणाले भा**, चूक लक्षात येताच केली सारवासारव, नेमकं काय झालं?

“माझ्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात मी अकलूजला येत असे. त्यावेळी माझे मोठे भाऊ आप्पासाहेब पवार हे त्यावेळी शंकरराव मोहिते-पाटील यांच्याबरोबर काम करत होते. त्या दोघांच्या मनात एकच विचार असायचा. या परिसराचा विकास कसा करायचा? शंकरराव मोहिते यांनी आयुष्यभर विकासासाठी काम केले. त्या काळात दुष्काळ असायचा. पाण्याचा प्रश्न असायचा, कारखान्याचे प्रश्न असायचे, असे अनेक चांगले काम आयुष्यभर त्यांनी केले”, असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

शरद पवार पुढे म्हणाले, “आज जिरायत शेतीकडे राज्यकर्त्यांचे काहीच लक्ष नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसला आले होते. निवडणुकीमुळे एक बरे झाले की, देशाच्या पंतप्रधानांना माळशिरस, सोलापूर, पुणे माहिती तरी झाले. आम्ही कधीतरी ऐकायचो की जवाहरलाल नेहरू यांची कधीतरी सोलापूरला सभा होत असायची. आता नरेंद्र मोदी आठवड्याला येत आहेत. पंतप्रधान हे देशाचे असतात. मात्र, आता आपण पाहत आहोत की, देशाचे पंतप्रधान हे आठवडामंत्री झाले आहेत. दर आठवड्याला इकडे येत आहेत”, असा टोला शरद पवार यांनी मोदींना लगावला.

“पंतप्रधान मोदींना आता आमची विनंती आहे की, त्यांनी इकडे येत असताना विमानाने किंवा हेलिकॉप्टरने येऊ नये, तर गाडीने यावे. कारण इकडचे रस्ते तरी व्यवस्थित होतील. आज मोदी यांच्या राज्यामध्ये कुढलाही प्रकल्प आला की गुजरातला जातात. पंतप्रधान हे कधी खोटे बोलत नाहीत, असा आमचा समज होता. मात्र, आज मोदी कुठेही गेले तरी राहुल गांधींवर टीका करतात. राहुल गांधींनी तुमचे काय घोडे मारले?”, असा सवाल शरद पवार यांनी यावेळी केला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar criticizes to pm narendra modi lok sabha election 2024 and madha lok sabha constituency politics gkt
Show comments